प्रस्तावना !

माझ्या जीवनप्रवासा बद्दल ' मला समजलेला देव ..अल्लाह .गाँड वगैरे ' ही लेखमाला लिहितो आहे .. याचे प्रमुख कारण म्हणजे .. बालपणापासून एखाद्याला पडणारे स्वाभाविक प्रश्न .. त्यांची न मिळणारी उत्तरे ..बालसुलभ कुतूहल .. त्यापोटी धाडसी वर्तन .. त्यातून होणारा अनर्थ ..तारुण्यात प्रवेश करताना केलेल्या चुका .. एकदा भरकटल्या वर आयुष्याची होणारी फरफट ..त्यातून सावरण्याची केविलवाणी धडपड .. यश ..अपयशाचा लपंडाव .. आणि त्यातून मला झालेले जीवन दर्शन कदाचित वाचकांना काही शिकण्यास मदत करू शकेल असे वाटले .. व्यसनाधीनता हा भयानक मनो -शारीरिक आजार .. तो होण्याची कारणे .. त्यामुळे व्यसनी व्यक्तीचे व त्याच्या जवळच्या नातलगांचे होणारे गंभीर नुकसान या सगळ्या बद्दल सविस्तर माहिती मिळून त्यातून कोणाला सावरण्याची संधी मिळाली .. सुधारणेची शक्ती मिळाली कोणाचे जीवन सुरळीत झाले तर मी नक्कीच स्वतःला भाग्यवान समजीन....
तुषार नातू -फेसबुक प्रोफाइल
ब्लॉग संबंधी सूचना आपण comment box मध्ये देऊ शकता , किंवा मेल करा : tusharnatublog@gmail.com



बुधवार, 27 मार्च 2013

हम तुमसे जुदा होके.....

भाग १४६ वा   हम तुमसे जुदा होके ..मर जायेंगे ..रो रो कें !


अनघाला शेवटचे भेटून ८ महिने होऊन गेले होते ..इतक्या कालावधीत ..तिच्याबद्दल काहीच माहिती मिळू शकत नव्हती .. वडील गेल्यावर जेव्हा बहिण आली होती तेव्हा तीला विचारण्याचा प्रयत्न केला तर तीने सरळ उडवून लावले ... अनघाचा विषय सगळे जणू विसरूनच गेले होते ..फक्त मीच वेड्यासारखा तिची भेट नक्की होईल असा विचार करत होतो ... अनघाच्या बाबतीत देखील अपराधी पणाची भावना मनात होती ..किमान तीला एकदा भेटून तिची माफी तरी मागावी अशी इच्छा होती मनात .. पोलीस भरतीचे पत्र मिळाल्यावर स्वभावाप्रमाणे उगाच पुढील स्वप्ने पाहू लागलो ..आपण जर यात निवडलो गेलो तर ...तर ट्रेनिंग संपले की लगेच ..अनघाच्या आईबाबांना भेटायचे अश्या योजना मनात आखत होतो .. पुन्हा व्यसन सुरु होऊ नये म्हणून शक्यतो घराच्या बाहेर पडत नसे .. वाचन ..टी.व्ही यातच वेळ घालवत होतो .. पण मनावरची वैफल्याची छाया कमी होत नसे ...अनघाची जुनी पत्रे .तिचा फोटो पाहावा म्हणून एकदा माझी सगळी कागदपत्रे शोधली तेव्हा काहीच सापडले नाही ..मग समजले की आईने ते सगळे तिच्या ताब्यात घेवून त्याची विल्हेवाट लावली होती ..कदाचित आईला भीती असावी की हा या पत्रांचा पुढे गैरवापर करून अनघाला आणि तिच्या कुटुंबाला भावनेच्या भरात त्रास देवू शकेन ..आणि तसेही झाले नाही तरी ती पत्रे सारखी सारखी वाचून ..फोटो पहात राहून अनघाला विसरणे कठीण होईल याला ..आणि नव्याने उभे राहण्यास अडचण येईल ..आईने काय विचार केला होता ते तिलाच माहित पण ती पत्रे असती तर तेव्हढाच माझ्या मनाला आधार झाला असता असे वाटत होते .. ती पत्र आणि फोटो गायब केल्याबद्दल आईचा राग देखील मनात होता .

