प्रस्तावना !

माझ्या जीवनप्रवासा बद्दल ' मला समजलेला देव ..अल्लाह .गाँड वगैरे ' ही लेखमाला लिहितो आहे .. याचे प्रमुख कारण म्हणजे .. बालपणापासून एखाद्याला पडणारे स्वाभाविक प्रश्न .. त्यांची न मिळणारी उत्तरे ..बालसुलभ कुतूहल .. त्यापोटी धाडसी वर्तन .. त्यातून होणारा अनर्थ ..तारुण्यात प्रवेश करताना केलेल्या चुका .. एकदा भरकटल्या वर आयुष्याची होणारी फरफट ..त्यातून सावरण्याची केविलवाणी धडपड .. यश ..अपयशाचा लपंडाव .. आणि त्यातून मला झालेले जीवन दर्शन कदाचित वाचकांना काही शिकण्यास मदत करू शकेल असे वाटले .. व्यसनाधीनता हा भयानक मनो -शारीरिक आजार .. तो होण्याची कारणे .. त्यामुळे व्यसनी व्यक्तीचे व त्याच्या जवळच्या नातलगांचे होणारे गंभीर नुकसान या सगळ्या बद्दल सविस्तर माहिती मिळून त्यातून कोणाला सावरण्याची संधी मिळाली .. सुधारणेची शक्ती मिळाली कोणाचे जीवन सुरळीत झाले तर मी नक्कीच स्वतःला भाग्यवान समजीन....
तुषार नातू -फेसबुक प्रोफाइल
ब्लॉग संबंधी सूचना आपण comment box मध्ये देऊ शकता , किंवा मेल करा : tusharnatublog@gmail.com



रविवार, 7 अप्रैल 2013

सकारात्मक आनंद

भाग १५६ वा     माँनीटर म्हणून निवड !

मुक्तांगण मध्ये गेल्यापासून दहा दिवसातच मी तेथे चांगला रुळलो . सर्व उपचारपद्धतींमध्ये हिरीरीने सहभाग घेत होतो .. तसेच वार्डच्या कामात माँनीटरला मदत करत होतो .. निवासी कार्यकर्त्यांशी देखील माझी चांगली मैत्री होऊ लागली .. मी उमराणी सरांना त्यांनी भेटायला बोलाविले म्हणून गेलो असताना त्यांनी आधी छान गाणी म्हणतोस तू ..असे म्हणत माझे कौतुक केले ..नंतर शास्त्रीय संगीत शिकला आहेस का ? कुठला ? घरी कोण कोण असते ? व्यसन कसे सुरु झाले वगैरे माहिती विचारली .. मी त्यांना जमेल तशी सविस्तर उत्तरे देत गेलो .. शेवटी ते मला म्हणाले इथे मुक्तांगण मध्ये किमान ३५ दिवस तरी राहावे लागते ..मात्र तू अधिक दिवस राहिलास तर तुला अधिक फायदा होईल ..त्या दृष्टीने विचार कर ..मला देखील इथले वातावरण आवडले होते .मी त्यांना होकार दिला .. चार दिवसांनी मला डॉ. अनिता अवचट यांचे बोलावणे आले .. प्रत्येक पेशंट ला आठवड्यातून एकदा तरी भेटायचे असा त्यांचा नियम होता ..त्यानुसार त्यांनी मला बोलाविले होते .. या पूर्वी तीनचार वेळा त्यांची भेट झाली होती पण तेव्हा जुजबी बोलणे झाले होते ..प्रत्यक्ष समुपदेशन आता सुरु होणार होते ....त्यांची परवानगी घेवून मी आत गेलो .. सुहास्य मुद्रेने त्यांनी माझे स्वागत करून ..मला समोरच्या खुर्चीत बसायला सांगितले .. मनातून जरा अस्वस्थ वाटत होते ... यांना आपला सगळा इतिहास सांगावा की नाही हा संभ्रम होताच ..कसे वाटतेय मुक्तांगण मध्ये ? ... हा अतिशय साधा प्रश्न होता ..त्यामुळे मी त्यांना छान वाटतेय .. खूप चांगले वाटतेय असे उत्तर दिले .. चांगले वाटतेय म्हणजे नेमके काय ? हा प्रश्न जरा अवघड वाटला ..म्हणजे ...भूक चांगली लागतेय ... वेळ चांगला जातोय ..व्यसनाची आठवण अजिबात येत नाही ..झोपही चांगली येते ... असे मी उत्तर दिले .. मग म्हणाल्या तू या पूर्वी कुठे कुठे उपचार घेतले आहेस ? ..मी त्यांना दोन खाजगी दवाखाने ..चार वेळा मेंटल हॉस्पिटल ठाणे .. ही माहिती दिली ..मी बोलत असताना ..त्या लक्षपूर्वक ऐकत होत्या व माझे बोलणे झाले की लगेच त्यांच्या जवळच्या एका वहीत काही टिपणे करीत होत्या .. सुमारे १० मिनिटांची भेट होती .. त्यांनी अश्या प्रकारे प्रश्न विचारले होते की कसलेही दडपण न वाटता मी पटापट उत्तरे देत गेलो .. व बहुधा सगळी माहिती त्यांना सांगितली ...शेवटी मला निरोप देत म्हणाल्या .. या वेळी तूला अधिक प्रामाणिक पणे प्रयत्न करावे लागतील .. मी आज्ञाधारक पणे मान हलवीत बाहेर पडलो .. वार्डात आलो त्यांचे शेवटचे वाक्य अगदी बरोबर होते .. मला अधिक प्रामाणिक पणे प्रयत्न करावे लागणार होते ...या पूर्वी मी जेव्हा जेव्हा व्यसनमुक्त राहिलो तेव्हा .. आता काहीही झाले तरी व्यसन करणार नाही असा निर्धार करत होतो ..पण काही महिन्यातच...जुना व्यसनी मित्र मित्र भेटणे ... घरात काहीतरी भांडण होणे .. मनाविरुद्ध घटना घडणे .. अश्या कारणांनी पुन्हा पिणे सुरु झाले होते ..याचा अर्थ ..काहीही झाले तरी व्यसन करणार नाही या स्वतच्या निर्धाराशी मी प्रामाणिक राहू शकलो नव्हतो