भरतीच्या दिवशी माझ्या सोबत भाऊ देखील आला होता ..सी .बी.एस जवळील पोलीस परेड ग्राउंड वर प्रचंड गर्दी जमलेली होती ..सुमारे ५०० जागांसाठी एकूण १० हजार तरुण आलेले दिसत होते ... ज्यांना सेवायोजन कार्यालयातून पत्र गेले होते अशी माझ्यासारखी मुले तर होतीच ..पण पत्र मिळाले नाही मात्र कोठून तरी माहिती मिळाली ..वर्तमानपत्रात बातमी वाचली म्हणून देखील अनेक तरुण आले होते .. बाहेरगावाहून आलेल्या तरुणांनी तर रात्रीपासूनच ग्राउंड वर मुक्काम ठोकलेला दिसत होता ..इतकी गर्दी पाहून माझ्या मनात आधीच निराशा दाटून आली ....उगाच बावचळून गेल्यासारखे झाले ..आत्मविश्वास संपुष्टात आला होता .. ऐरवी सगळीकडे आत्मविश्वासाने वावरणारा मी येथे का कच खाल्ली याचे कारण अजूनही समजत नाहीय मला ..भाऊ सारखा मला धीर देत होता ...ती प्रचंड गर्दी पाहून वाटले ...ही इतकी बेरोजगारी निर्माण कशी झाली ? ... लोकसंख्या वाढ म्हणून ..की राज्यकर्त्यांचे अपयश म्हणून ..आधीच महाराष्ट्रात त्यावेळी मुख्यमंत्र्यांनी झिरो बजेट म्हणून सरकारी नोकर भारती थांबवलेली होती ..त्यात अशी संधी मिळणे कठीण म्हणून इतके लोक जमले असावेत ...स्वातंत्र्य प्राप्ती नंतर देशाच्या जनतेशी ..जनतेच्या समस्यांशी .. विकासाशी काहीही संबंध नसलेले राज्यकर्ते मोठ्या प्रमाणात निरनिराळ्या राज्यात सत्तेवर आले ..अयोग्य नियोजन .. इच्छाशक्तीचा अभाव ..सत्ता सांभाळण्यासाठी करावी लागणारी कसरत ..आणि स्वतच्या साम्राज्याचा विस्तार या नादात नेत्यांनी जनतेकडे दुर्लक्षच केलेले होते ..निवडणुका जवळ आल्या की जोरदार प्रचार करून ..वस्तू ..दारू ..पैसे यांचे वाटप करून एका महिन्याभरात पुन्हा गरीब ..अशिक्षित .. मतदाराचे हक्क ..लोकप्रतिनिधींची जवाबदारी वगैरे काहीही समजत नसलेल्या लोकांना गाड्यातून भरभरून आणून पुन्हा सत्ता ताब्यात घ्यायचे राजकारणी लोकांचे तंत्र छानच होते . याला कारण देशातील सुशिक्षित ..पांढरपेश्या वर्ग ..उच्चमध्यम वर्ग यांची मतदानाबाबतची उदासीनता देखील कारणीभूत असावी !शिवाय अठरापगड जाती ..अनेक धर्म यांच्या वेगवेगळ्या अस्मिता ..जनतेतील विसंवाद ... तत्वांना महत्व देण्यापेक्षा ...व्यक्तिना महत्व देणारा समाज !

प्रत्यक्ष भरतीच्या वेळी जेव्हा मला शारीरिक मापे घेण्यासाठी बोलाविले तेव्हा आधी माझे वजन नोंदवले गेले ..मग उंची मोजली गेली ...शेवटी छातीचे माप घेताना गडबड झालीच .. इतकी वर्षे व्यसने करून मी तब्येतीचे वाटोळे केलेले होते .. गेले काही महिने जरी व्यसन बंद होते तरी .. तब्येतीत म्हणावी तशी सुधारणा झालेली नव्हती .. माझ्या छातीचे माप एक इंच कमी भरले ... मी हिरमुसला होऊन बाजूला उभा राहिलो ...एका परीक्षकाला बहुधा माझी दया आली असावी ..त्याने मला परत छातीचे माप देण्यास सांगितले ..पुन्हा तेच झाले... शेवटी निराश मनाने सायंकाळी घरी परतलो .. भाऊ माझी अवस्था समजू शकत होता .. ' अरे इतके मनाला लावून घेवू नको ..आता तुझे वय २७ वर्षे आहे ..सरकारी नोकरी साठी अजून तीन वर्षे तू प्रयत्न करू शकतो .' असे मला सांगत होता ..त्या दिवशी घरी आल्यावर कोणाशीही बोलावेसे वाटेना ..माझा खूप मोठा पराभव झाल्यासारखे वाटत होते ..जिवनाच्या सर्वच क्षेत्रात मी हरलो होतो ही भावना मनात येत होती ...आता तर अनघा ची भेट अजून दुरापास्त झाली होती ..कधी कधी वाटे कुणाला न सांगता अकोल्याला निघून जावे ..कसेही करून अनघाचा शोध घ्यावा ..पण असे जबरदस्ती अनघाला भेटण्याचा प्रयत्न करणे .. मनाला पटत नव्हते ..जर तिच्या आईवडिलांना पसंत नसेल तर आमच्या भेटीला काही अर्थ नव्हता ...शिवाय आता अनघा माझ्याशी कशी वागेल या बाबत मनात शंकाच होती ....जर तीच्या मनात असते तर तीने नक्कीच मला कसाही करून संपर्क केला असता ... असेच निराशेत दिवस ढकलत होतो ..तेव्हा एका परिचितांकडून नव्याने सुरु झालेल्या ' नागजी मेमोरियल हॉस्पिटल ' कडून सुरु करण्यात आलेल्या ' मेडीकार्ड ' ची योजना राबवून जास्तीत जास्त लोक या योजनेत सामील करून घेण्यासाठी प्रतिनिधी नेमणार आहेत अशी माहिती समजली ..व त्याच परिचितांच्या ओळखीने ' हॉस्पिटल रिप्रेझेंटिटिव्ह ' या पदावर माझी तात्पुरती नेमणूक देखील झाली ..दीड हजार रुपये पगार आणि प्रवासभत्ता मिळणार होता .. सुरवातीला नाशिक शहर .. नाशिक महापालिकेच्या हद्दीत हे काम करायचे होते ..व्यक्तिगत मेडीकार्ड आणि कुटुंबाचे मेडीकार्ड असे दोन प्रकार होते ..तीन वर्षांसाठी म्हणून एकदा सदस्यत्व घेतले की दरवर्षी अश्या व्यक्तीला सवलतीच्या दरात संपूर्ण मेडिकल चेकअप करून घेता येणार होता ..तसेच नागजी हॉस्पिटल च्या उपचार खर्चात देखील काही टक्के सवलत मिळणार होती ..एकूण पाच जण तेथे रिप्रेझेंटेटिव्ह म्हणून कामाला लागलो होतो .. आधी तीन दिवस आमचे ट्रेनिंग झाले ..म्हणजे संभाव्य ग्राहकांना नियमित मेडिकल चेकअपचे महत्व समजावून देणे ..त्यांच्यात आरोग्यजागृती करणे .. आणि मग ठराविक पैसे भरून सदस्यत्व घेण्यासाठी त्यांना आग्रह करणे ह एकम होते ..थोडक्यात संभाव्य ग्राहकांना वेगवेगळे गंभीर आजार सांगून घाबरविणे ..आणि त्यांना ग्राहक करून घेणे .