पुढच्याच आठवड्यात जुना माँनीटर सुटी होऊन घरी जाणार म्हणून नवीन माँनीटर ची निवड करायची वेळ आली ..जुन्या माँनीटर ने निवासी कार्यकर्त्यांना त्यासाठी माझे नाव सुचवले .. आणि सर्वानुमते माझी वार्ड माँनीटर म्हणून नेमणूक झाली ..माँनीटरचे मुख्य काम असे ते म्हणजे रोज किचन मधील मोठी खरकटी झालेली भांडी धुण्यासाठी वार्डातील तीन पेशंट्स ची ड्युटी लावणे .. हे काम बरेच किचकट अश्यासाठी होते की ..बहुधा सगळे जण ही भांडी ड्युटी करायला नाखुश असत ..तब्येत बरी नाही .. पोट दुखतेय .. माझी शस्त्रक्रिया झालीय ..अशी करणे देवून शक्यतो भांडी ड्युटी टाळण्याचा प्रयत्न असे ..गोडी गुलाबीने समजुत घालून कामे करून घ्यावी लागत .. तसेच योगाभ्यासाचा देखील कंटाळा आढळला . .. अनेकजण योगाभ्यासाचा तासाला गैरहजर राहण्यासाठी प्रयत्नशील असत .... याचे कारण कदाचित ' योग ' या संकल्पाने बद्दल लहानपणापासून असलेले समजूत असावी .. योग म्हणजे मोठ्या साधू पुरुषांचे ..दिव्य लोकांचे .. काम आहे ..सर्वसामान्य माणसाला झेपण्यासारखे नाही ....असा एक सर्व साधारण समज ' योग' विद्येच्या बाबतीत आढळतो .. दुसरे कारण असे की .. योगाभ्यासाचा तासाला जास्तीत जास्त वेळ डोळे मिटून एकाग्रतेने आसने करावी लागत ..व्यसनी व्यक्तीचे मन अतिशय चंचल असल्याने .. डोळे मिटून मन एकाग्र करणे त्याला शिक्षाच वाटते ..कधी एकदा डोळे उघडतो असे होते त्याला ..अनेक जण व्यायाम अगदी आवडीने करत असत ..पण योगाभ्यास म्हंटले की त्यांचे तोंड वाकडे होई .. येथे योग्याभ्यास शिकवण्यासाठी श्री .उदय पेंडसे ..नावाचे योग शिक्षक येत असत .. अतिशय चणाक्ष .. हुशार .. लालगोऱ्या रंगाचे पेंडसे सर् अंगाने जरा स्थूल होते .. परंतु खूप चपळ देखील होते ...मराठी ...हिंदी.. इंग्रजी या तिन्ही भाषांवर त्यांचे असामान्य प्रभुत्व ... तिन्ही भाषातून सूचना देत .. अधून मधून हलके विनोद करीत त्यांचा योगाचा तास चाले ...त्यांचे विनोद अनेकदा खूप मार्मिक असत ..त्यांच्या तासाला मला खूप मजा वाटत असे .. पेंडसे सरांनी खास व्यसनी व्यक्तीच्या शरीराला झेपू शकतील अश्या प्रकारची आसने विकसित केली होती .. तसेच आठवड्याच्या शेवटी दर शनिवारी ..रविवारी सकाळी उठल्याबरोबर शारीरिक कवायत घेण्याएवजी.. शुद्धीक्रिया किवा ' वमन धौती 'नावाचा पेंडसे सरांनी सुचविलेला प्रकार घेतला जाई .. एका मोठ्या भांड्यात पाणी गरम करून त्यात जेमतेम चवीपुरते मीठ टाकले जाई ..नंतर .. प्रत्येकाने एका वेळी जितके ग्लास पिता येतील तितके ग्लास पाणी पटापट प्यायचे ...ते मीठ घातलेले कोमाट पाणी पोटभर पिवून झाले की ..मग कमरेत खाली वाकून .. नाकाने श्वास घेत ..श्वास बाहेर सोडताना तोंडाने बाहेर सोडत .. गळ्याच्या ..पोटाच्या स्नायूंची विशिष्ट प्रकारे हालचाल करून ..तोंडाने ह.. ह... ह ..असा आवाज काढत ते पोटातील पाणी पुन्हा बाहेर काढायचे .. खूप अवघड कम होते हे .. घश्यात बोट न घालता म्हणजे उलटी न काढता .. असे पाणी बाहेर येत नसे .. बहुतेक वेळा पेंडसे सर् स्वतः सकाळी सकाळी निरीक्षक म्हणून उपस्थित राहून ' शुद्धीक्रिया ' करून घेत असत ..एकदा पोटात मिठाचे पाणी गेले की ते जर असे तोंडावाटे बाहेर पडले नाही तर मग जुलाब होऊन बाहेर पडे ..पहिल्यावेळी मी पाच मोठे ग्लास भरून मिठाचे पाणी प्यायलो ..नीट टेक्निक माहित नसल्याने शुद्धीक्रिया नीट जमली नाही ..मग दुपारपर्यंत जुलाब होत होते ... एकदा नीट मन लावून केले तेव्हा मला जमले .. या प्रकारात माँनीटर कडे अजून एक जवाबदारी होती ती म्हणजे ...प्रत्येक जण किती ग्लास पाणी पितो ते आणि तोंडावाटे बाहेर काढताना किती ग्लास पाणी पोटातून बाहेर काढतो याची एका वहीत नोंद ठेवणे .. पेंडसे सरांच्या मते या ' शुद्धीक्रिये ' मुले आपले पोट साफ राहते ..शरीरातील विषद्रव्ये निघून जाण्यास मदत मिळते ..आणि सर्वात मुख्य मानसिक कारण असे की .. खूप अंतर्मुख ( इंट्रोव्हर्ट ) असेलला व्यक्ती या प्रकाराने मनमोकळे पणे स्वताच्या अंतर्मनातील समस्या उघड पणे बोलण्याची क्षमता मिळवू शकतो .

माँनिटर झाल्यापासून मला अजून एक सवलत मिळाली ...ती म्हणजे निवासी कर्मचारी त्यांना तल्लफ येईल तेव्हा जो चहा बनवत असत तो मला देखील ते देवू लागले .. हे निवासी कार्यकर्ते नेहमी खूप आनंदी दिसत .. सारखी काहीतरी थट्टा मस्करी चाललेली असे त्यांची एकमेकांशी .. शिवाय प्रत्येक कामात उत्साहाने सहभाग घेत ..हे पाहून मला त्यांच्या क्षमतेचे नवल वाटे .. आणि एक संशय देखील येई मनात ..की हे लोक रात्री सगळे जण झोपल्यावर काहीतरी नशा तर करत नसतील ? ..कसली तरी नशा केल्याशिवाय हे इतके आनंदी कसे राहू शकतात .. मला तर नशा बंद असताना खूप आळस येई ..कंटाळा वाटे ..आणि हे सदोदित उत्साहात ? दारू वगैरे नाही पण हे सगळे किमान एखादी सिगरेट भरून गांजा तरी ओढत असावेत असा माझा संशय बळावला तेव्हा ...मी रात्री झोपण्याचे नाटक करून या निवासी कार्यकर्त्यांवर नजर ठेवू लागलो ...बऱ्याचदा ते रात्री बेरात्री इमारतीच्या मागच्या बाजूला बसून ...लाकडे गोळा करून त्यावर चहा बनवत असत ..मी वरच्या हॉल मधील खिडकीतून त्यांच्यावर नजर ठेवू लागलो .. बंधू च्या बहुधा हे लक्षात आले की त्यांच्यावर मी नजर ठेवतोय ..त्याने एकदा मला असा खिडकीतून त्यांच्या वर पळत ठेवताना सरळ हाक मारून खाली बोलाविले .. म्हणाला ' अहो मॉनीटर ..वरून काय पाहता ..या खाली या की ...बसा आमच्यात " मी संकोचाने खाली गेलो . तेव्हा त्याने सरळ विचारले '' काय रे ..आमच्यावर नजर ठेवतोस ना ? " मला नाही म्हणणे अवघड झाले सरळ हो असे उत्तर दिले ..मनातील शंका पण बंधूला बोलून दाखविली .. तो खूप हसला नंतर म्हणाला ..मला सुधा येथे आल्यावर सुरवातीला असेच वाटले होते ..पण मित्रा तसे काही नसते ..आम्ही सगळे बाहेरच्या जगाचा विचार न करता येथे आंनदात राहण्याचा प्रयत्न करतो ..आनंदी राहण्यासाठी काहीतरी विनोद ..मस्करी करत राहतो एकमेकांची .. कामात मनाला गुंतवत असतो .. तूला असा संशय येणे स्वाभाविक आहे .. कारण या पूर्वी नशेखेरीज आपण जीवनात आनंदी राहू शकू असा विचारही आपल्या मनाला शिवलेला नसतो ..आणि इतरांना तसे आनंदी राहताना पाहून शंका वाटणारच ..बंधू च्या उत्तराने माझे समाधान झाले व खात्री देखील पटली की हे निवासी कार्यकर्ते गुपचूप कोणतीही नशा करत नाहीत .