वेगवेगळी सरकारी कार्यालये .. व्यावसायिक .. श्रीमंत वर्ग अश्या ठिकाणी फिरून आम्हाल हे काम करायचे होते .. प्रत्येक प्रतिनिधीने महिन्याला किमान दहा तरी सदस्य करावेत तरच नोकरी टिकेल असे बंधन होते ....सुरवातीला उत्साहाने फिरलो .काम वाटले तितके सोपे नव्हते .. लोक अनेक प्रकारचे प्रश्न विचारीत त्यांचे समाधान करावे लागे ..सगळ्यात महत्वाचा प्रश्न म्हणजे तर चक्क अंधश्रद्धा होता ..नागजी मेमोरीला हॉस्पिटल ज्या जागी सुरु करण्यात आले होते त्या जागी खूप पूर्वी स्मशान होते .. कालांतराने स्मशान म्हणून वापर कमी होत गेल्यावर मग नागजी मेमोरिअल हॉस्पिटल त्या जागेवर उभे राहिले होते ...तसेच त्या वेळचे सगळ्यात अद्ययावत हॉस्पिटल असल्याने बहुधा एकदम शेवटच्या टोकाला असलेल्या केसेस ..अपघाताच्या केसेस वगैरे नागजी मध्ये भरती केल्या जात असत ..त्यातील काही लोकांचा मृत्यू झाल्याचा लक्षणीय आकडा होता ..त्यामुळे जनमानसात नागजी हॉस्पिटल बद्दल एक धास्ती होती .. आम्हाला ट्रेनिंग मध्ये हे आधीच सांगण्यात आले होते ..व असे स्मशाना संबंधी प्रश्न विचारले कोणी तर ..त्या लोकांना आम्ही तेथे शुद्धीकरण करून घेतले आहे ..भूमिपूजा वगैरे साग्रसंगीत करून घेतलेली आहे ..त्यामुळे घाबरण्याची आवश्यकता नाही असे समजावून सांगण्याच्या सूचना दिल्या होत्या ..अर्थात लोकांना कितीही समजावून सांगितेले तरी बहुधा त्यांची भीती कमी होत नसे .. पहिल्या महिन्यात मी कसेतरी दहा सदस्य बनवून नोकरी टिकवली ... पण मनात सारखे अनघाचे विचार ...निराशा .. अश्या भावनिक स्थितीमुळे पुढे पुढे कामावर जावेसेच वाटेना ... जर आयुष्यात अनघा नसेल तर मग ..नोकरी ..घर .. पैसा मिळवूनही काय फायदा असा विचार मनात येई ..या निराशेच्या ..अपराधीपणाच्या भावनेत पुन्हा रात्रीची झोप येईनाशी झाली ... रात्री उशिरापर्यंत कुस बदलत जागा रहात होतो ...अनघा भेटू शकणार नाही म्हणजे जणू माझी ऊर्जाच संपुष्टात आल्यासारखे झाले होते ..हळू हळू कामावर जाण्याऐवजी ब्राऊन शुगर नाही पण वाघाडीत जावून गावठी दारूच्या अड्ड्यावर बसू लागलो .. दारू पिवून मग एखाद्या बागेत जावून बसायचे तेथेच बसून लोकांना भेटी दिल्याच्या म्हणजे होम व्हीजीटस केल्याही खोटी नावे लिहून रिपोर्ट तयार करायचा असे सुरु झाले .

====================================================================================

भाग १४७ वा  मुझको देखे बिना ..करार ना था ,एक ऐसा भी दौर गुजरा है !


नागजी हॉस्पिटलच्या नोकरीत दारू पिणे सुरु झाल्यावर .. दांड्या वाढणे स्वाभाविक होते .. खोटे रिपोर्ट लिहून सादर करणे सुरु झाले .. पूर्णतः व्यसन बंद ठेवण्याच्या वेळी प्रत्येक व्यसनीला ही अडचण येवू शकते .. तो त्याचे मूळ व्यसन न करता पर्यायी व्यसन ( सबस्टीट्यूट ) करण्याचा प्रयत्न करतो ..म्हणजे ब्राऊनशुगरचा व्यसनी असेल तर ब्राऊन शुगरने जास्त नुकसान होते अशी स्वतची समजूत करून घेवून त्या ऐवजी जरा स्वस्त असणारी ..दारू , गांजा , झोपेच्या गोळ्या , ताडी अशी इतर व्यसने करून..आपली ब्राऊन शुगर तर बंद आहे ..मग ही व्यसने करण्यास काही हरकत नाही असे स्वतःचे खोटे समाधान करून घेतो ..तसेच जर तो व्यसनी आधी दारुडा असेल तर ..दारू बंद केल्यावर ..वास न येणाऱ्या इतर नशा म्हणजे गांजा ..भांग.. ताडी ..झोपेच्या गोळ्या वगैरे घ्यायला सुरवात करू शकतो ...याचे कारण असे की संपूर्ण व्यसनमुक्ती किवा कोणतेही मादक द्रव्य न घेता जिवन व्यतीत करणे ही कल्पना अमलात आणणे त्याला कठीण वाटत असते .. नशेत राहण्याची शरीर .मनाला इतकी सवय होते की कोणतीतरी नशा केल्याखेरीज त्याला चैन पडत नाही .. पैसा ..घरची परिस्थिती .. त्याच्यावरील व्यसनमुक्तीचा दबाव ..या साऱ्या गोष्टींचा विचार करून ..कोणाला लवकर समजू शकणार नाही ..तुलनेत जास्त नुकसान होणार नाही अशी नशा करण्याचा प्रयत्न करतो ..अर्थात त्याचे असे पर्यायी व्यसन करणे तितकेच घातक असते ..कारण पुन्हा लवकरच तो पुन्हा त्याच्या मूळ व्यसनाकडे वळतो .. कधी कधी तर आधीचे व्यसन आणि नंतर चे पर्यायी व्यसन अशी दोन्ही व्यसने सुरु राहून अधिक अधिक नुकसान होता जाते ..माझेही तसेच झाले होते ...माझ्या अंतर्मनातील निराशा ..वैफल्य ..दुखः ..अन्यायाची भावना ..अनघा प्रकरणी आलेला घरच्या लोकांचा राग ..वडील गेल्यानंतर निर्माण झालेली अपराधीपणाची भावना ....या भावनिक गोंधळामुळे मी आतून अतिशय बैचेन होतो ..त्यातच भविष्यकाळाची चिंता ..भूतकाळातील पश्चाताप ..वगैरे होतेच ..मी वाघाडीत दारू पिवून तेथे अड्ड्यावर जास्तीत जास्त वेळ घालवू लागलो होतो ...सोबत विरहाची ..प्रेमभंगाची .. गाणी होतीच जगातील सगळ्यात दुखी: जीव मीच आहे .. सर्वात जास्त अन्याय माझ्यावर झालाय ..सारे जग निष्ठुर आहे ..कोणाला माझी पर्वा नाही वगैरे विचार तर सतत मनात येत राहतात ..अनघाची भेट ही एकमात्र आशा देखील हळू हळू लोप पावत चालली होती ..अनघा मला अशी कशी विसरू शकते ? हा प्रश्न खूप अवस्थ करणारा होता ..वेगवेगळ्या कल्पना करून मानसिकदृष्ट्या पूर्णतः उध्वस्त होत होतो .