===============================================================
भाग १५७ वा     समूह उपचार !

मला मुक्तांगणला येवून आता सुमारे २० दिवस उलटून गेले होते .. वार्डात ब्राऊनशुगरचे व्यसनी जास्त होते ..तुलनेत दारूचे व्यसनी कमी होते ..सगळे इथे आनंदात रहात असत याचे मुख्य कारण असे जाणवले की .. कोणालाही येथील समुपदेशक ..कार्यकर्ते .. अपराधीपणाची जाणीव करून देत नसत ..व्यसनी व्यक्तीकडे पाहण्याचा या सर्वांचा दृष्टीकोन अतिशय सकारात्मक होता .. तू नालायक आहेस .. तुझ्यामुळे सर्वाना खूप त्रास होतोय .. तू चोऱ्या केल्यास .. विश्वासघात केलेस .. वगैरे गोष्टींचा उल्लेख न करता ...व्यसनाधीनता हा एक मनो-शारीरिक आजार आहे .. त्यामुळे व्यसनी व्यक्ती हा वेडा नाही किवा वाईट देखील नाही तर तो एक आजारी आणि दुखी: व्यक्ती आहे या भावनेने उपचार दिले जात .. तसेच हा आजार बरा होऊ शकतो ..काही वेळा वारंवार उलटू देखील शकतो ही देखील येथील लोकांना पक्की जाणीव होती ... यातून बाहेर पडण्यासाठी स्वतच्या विचारात ..व्यक्तीमत्वात बदल करणे गरजेचे आहे हे आम्हाला सर्व समुपदेशक सांगत असत ..रोज दुपारी १२ वाजता समूह उपचारांची वेळ असे .. एकूण ३५ दिवसांच्या समूह उपचारांचे वेळा पत्रक बनवलेले होते यात मुक्तांगणला येवून १ आठवडा झालेले . ..दुसऱ्या ..तिसऱ्या ..चौथ्या व पाचव्या आठवड्यात असलेले असे वेगवेगळे गट पाडले जावून त्या त्या गटाला समूह मार्गदर्शन करण्यासाठी प्रत्येकी एक समुपदेशक हजर रहात असे .. यात व्यसनाधीनतेचे दुष्परिणाम .. आपल्या जीवनाचे होत असेलेल नुकसान .. भरकटल्याची कारणे...सुधारणेसाठी आवश्यक बाबी ..व्यसनमुक्तीची वाटचाल सातत्याने होण्यासाठी पाळावी लागणारी पथ्ये ...अशा सर्व गोष्टींवर चर्चा होई ..या चर्चेतून सर्वाना आत्मपरीक्षण करण्यास प्रेरणा मिळत असे ..अतिशय जिव्हाळ्याचे वातावरण राखले जाई ... त्यामुळे आपण एखाद्या मोठ्या कुटुंबातच वावरतो आहोत अशी भावना सर्वांच्या मनात असे .. वार्डची झाडलोट .. किचनमधील जेवणाची मोठी भांडी धुणे वगैरे सर्व कामे इथे उपचार घेणारे मित्रच करत असत .. कधी कधी एखादा कुरकुर करे तेव्हा त्याला सामुहिक जीवनाचे महत्व समजावून दिले जाई .. समूहात राहताना केवळ स्वतच्या स्वार्थाचा विचार करून भागत नाही तर संपूर्ण समूहाचे हित ध्यानात घेवून विचार करावा लागतो ही अतिशय महत्वाची शिकवण येथे सर्वाना मिळत होती .. जात ..पात ..धर्म ..गरीब -श्रीमंत , सुशिक्षित - अशिक्षित वगैरे भेदांना येथे थारा नव्हता ..आपल्या आसपास असलेल्या प्रत्येक जीवाला आपल्यासारखीच सुख दुखे: आहेत .. तेव्हा सर्वांच्या भावना समजून घेवून प्रगती केली पाहिजे हे सूत्र येथे कटाक्षाने राबवण्याचा प्रयत्न असे .
एकदा शनिवारी सकाळी संगीत उपचारांच्या वेळी .. मुक्तांगण चे कार्यवाह असलेले डॉ . अनिल अवचट उपस्थित होते ..त्या वेळी ते महिन्यातून एक दोन वेळा तरी मुक्तांगण मध्ये येवून उपचार घेणाऱ्या रुग्णांशी संवाद साधत असत .. ( आता नियमित आठवड्यातून एकदा येतात असे समजले आहे ) त्या दिवशी जुने मित्र विशेष उत्साहात दिसले .. ते सर्व डॉ . अनिल अवचट यांचा उल्लेख ' बाबा ' असा करत होते .. डॉ. अनिल अवचट यांचे नाव एक पत्रकार .. सामाजिक समस्यांवर लिहिणारे लेखक ...म्हणून मला माहित होते .. आज त्यांना प्रत्यक्ष पहायला मिळणार म्हणून खूप कुतूहल होते .. संगीत उपचार सुरु झाल्यावर एकदोन गाणी झाली असतील तोच ... खादीचा पांढरा जुनासा वाटणारा शर्ट .. साधी पँन्ट... खांद्याला एक मोठी शबनम पिशवी लटकवलेली या वेशात एका पांढऱ्या दाढीधारी व्यक्तीने हॉल मध्ये प्रवेश केला तसे सर्वानी टाळ्या वाजविल्या ... हेच ' बाबा ' होते तर ..सर्वात आधी मनात भरला तो त्यांचा साधे पणा .. ते उमराणी सरांच्या बाजूला जावून बसले .. खांद्यावरील शबनम बाजूला काढून ठेवली ..पिशवी बरीच जड आहे हे तिच्या आकारावरून जाणवत होते .. अतिशय संथ सुरात ते बोलू लागले .. संगीत हे उपचारांचे कसे प्रभावी माध्यम आहे हे सांगत ..केवळ मानवच नव्हे तर वनस्पती आणि प्राणी यांच्याबाबतीत देखील काही प्रयोग केले गेले तेव्हा संगीतामुळे त्यांच्यात सकारात्मक बदल झाल्याचे निष्कर्ष आहेत असे त्यांनी सांगितले .. मग पिशवीतून तीनचार बासऱ्या बाहेर काढल्या ..पितळी ..स्टीलची आणि लाकडी अश्या सर्व प्रकारच्या बासऱ्या होत्या ... त्यातील एक पितळी बासरी त्यांनी ओठाशी धरून वाजविण्यास सुरवात केली .. ते कोणतेही गाणे नव्हते मात्र .. बासरी ऐकताना ..काही गाणी आठवली .. दोन मिनिटे बासरी वाजवून झाल्यावर त्यानी.. सांगितले की मी एक शास्त्रीय संगीतातील राग वाजवला होता आत्ता .. कुणाला या रागाची माहिती आहे का ? वार्डात त्यावेळी कोणीच शास्त्रीय संगीत जाणणारे नव्हते ..आम्ही सगळे नुसतेच मक्ख ... मग बाबाच पुढे सांगू लागले ..सिनेमातील सर्व लोकप्रिय गाणी ..मराठी भावगीते .. लोकगीते .. या सगळ्यांचा प्रमुख आधार संगीतातील ' राग ' असतो ..त्यांनी मग बासरीवर वाजवलेल्या रागाची एकदोन गाणी आम्हाला सांगितली तसे त्यासारखीच एकदोन गाणी आम्हाला पण आठवली ... अतिशय सोप्या भाषेत बाबा संगीताचे महत्व सांगत होते ...मुलांनी त्यांना एखादे गाणे म्हणण्याचा आग्रह केला तेव्हा .. त्यांनी ' ज्योत से ज्योत जलाते चलो ...प्रेम की गंगा बहाते चलो ' हे गाणे म्हंटले .. ' खर्ज ' च्या आसपास लागणारा त्यांचा सूर होता .. आवाजात खूप गोडवा नाही पण गाण्याच्या शब्दांच्या नेमक्या अर्थाची कळकळ मनाला भिडली होती ....त्यांनी निवडलेले गाणे पूर्वी मी अनेक वेळा ऐकले होते ..कधी गाण्याच्या अर्थाकडे लक्ष गेले नव्हते माझे ..आज मात्र ते गाणे बाबांच्या तोंडून ऐकताना .. प्रथमच गाण्याचा अर्थ मनात शिरला .... ऐक तास कसा निघून गेला ते कळलेच नाही .. संगीत उपचारांची वेळ संपली होती तरी कोणालाच उठावेसे वाटत नव्हते इतके मंत्रमुग्ध झाले होते सगळे ..नंतर जेव्हा सगळे उठून बाबांच्या पाया पडू लागले तेव्हा इतका वेळ सहज हालचाली करणारे बाबा एकदम संकोचले ..त्यांनी माझ्या पाया पडू नका असे सांगितले .. मी इतका मोठा व्यक्ती नाही ऐक सर्वसामान्य माणूस आहे हे सांगितले .. हे तर खुपच अनोखे होते .. कारण अनेक ' बाबा ' जास्तीत जास्त लोकांनी पाया पडावे म्हणून धडपड करत असतात व त्यातच धन्यता मानतात ..हे ' बाबा ' जरा वेगळेच होते .

त्या दिवशी दुपारी १२ वाजता समूह उपचार देखील ' बाबा ' च घेणार आहेत हे समजले ..आम्ही सगळे १२ वाजता पुन्हा उत्सुकतेने हॉल मध्ये जमलो .. बाबांनी आधी थोडक्यात स्वतःबद्दल स्वतच्या छंदांबद्दल माहिती सांगितली .. ते म्हणाले मित्रानो मी देखील तुमच्यासारखाच व्यसनी आहे .. मनाला आनंद देणाऱ्या गोष्टी मी देखील सारखा करत असतो ..मात्र माझे व्यसन हे मलाही आणि माझ्या आसपास असणाऱ्या इतरांनाही कसा आनंद देवू शकेल याचा मी विचार करतो .. कंटाळा येणे ..निराश वाटणे .. बोअर होणे .. जीवनात कसलेही नाविन्य न वाटणे .. वगैरे मानवी भावना या अपरिहार्य आहेत .. त्यावर उपाय म्हणूनच लोक व्यसनाचा आधार घेतात .. आणि त्यात अडकून अधिक अधिक दुखी: होतात ... मी त्यावर उपाय म्हणून मनाला काही काळ दुसऱ्या एखाद्या गोष्टीत गुंतवण्याचा प्रयत्न करतो ...त्यातूनच अनेक नव्या गोष्टी मला शिकायला मिळतात ..जगाकडे ..या सृष्टीकडे बघण्याचा माझा दृष्टीकोन अधिक विकसित होतो .. प्रत्येकाने जर एखादा छंद जोपासला तर नक्कीच त्याला वेळ सत्कारणी लावल्याचे समाधान मिळू शकते ...बोलता बोलता त्यांनी उभे राहून हातातील खडूने फळ्यावर एक हत्तीचे चित्र काढले .. इतक्या सहजपणे त्यांचा हात फिरत होता फळ्यावर की सगळे आश्चर्य चकित झाले .. त्यांनी पुढून ..मागून ..बाजूने हत्ती कसा दिसतो ते दर्शवणारी दोन तीन चित्रे लीलया काढली .. 
========================================================================

भाग १५८ वा  सृजनशीलता आणि सकारात्मक आनंद !

फळ्यावर बाबांनी हत्ती काढल्यावर एखादी रेषा किती वळणे .. आढेवेढे .. असा प्रवास करून एक सुंदर चित्र तयार करू शकतात हे दर्शिवले होते .. आम्ही सर्व थक्क होऊन पाहत होतो .. मग त्यांनी त्यांच्या पिशवीतून .. काष्ठ्शिल्पे काढली .. लाकडी ठोकळ्याला कानस आणि इतर हत्यारांनी कोरून ..घासून त्यातून लाकडी शिल्प कसे तयार केले जाते ते समजावून सांगितले .. त्यात त्यांनी एकाच लाकडी ठोकळ्या तून कोरलेले आई आणि तिच्या पायावर तिचे बाळ..स्कुटरवर बसलेले कुटुंब ...वगैरे शिल्पे कोरली होती ..बाबा ती शिल्पे सांगताना त्याचा इतिहास .. ती शिल्पे कोरण्याची कल्पना मनात कशी आली .. या बद्दल देखील माहिती देत होते .. चित्रकला ..शिल्पकला .. संगीत .. बासरीवादन ..त्या नंतर साध्या हातरुमालाला घड्या पाडून त्यातून निर्माण होणारे प्राण्यांचे आकार .. काही हातचलाखीच्या करामती असे अनेक प्रकार करणारे बाबा ....पांढरी दाढी .. साधा वेष ..मृदू भाषा .. सर्वांबद्दल मनात आस्था बाळगणारे एखादे ऋषीच दिसत होते .. बोलताना त्यांच्या डोळ्यात आश्वासक भाव होते .. निसर्गाने हे जग इतक्या विविध प्रकारे नटवून सजवून ..त्यात विविध वनस्पती ....प्राणी ... पक्षी ..असे जीव निर्माण करून या सर्व गोष्टींचा उपभोग घेत ... स्वतचे आणि इतरांचेही जिवन सुखकर करून ..निसर्गाचे संगोपन करू शकेल असा बुद्धिमान प्राणी मानव निर्माण केलाय .. मात्र त्याच बुद्धीचा वापर करून मानव निसर्गाच्या मर्यादा भंग करतोय ... सुखाच्या .. आनंद ..मिळवण्याच्या कैफात ...उन्माद पावून ...स्वतच्या विकृत सुखासाठी इतर जीवांचे जिवन कष्टमय करतोय .. विधायक कार्यशक्ती विनाशक बनत चाललीय ...आपण जर आपल्या सर्व क्षमतांचा सकारात्मक वापर करू शकलो तर कितीतरी मोठे मोठे चमत्कार करू शकतो असे सांगत बाबांनी सृजनशीलतेचे महत्व समजावून दिले ....प्रत्येकाच्या आनंदाच्या कल्पना वेगवेगळ्या असू शकतात .. अर्थात आधी पोट भरल्यानंतरच मग इतर आनंदांकडे लक्ष जाते .. अतिशय समृद्ध अश्या या पृथ्वीवर आज मानवाने इतकी विषमता निर्माण केलीय की जगात अनेक मानव असे आहेत ... ज्यांना साधे दोन वेळचे पोटभर जेवण देखील मिळू शकत नाहीय ... चंद्रपूर ..गडचिरोली ..आणि इतर दुर्गम आदिवासी भागातील बांधव अतिशय कष्टप्रद जिवन व्यतीत करत आहेत ..मोठ्या मोठ्या शहरातून मजुरांचे तांडे राबत आहेत ..कच-याचा ढीग उपसणाऱ्या मुलांचे बाल्य केवळ पोटासाठीच संपत आहे ...सिमेंटची जंगले वाढून ..शेतीची जमीन कमी केली जातेय ...निरनिराळ्या जीवनावश्यक गोष्टींचे दुर्भिक्ष निर्माण होण्यात सर्वात मोठा हात मानवाचाच आहे ...अधिक अधिक भौतिक सुखे मिळविण्याच्या नादात इतरांचे सुख सहजपणे हिरावून घेतले जातेय . बाबांनी त्यांचे पत्रकारितेतील देखील अनुभव सांगितले .. देवदासी प्रथा ..विडीकामगारांचे प्रश्न .. शोषक अंधश्रद्धा अश्या विविध विषयांना स्पर्श करत चाललेला बाबांचा संवाद म्हणजे खरेच आनंदायी अनुभव होता ..आम्हाला सर्वाना त्यांनी अंतर्मुख केले होते ... एखाद्या धार्मिक प्रवचनापेक्षाही जास्त अशी मोलाची शिकवण होती बाबांची .....!