नोकरीचे जेमतेम दोन तीन महिने पूर्ण होईपर्यंत ' मेडिकार्ड ' चे पुरेसे सदस्य न जमवू शकल्याने नोकरी गेली .. सकाळी बस भाड्याचे ...थोडे दारूपुरते पैसे घेवून जो बाहेर पडत होतो तो एकदम रात्रीच घरी येवू लागलो .. दिवसभर जुन्या व्यसनी मित्रांमध्ये टाईमपास करणे ..मिळेल ते व्यसन करत राहणे ..संधी मिळाली तशी ब्राऊन शुगर पिणे देखील सुरु झाले ..आईला सारे कळत होते ..तिचाही नाईलाज झालेला होता .. मला परोपरीने समजावून देखील ' पालथ्या घड्यावर पाणी 'असे झाले होते . पुन्हा खोटीनाटी करणे सांगून आईकडून पैसे उकळणे ... सुरु झाले .. वडील गेल्यावर आईच्या नावे फँमिली पेन्शन सुरु झाली होती ..तसेच वडिलांच्या फंडाचे थोडेफार पैसे मिळाले होते ते सगळे आईच्या नावावर होते .. त्यातून भाऊ एकही पैसा घेत नसे ..आईचा फारसा खर्च नव्हताच .. जास्तीत जास्त पैसे मीच उडवले ...याच काळात एकदा नाशिक शहरात ब्राऊन शुगर चा तुटवडा भासू लागला ..कारण नवीन पोलीस अधिकाऱ्यांनी जरा कडक धोरण अवलंबले होते ..तेव्हा अनेक गर्दुल्ले ...अंबरनाथ येथून स्वस्तात मिळणाऱ्या ब्राऊनशुगर च्या पुड्या आणून एकाच्या दोन पुड्या करून त्या जास्त किमतीत नाशिक मध्ये विकू लागले .. माझ्या आणि माझ्या जिवलग मित्राच्या मनात देखील या कल्पनेने घर केले ..आपणही अंबरनाथहून पुड्या आणून येथे विकल्या तर आपल्या पिण्याचा खर्च भागेलच वर नफा देखील कमावता येईल या विचाराने मनात जोर धरला .. सुरवातीला भांडवल म्हणून किमान पाच हजार रुपयांची तरी गरज होती ..मित्राने एक हजार जमवले ..मी घरी आईला एक व्यवसाय करणार आहे ..मुंबई हून तयार कपडे आणून ते नाशिकमध्ये विकण्याचा असे खोटे सांगून चार हजार रुपये मागितले ..हो ..नाही करत तीने कसे बसे दोन हजार रुपये दिले ..साडेतीन मुहूर्तापैकी एक मानल्या जाणाऱ्या मकर संक्रांतीच्या दिवशी आम्ही दोघे पैसे घेवून अंबरनाथ कडे निघालो ... अंबरनाथला १२ रुपयांना मिळणाऱ्या एका पुडीच्या दोन पुड्या बनवून २५ रुपयाला एक अशी पुडी विकून एका पुडीवर आम्हाला पस्तीस रुपये नफा मिळणार होता ..अंबरनाथ कडे जाताना शेखचिल्ली सारखे स्वप्नरंजन करत होतो एका पुडीमागे ३५ मग १०० पुड्याचे ३५०० ...हजार पुड्यांचे ..३५,००० असा हिशोब करत तासाभरात आम्ही कल्पनेने लखपती झालो होतो .