मी देखील नशेतून मिळणारा तात्पुरता आनंद मिळवण्यासाठी माझे स्वतचे आणि माझ्या सहवासात येणाऱ्या प्रत्येकाचे जिवन कष्टप्रद ...यातनामय करून ठेवले होते ...प्रेमळ आईवडील .. जीव लावणारा भाऊ ..बहिण .. मला सर्वस्व समजणारी अनघा .. तिचे कुटुंबीय ... जेथे जेथे नोकरी केली तेथील वरिष्ठ .. मला जिवन समर्थपणे जगण्यास प्रशिक्षण देणारे गुरुजन सगळ्यांच्या भावनांचा अनादर करत गेलो ... बाबांनी अतिशय सहजपणे आम्हाला सर्वाना आत्मपरीक्षण करण्यास प्रेरित केले होते .. त्या वेळपर्यंत केवळ नशे साठी म्हणून मी किमान पाच लाख रुपये तरी उडवले होते ...याच पैशात कितीतरी विधायक गोष्टी करता आल्या असत्या ..किमान आपल्या कुटुंबाच्या भल्यासाठी तरी या पैश्यांचा वापर नक्कीच करता आला असता ... बाबा बोलत असताना एकाने प्रश्न विचारला की ' आपण ज्या कला दाखवल्या आहेत त्या आत्मसात कारणे सर्वाना कसे शक्य होईल ? कारण मी असे ऐकले आहे की एखादा कलागुण हा नैसर्गिक असतो ..अश्या कलाकाराला निसर्गाने विशेष प्रतिभा दिलेली असते ? ..याबर बाबा हसून म्हणाले ..माझ्या मते प्रतिभेचा उत्तुंग अविष्कार हा कदाचित विशेष एकाग्रतेचा .. सरावाचा आणि निसर्गाच्या कृपेचा भाग असू शकतो .. प्रत्येक मानवाच्या मेंदूत अश्या प्रकारच्या कलांची केंद्रे आहेत .. मात्र हा खजिना आपोआप सापडत नाही तर त्यासाठी प्रेरणा हवी ... प्रयत्न केले पाहिजेत .. जरी प्रत्येक व्यक्ती मोठा गायक ..वादक ..चित्रकार .. शिल्पकार वगैरे बनू शकला नाही तरी आपल्या इतर जवाबद-या सांभाळून जर फावल्यावेळात जेव्हा मन अवस्थ असेल ..कंटाळा येईल .. मनात निराशा ..वैफल्य दाटून येईल ..व्यसन करावे अशी तीव्र इच्छा होईल ..तेव्हा जर मनाला काही काळ आपण या कलांकडे वळवले तरी आपण किमान आपल्यापुरता आनंद नक्कीच मिळवू शकतो .. बाबांचे हे उत्तर मला ही पटले .. मी देखील ठरविले की या पुढे आपणही फावल्या वेळात असा प्रयत्न करायचा . पाहता पाहता दीडतास उलटून गेला होता . बाबांनी मग सर्वांचा निरोप घेतला .

दोन दिवसांवर माझा डिस्चार्ज होता ...दरम्यान दोन वेळा माझी मँडमशी भेट झाली होती ..त्यांना मी माझ्याबद्दल बहुतेक सगळे सांगितले होते .. मी बाहेर इतक्या समस्या निर्माण करून ठेवल्या होत्या की त्यांचा सामना सहजपणे कारणे मला अजिबात सोपे नव्हते ...अजून काही दिवस येथेच रहावे असे मनात होते ...पुन्हा मला जेव्हा मँडम नी भेटायला बोलाविले तेव्हा ..आता पुढे काय विचार आहे ? असे विचारले तेव्हा मी त्यांना सरळ सांगितले की मला अजून काही दिवस इथे राहायचे आहे .. त्यांनी मला तशी संमती दिली ..म्हणाल्या तू अनेक प्रकारच्या चांगल्या गोष्टी इथे ऐकल्या ..समजून घेतल्या हे तर दिसतेच आहे ..याचा अर्थ असाही नव्हे की हे सगळे कृतीत उतरविणे लगेच शक्य होईल ...त्यासाठी तुला अजून वेळ द्यावा लागेल .. व्यसनापासून दूर राहत सर्वसामान्य जिवन जगण्याची सवय लावून घ्यावी लागेल .. त्याकरिता तू जर अजून काही दिवस इथेच राहायचे असे ठरविले असेल तर नक्कीच चांगले आहे ..मात्र आता मग इथे राहताना तुला काही जवाबदा-या देखील घ्याव्या लागतील ..माँनीटर म्हणून वार्डचे व्यवस्थापन तू चांगले केलेस तरी अजून स्वतच्या विचारांचे ...भावनांचे ...व्यवस्थापन शिकून ते अमलात आणण्यासाठी आता तुला विशेष प्रयत्न करावे लागतील .. असे सांगून त्यांनी माझ्या अजून काही महिने ' मुक्तांगण ' येथेच राहण्याच्या बेतास संमती दिली ... तत्पूर्वी एकदा नाशिकला जावून माझे कपडे घेवून येतो ..आईला ..भावाला वगैरे भेटून येतो असे मी त्यांना म्हणालो ..(माझ्या मनात अनघाची माहिती काढायचे असे देखील होते .. आई आणि भावाच्या भेटीपेक्षा नाशिकला एकदा जाण्याचे तेच खरे कारण होते मात्र तसे उघड सांगितले नाही )...यावर त्यांनी त्यालाही होकार दिला ..मात्र तेथे गेल्यावर कदाचित तुझा निर्णय डळमळीत होऊ शकेल याबाबत सावध केले ..तू जास्त काळ घरी न राहता केवळ एक दिवस राहून परत ये असे सांगितले .. माझ्याजवळ आता परत जाण्याच्या भाड्याला पैसे नव्हते ..तेव्हा त्यांनी ते पैसे तुला वार्ड अकाऊंट मधून मिळतील असे सांगितले .. वार्ड अकाऊंट म्हणजे येथे जे मित्र उपचार घेत होते .. त्यांच्या गरजेच्या वस्तूंसाठी पालक काही विशिष्ट रक्कम ' मुक्तांगण ' कडे जमा करीत असत .. डिस्चार्ज च्या वेळी त्यातून उरलेले पैसे परत दिले जात .. तसेच त्या उरलेल्या रकमेतून ..काही रक्कम स्वेच्छेने वार्डच्या खात्यात जमा केली जाई ..ज्याचा विनियोग वार्डच्या गरजा .. आणि इतर खर्च भागविण्यासाठी केला जाई .

===========================================================================

भाग १५९ वा   वळणे ..धोके ..अपघात !


नाशिकला जाण्याचे पक्के झाल्यावर मी मला नेमून दिलेले समुपदेशक श्री .भास्कर मोरे यांना भेटायला गेलो ..मोरे सरांनी समाजकार्य महाविद्यालयातून पदवी घेतली होती .. ते जवळ जवळ सुरवाती पासूनच ' मुक्तांगण ' च्या कामात सहभागी होते.... गेल्या २० दिवसात ते मला दोन वेळा भेटले होते .. सुरवातीला मला समुपदेशनाचे महत्व माहीतच नव्हते .. जेव्हा प्रथम .. भास्कर मोरे यांनी तूला बोलावले आहे असा निरोप आला ..तेव्हा मला हे देखील सांगितले गेले की ते तुझे समुपदेशक आहेत .. मी नुसताच हो ..म्हंटले आणि नंतर विसरूनही गेलो ..थोड्यावेळाने मोरे सर् वार्डात आले आणि मला म्हणाले चल जरा गप्पा मारायच्या आहेत तुझ्याशी .. गेलो त्यांच्या मागे त्यांच्या केबिन मध्ये ..' तू गाणी फार छान म्हणतोस असे ऐकलेय मी ' ..असे म्हणत त्यांनी सुरवात केली .. पुढे तुझे अजून काय काय छंद आहेत हे विचारले तेव्हा मी कविता ..अभिनय .. असे सांगितले .. तर म्हणाले ' अरे वा !मस्तच आहे ..मी पण कविता करतो असे म्हणत त्यांनी त्यांची कवितांची वही मला वाचायला दिली .. ' आत्ताच नको वाचुस सगळे .. हवे तर वार्डात गेल्यावर निवांतपणे वाच ' असे म्हंटल्यावर मी वही नुसती चालून टेबलवर ठेवून दिली होती ..मग त्यांनी घरी कोण कोण आहे ? ..शिक्षण किती झालेय .. व्यसन किती वर्षांपासून करतोय असे प्रश्न विचारले .. मी खरी उत्तरे देत गेलो ..व्यसनमुक्तीचा किती वेळा प्रयत्न केला आहेस ? मी जरा विचार करून उत्तर दिले .. म्हणालो ' सर् येथे पहिल्यांदाच योग्य दिशेने प्रयत्न करतोय ..या पूर्वी खाजगी दवाखान्यात ..नंतर मेंटल हॉस्पिटल ला देखील होतो चार वेळा .. पण तेथे काही शिकवत नव्हते ...' माझे उत्तर ऐकून मोरे सर् गालात हसले .. म्हणाले ' एक सांग तुला येथे नवीन काय काय शिकायला मिळाले ? ' पुन्हा विचारात पडलो .. ' सर् ..इथे आल्यावर मला कळले की व्यसनाधीनता हा ऐक मनो -शारीरिक आजार आहे .. हा आपण स्वतहून ओढवून घेतलेला आजार आहे .. यातून बाहेर पडण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न केले पाहिजेत वगैरे ' .. ' अरे वा ! तू खुपच हुशार आहेस .. पण या पूर्वी जेव्हा जेव्हा खाजगी दवाखान्यात ..मेंटल हॉस्पिटल मध्ये होतास तेव्हा तुझे व्यसन बंद झाले होते ..व्यसन मिळाले नाही तर होणारा शारीरिक त्रास देखील बंद झाला होता .. मग तरी परत का सुरु केलेस तू व्यसन ? ' हा जरा अवघड प्रश्न होता .. आताच घाई नाही उत्तर देण्याची तू पुढील वेळी मला भेटशील तेव्हा उत्तर तुझ्या वहीत लिहून आण ... महत्वाचे म्हणजे सगळी उत्तरे प्रामाणिकपणे लिही तरच मी तुला काही मदत करू शकेन असे बजावत त्यांनी मला निरोप दिला होता ..!

नंतर तीन चार दिवस मी मोरे सरांनी विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर लिहायचे आहे हे विसरूनच गेलो होतो ..जाता येता वाटेत ते एकदोन वेळा भेटले ..मला अभिवादन करून उतर लिहायची आठवण करून दिली ..तेव्हा जरा ओशाळल्या सारखे झाले मला ..असे उत्तर लिहिणे जरा कंटाळवाणेच होते .. सगळी कथा लिहीत बसावी लागली असती .. शेवटी मी लिहिले ' खूप निराशा ..दुखः ..अपेक्षाभंगाचे प्रसंग ओढवल्यामुळे माझे व्यसन पुन्हा सुरु झाले ..तसेच काही वेळा व्यसन करायचे नाही असे ठरवून देखील जुने व्यसनी मित्र भेटले ..म्हणून त्यांच्या आग्रहामुळे व्यसन सुरु केले ..कधी कधी कंटाळा आला म्हणून .. बोअर झालो म्हणून ..आणि आनंदाच्या प्रसंगात देखील आनंद द्विगुणीत करण्यासाठी म्हणून व्यसन केले ' हे उत्तर लिहून मोरे सरांना भेटायला गेलो .. त्यांनी उत्तर वाचले अन विचारले ' जेव्हा जेव्हा तू निराशा ..दुखः अपेक्षाभंग झाल्यामुळे व्यसन पुन्हा सुरु केले तेव्हा व्यसन केल्यामुळे तुझ्या समोरील समस्या नष्ट झाली का ? ' याचे उत्तर नाही असेच होते ..कारण व्यसन करून मी फक्त माझ्या मानसिक अवस्थेत तात्पुरता बदल करू शकलो होतो ..नंतर नशा उतरल्यावर पुन्हा समस्या तशीच होती .. पुन्हा त्यांनी प्रश्न विचारला .. ' जुने मित्र तुला वाटेत भेटले होते ?..तुझ्या घरी आले होते की तू त्यांच्या कडे गेला होतास ? ' ...खरे तर मीच खूप दिवस भेट झाली नाही म्हणून व्यसनी मित्रांना भेटायला गेलो होतो .. आणि त्यांना व्यसन करताना पाहून मला देखील व्यसन करण्याची तीव्र इच्छा झाली होती .. त्यांनी फारसा आग्रह केला नव्हता पण मीच एकदा घ्यायला काय हरकत आहे असे म्हणून व्यसन केले होते त्यांच्या सोबत .. मी सरांना खरे ते सांगितले ..' एकदा व्यसन करून तुला थांबता आले का ? ' सरांचा पुढील प्रश्न तयारच होता ..मी अंतर्मुख होऊन उत्तर शोधू लागलो .. फक्त एकदाच घ्यायचे असे म्हणून मी काही काळच्या व्यसनमुक्ती नंतर पुन्हा व्यसन करत होतो ..मात्र एकदा घेतल्यावर पुन्हा एका आठवड्याभरातच मला पुन्हा तीव्र इच्छा होऊन मी पुन्हा ' फक्त आजच ' ' एकदाच ' असे म्हणून व्यसन करीत होतो ..आणि मग रोजच सुरु होई ...सरांना तसे सांगितल्यावर ' म्हणजे तुझ्या हे लक्षात आले असेल की तू या पुढे कोणत्याही कारणाने जर ' फक्त एकदा '..' आजच ..थोडेसेच ' असे करून व्यसन केले तरी नंतर तुला राहवत नव्हते .. नियमित व्यसन सुरु होत होते ' सरांच्या या बोलण्याला मी दुजोरा दिला होता .