आधी कल्याण ..तेथून लोकलने अंबरनाथ असा प्रवास केला .. अंबरनाथ रेल्वे फाटक ओलांडून सरळ सरळ जाऊन मग एका चढावर चढले की बकाल वस्ती सुरु होते ..जवळच एक चर्च देखील होते .. त्याकाळी चुनाभट्टी चे अड्डे बंद होऊन मुंबईत स्वस्त माल मिळण्याचे ठिकाण अंबरनाथ झाले होते ..मुंबईच्या एका भागात पोलिसांनी छापे टाकून तेथील अड्डे बंद पाडले की दुसऱ्या भागात ते अड्डे पुन्हा सुरु होत होते ...मग सगळे गर्दुल्ले देखील जेथे अड्डा जवळ आहे अश्या जागी स्थलांतर करत असत ...जंगलातील पाण्याचा एक स्त्रोत आटला की प्राणी जसे पाणी मिळवण्यासाठी दुसरा स्त्रोत शोधून काढतात तसेच होत होते .. फक्त पाणी ही नैसर्गिक गरज होती तर ..ब्राऊन शुगर ही आम्हीच निर्माण केलेली गरज होती ...अंबरनाथला देखील आधी चुनाभट्टी ला पहिले होते तसेच दृश्य पाहायला मिळाले ..त्या वस्तीच्या आसपास सगळीकडे गर्दुल्लेच दिसत होते .. दोनतीन ठिकाणी माल मिळत होता ..एका ठिकाणी जावून आम्ही २४०० रुपयांच्या २०० पुड्या घेतल्या ..आता इतका माल सोबत घेवून जाणे खूप रिस्की होते ..वाटेत पोलीस किवा गर्दुल्ल्यांची टोळी देखील अडवू शकत होती .. आम्ही मुंबईचे किवा स्थानिक नाही हे आमच्या भाषेवरून लगेच समजत होते ..जमेल तशी टप्पोरी मुंबैया भाषा वापरत होतो आम्ही दोघे .. अड्ड्यावरून जास्त माल घेवून जाताना अजून एक धोका असतो तो खबरीचा ..म्हणजे अड्ड्यावरील एखादा गर्दुल्ला ..किवा कधी कधी अड्ड्याचा मालकच पोलिसांना आमचे वर्णन सांगून आम्हाला पकडून देवू शकत होता ..त्यातून त्याचा फायदा असा की पोलीस त्याला माल विकायची सलवत देतात ...कारण त्यांना अश्या टीप दिल्या गेलेल्या केसेस मिळतात ...कारवाई करत असल्याचे रेकोर्ड दाखविता येते ...किवा पकडलेल्या व्यक्तीकडून पोलिसांना पैसे मिळतात ...गर्दुल्ल्याने खबर दिली असेल तर त्याला खूप माल मिळतो पोलिसांकडून ...आम्ही अड्ड्यावरून बाहेर पडताच एका कोपऱ्यात जावून त्या सर्व पुड्या दोन रुमालात बांधून ते हात रुमाल पायाच्या पोटऱ्यांना बांधले ..म्हणजे कोणी झडती घेतली तर खिश्यात काही सापडले नसते ...काही जण अश्या पुड्या हाताला किवा पायाला जखम झाली आहे असा देखावा करून वर बांधलेल्या बँडेज मध्ये लपवतात ..एकाने तर एकदा चक्क पायाला थोडेसे सैल असे ...हाड मोडल्यावर लावतात तसे प्लास्टर लावून त्यात पुड्या लपविल्या होत्या ..व तो इतका बेमालूम पणे कुबडी घेवून लंगडत होता की कोणालाही संशय आला नसता ....पायाला पुड्या बांधून ..झटपट पुन्हा अंबरनाथ रेल्वे स्टेशन ..तेथून कल्याण ..नाशिक असा धास्तीचा प्रवास करून रात्री मित्राच्या घरी पोचलो ..मित्राचे लग्न झालेले होते ..पण त्याच्या व्यसनाला कंटाळून बायको माहेरी निघून गेलेली ..तसेच म्हातारी आई देखील काही दिवसांसाठी नातलगांकडे राहायला गेली होती ..त्यामुळे त्याचे घर रिकामेच होते .. तेथे रात्रभर बसून सगळ्या पुड्या काढून... एकाच्या दोन पुड्या बनविण्याचे काम उरकले .. स्वतचे पिणे सुरूच होते रात्रभर ..खूप नशा करून मग सकाळी आम्ही पुड्या विकायला बाहेर पडलो .