शेवटचे म्हणून भेटायला गेलो तेव्हा सरांनी सुटी मिळणार म्हणून माझे अभिनंदन केले ..म्हणाले ' एकंदरीत तू येथे खूप छान सहभाग दिलास .. माँनीटर पदाची जवाबदारी देखील चांगली पार पाडलीस ...तुला कालच बुद्धिबळ स्पर्धेत देखील पहिले बक्षीस मिळाल्याचे कळले मला .. त्यांच्या स्तुतीने मी सुखावलो होतो ..पण आता ' मुक्तांगण ' मधून बाहेर पडल्यावर तुझी खरी परीक्षा आहे .. बाहेर अनेक गोष्टी तुझ्या मनाविरुद्ध घडतील .. जीवनात अनेक चांगली वाईट वळणे येतील .. काही घटना घडतील ज्यामुळे तुझ्या मनात पुन्हा दुखः ..निराशा ..भीती ..राग .. वैफल्य या भावना निर्माण होतील .. अशा वेळी तुला विशेष काळजी घ्यावी लागेल ..अर्थात सध्या तू फक्त एकच दिवस जातोय म्हणा .. पण लक्षात ठेव या ऐक दिवसात देखील काहीही होऊ शकते ..मुख्य म्हणजे तुला पूर्वी व्यसनामुळे मिळेल आनंद तुझ्या मनातून सहजा सहजी पुसला जाणार नाहीय ..तुला कदाचित संधी मिळताच तीव्रतेने व्यसन करण्याची ओढ निर्माण होईल .. तेव्हा जरा सांभाळूनच राहावे लागेल तुला . असे म्हणत सरांनी मला शुभेच्छा दिल्या . मुक्तांगण मध्ये त्यावेळी प्रत्येक गुरुवारी डिस्चार्ज होत असे ..म्हणजे आठवड्यातून एकदा एकदमच चार पाच जणांना डिस्चार्ज मिळत होता ..डिस्चार्ज च्या वेळी प्रत्येकाला आपले मनोगत व्यक्त करावे लागे .. म्हणजे हा सगळा कार्यक्रम पार पडेपर्यंत दुपार झाली असती ..म्हणजे जेवण करूनच मला निघता आले असते !

========================================================================

 भाग १६० वा  भावपूर्ण निरोप समारंभ !
पस्तीस दिवस उपचार पूर्ण करून पुन्हा आपल्या घरी जाणाऱ्या मित्रांचा निरोप समारंभ म्हणजे ' मुक्तांगण ' मधील अतिशय हृद्य आणि भावपूर्ण असा कार्यक्रम असतो ..त्या दिवशी आम्ही एकूण पाच जण डिस्चार्ज होणार होतो ...दोन मुंबईचे ..दोन पुण्यातले आणि मी नाशिकचा ... माझ्या डिस्चार्ज करिता कोणी घरून येणे शक्यच नव्हते ..इतरांचे पालक आलेले होते .. पूर्वी या कार्यक्रमाला 'निरोप समारंभ ' म्हणत असत नंतर ' आंतरदीप ' असे नाव दिले गेले आहे .. ' आं तरदीप ' म्हणजे हृदयात व्यसनमुक्तीचा दिवा प्रज्वलित करणे ...केवळ व्यसनमुक्तीच नव्हे तर एकंदरीतच आदर्श जीवनाची शिकवण घेवून मुक्तांगण मधून बाहेर पडणाऱ्या व्यक्तीची प्रेरणा टिकविण्यास मदत करणाऱ्या या कार्यक्रमाला बहुधा सगळे समुपदेशक देखील उपस्थित असतात .. स्वतः मँडम देखील या दिवशी पालकांना मार्गदर्शन करीत असत .आम्ही पाच जण विशेष उत्साहात होतोच परंतु वार्डमधील इतर मित्र देखील आनंदात होते .. वेगवेगळ्या जातीधर्मांच्या ..संस्कृतींच्या ..सर्वांची वार्डमध्ये निखळ मैत्री निर्माण होते .. सामुहिक जीवनाचे धडे घेवून मनातील सारे भेद भाव नष्ट झालेले असतात .. फक्त ' मानवता ' हीच शिकवण इथे दिली जाते ..हे सगळे आता बाहेरच्या जीवनात नव्याने उभे राहण्यासाठी सज्ज झालेले असतात .. सुरवातीला ' बंधू ' ने डिस्चार्ज होणाऱ्या सर्व लोकांची नावे वाचून दाखवली व सर्वांसाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवण्याचे आवाहन केले .. खूप जोरदार टाळ्या वाजल्या .. नंतर बंधू ने खास त्याच्या गमतीदार.. विनोदी शैलीत डिस्चार्ज होणाऱ्या मित्रांच्या स्वभावाबद्दल वार्डमध्ये आलेले अनुभव ...सांगितले योगाभ्यासाचा कंटाळा करणारा इरफान कसे योगाच्या वेळी निरनिराळी कारणे सांगून योग्याभ्यास टाळत असे .. नेमक्या थेरेपिच्या वेळी .. संडास बाथरूम मध्ये वेळ घालविण्याचा प्रयत्न करणा-या महेशला ' रघु' कसा बरोबर शोधून काढी...माँनीटर झाल्यावर मी कसा जगाचे ओझे खांद्यावर वागवत असल्यासारखा धावपळ करी ...चौथ्यांदा उपचार घेण्यासठी आलेला अनिल येथे जणू हिल स्टेशन वर आल्या सारखा कसा मजेत राहतो .. ' बंधू ..चाहे तो दिन में चार बार भांडी ड्युटी करूंगा ..झाडू मारुंगा ..मगर थेरेपी को मत भेजो अशी विनंती करणारा राजेश .. सगळे नमुने एक एक !

बंधूची प्रस्तावना आणि निरोप घेणाऱ्या मित्रांची माहिती सांगून झाल्यावर मग .. आम्हाला एकेकाला आमचे मनोगत व्यक्त करण्यास सांगितले गेले .. बहुधा सर्व जण येथून बाहेर पडण्याचा आनंद असला तरी इतक्या चांगल्या वातावरणातून ..असे मित्र सोडून जावे लागतेय या बद्दल खेद देखील व्यक्त करत बोलत होते .. प्रत्येकाने या पुढे मी अजिबात व्यसन करणार नाही असा निश्चय व्यक्त केला .. ' मुक्तांगण ' म्हणजे आमचे माहेर आहे असे मत अनिल ने व्यक्त केल्यावर ..गम्मत म्हणून बंधूने .. अहो पण माहेरी सारखे सारखे गेले तर सासर दुरावते ... . असा टोमणाही मारला .. सगळे वातावरण हलके ..गमतीदार आणि तितकेच संवेदनशील झाले होते .. मी एक दिवस घरी जावून पुन्हा येणार असल्याने फारसा बोललो नाही ..येथे खूप काही शिकण्यासारखे आहे त्यासाठी एक दिवस घरी जावून पुन्हा शिकणे सुरु ठेवण्यासाठी परत येथे राहायला येणार आहे असे सांगितले . पालकांपैकी कोणाला काही बोलायचे आहे का असे विचारल्यावर .. महेशची म्हातारी आई उभी राहिली .. तिच्या डोळ्यात पाणी आले होते .. माझा महेश मला परत मिळाला ...येथे आणण्यापूर्वी तो माणूस राहिला नव्हता .. घरात रोज भांडणे .. कटकटी .. आर्थिक ओढाताण .. होत असे .. त्याला येथे आणल्यापासून घर खूप शांत होते .. येथे मी १५ दिवसांनी महेशला भेटले तेव्हा त्याने या पुढे व्यसनमुक्त राहीन असे सांगून माझ्या मनावरचे ओझे हलके केलेय ..आता मी सुखाने पुढच्या प्रवासाला जाण्यास मोकळी झालेय असे म्हणून सर्वांच्या मनात घर केले .. ! राजेशची पत्नी बोलायला उभी राहिली परंतु ..अचानक तीला रडू कोसळले ..ती ओक्साबोक्शी रडू लागली .. कदाचित तीला राजेश ने व्यसनाच्या काळात दिलेला सर्व त्रास आठवला असावा .. किवा आता या पुढे तो त्रास होणार नाही या मुक्ततेच्या भावनेने असावे .. तीला अश्रू आवरेनासे झाले असावेत ...तीने नुसतेच सर्वाना हात जोडले ..एकही शब्द न उच्चारता फक्त कळकळीने हात जोडून ती जणू सर्वांना व्यसनमुक्त राहण्याची विंनती करत होती .. तिचे अश्रू पाहून अनेकांचे हृदय हेलावले .. आम्ही जरी खूप संवेदनशील असलो तरी ..स्वतच्या पत्नीच्या ..आईवडिलांच्या ..मुलांच्या भावना ओळखू शकत नव्हतो हे जणू तीने दर्शवले होते .

सर्वात शेवटी बंधू ने मँडम ना मार्गदर्शनपर बोलण्याची विनंती केली ..इतका वेळ मँडम समोर बसून सर्वांचे बोलणे लक्षपूर्वक ऐकत..नेहमीप्रमाणे त्यांच्याजवळ असलेल्या डायरीत काही टिपणे करीत होत्या .. त्यांनी आधी सर्वाना ..नव्या व्यसनमुक्तीच्या जिवनाच्या शुभेच्छा दिल्या .. मग सर्वांचे कौतुक करत आता हा प्रवास सुरु झालाय ..सतत आत्मपरीक्षण करणे गरजेचे आहे अशी सूचना दिली .. व्यसनाधीनता हा अतिशय घातक आजार असून नेहमी सावध रहावे.. जेव्हा वेळ मिळेल तेव्हा येथे भेटायला येवून पाठपुरावा करावा .. केवळ व्यसनमुक्तीच नाही तर आपले स्वभाव दोष कसे निघून जातील आणि आपल्यातील उत्कृष्ट मानव बाहेर काढण्यासाठी सतत प्रयत्नशील असाले पाहिजे .. पुढे त्या म्हणाल्या ' जर आज आपला देश पारतंत्र्यात असता तर कदाचित तुम्ही सगळे ..येथे नाही ...तर तुरुंगात असता ..कारण स्वातंत्र्यसैनिकांची मनोवृत्ती आहे सगळ्यांची ..मनात घेतलेली गोष्ट पूर्ण करण्यासाठी तन ..मन.. धनाचे समर्पण करण्याची हिम्मत आहे ..मात्र नेमकें हे समर्पण व्यसन करण्यासाठी वापरले गेले .. या पुढे असेच समर्पण व्यसनमुक्ती आणि कुटुंब ..समाज .. निसर्ग यांच्या उपयोगात येण्यासाठी वापरले तर .. तुम्ही सगळे खूप मोठे कार्य करू शकाल ' असे सांगत पुन्हा सर्वाना शुभेच्छा दिल्या . ..पालकांनी आज पर्यंत खूप सोसले आहे .. त्यांनी आता आपला माणूस चांगला वागेल यावर विश्वास ठेवून निश्चिंत झाले पाहिजे तरी देखील एकदम त्याच्या हाती जास्त पैसे देणे टाळावे ..नेहमी त्याचे पोट भरलेले राहील असा कटाक्ष ठेवावा कारण पोट भरलेले असले की व्यसनाची ओढ कमी होते ..कदाचित पुन्हा एखाद्यचे व्यसन सुरु झाले तर गोंधळून न जाता त्याला पुन्हा उपचार देणे गरजेचे आहे .. दहावीच्या परीक्षेत जसे सगळेच विध्यार्थी एकदम पास होता नाहीत तसेच या आजाराचे आहे .. काही जास्त जिद्दी ..हट्टी ..प्रामाणिकपणे आभ्यास न करणाऱ्या मुलांना पुन्हा प्रयत्न करावे लागतात .. तसे आपल्या माणसाच्या बाबत देखील घडू शकते याची जाणीव ठेवावी ..असे पालकांना आवाहन केले .. व आपल्या व्यसनाधीनतेच्या काळात पालकांनी खूप काही सहन केलेय . आणि तरी देखील आपल्याला माफ करून ते पुन्हा आपल्या पाठीशी उभे आहेत त्या बद्दल कृतज्ञता बाळगली पाहिजे असे आम्हाला सांगितले !

2 टिप्‍पणियां:

  1. मागील भाग वाचून अनेक दिवस झाले. पुढील भागाची आतुरतेने वाट पाहत आहोत. आपले सर्वकाही ठीक चालले आहे ना? एवढे दिवस लिखाणा मध्ये खंड पडला की अस्वस्थ वाटू लागते. या व्यसनाने बळी घेतलेल्यामध्ये काही जवळच्या व्यक्ती आहेत.हे किती भयंकर व्यसन आहे याचा अत्यंत कटू अनुभव आहे. आपले करावे तेवढे कौतुक थोडेच आहे. आपल्या कामाची समाजाला, विशेषतः व्यसनी व्यक्ती व त्यांचे नातेवाईक, मित्रपरिवार यांना अतिशय गरज आहे. कृपया लेखन नियमित चालू ठेवावे. आपल्याला अनेक शुभेच्छा.

    जवाब देंहटाएं