=======================================================================================

भाग १४८ वा  गर्द्विक्री ते ' मुक्तांगण '

आम्ही आणलेल्या २०० पुड्यांपैकी रात्रभरात २० पुड्या दोघांनी पिवून संपवल्या ..उरलेल्या १८० पैकी ५० पुड्यांच्या ...एकीच्या दोन करून १०० बनविल्या आणि त्या पुन्हा पायाला रुमालात बांधून आम्ही बाहेर पडलो ... तो पर्यंत सकाळचे १० वाजून गेले होते .. आधी नाशिकरोड परिसरात फिरलो ..तीन चार पिणारे मित्र भेटले .. त्यांना सांगितले की आमच्याजवळ पण एकदम मस्त माल आहे २५ रु ला एक पुडी... .एकाने २५ रुपये देवून एक पुडी घेतली ..आमची बोहनी झाली .. बाकीचे दोन आता जरा कमी पैसे आहेत .... ४० मध्ये दोन द्या असा आग्रह करू लागले ..त्यांची दया येवून त्यानाही भाव कमी करून पुड्या दिल्या ..एकजण तर पूर्ण कफल्लक निघाला .. आता पैसे नाहीत यार खूप टर्की होतेय एकदोन दम तरी पाजच म्हणून लागला ..त्याचीही दया आली ..आडोश्याला जावून पुन्हा आमचे पिणे सुरु झाले ..त्यालाही तीन चार दम दिले . ...मनातून खूप भीती वाटत होती ..कारण जर पोलिसांनी पकडले असते तर ? ... नवीन झालेला अमली पदार्थ विरोधी कायदा खूप कडक होता .. पकडले जावून पोलीस केस दाखल झाली तर .. सरळ सरळ १२ ते १४ वर्षे जन्मठेप आणि वर एक लाख रुपये दंड झाला असता .. दंड भरायला पैसे तर नव्हतेच पण जर पकडले असते तर आमच्या दोघांच्याही घरचे जामिनच काय ..आम्हाला भेटायला देखील आले नसते पोलीस कस्टडीत ...हे आम्हाला चांगले माहित होते ...मनातील भीती कमी करण्यासाठी मग त्यावर दारू प्यायलो ... म्हणजे अजून जेमतेम तीन पुड्या विकल्या होत्या ..खर्च मात्र १०० रुपये झाला होता ... खूप दारू पिवून मग नाशिक शहरात आलो ..दुपारचे २ वाजले होते ..पंचवटी कारंजा .मालेगाव स्टँड ..भद्रकाली ..शालीमार भागात चक्कर टाकली आठदहा पुड्या विकल्या ...पण त्यापैकी काही सवलतीच्या भावात ..तर काही गर्दुल्ला खूप मागे लागला म्हणून त्याला फुकट पाजण्यात संपल्या .. रात्री ११ वाजे पर्यंत सोबत आणलेल्या पैकी ८० पुड्या संपल्या .. पुन्हा दारू प्यायलो ... थोडेसे जेवण केले हॉटेलमध्ये .. मित्राच्या घरी आल्यावर सगळा हिशोब केला तेव्हा लक्षात आले नफा होण्याऐवजी खर्च जास्त झाला होता ..शिवाय जवळच माल असल्याने आमचे दोघांचे पिणेही खूप झाले होते ....दोघांची त्यावरून जरा वादावादी झाली .. या पुढे कोणालाही फुकट पाजायचे नाही .. उधार द्यायचे नाही .. भाव कमी करायचा नाही असा निर्णय घेवून रात्रभर आम्ही चेसिंग करत बसलो ..पहाटे पहाटे ४ ला झोपलो ते एकदम दुसऱ्या दिवशी दुपारी १२ लाच उठलो ... उठल्यावर आधी उतारा म्हणून पुन्हा १० पुड्या ..बाहेर पडलो ..दारू .. मग नाशिक शहर .. कालचाच प्रकार ..उधारी ..फुकट .. स्वस्त ..आणि आमचे दोघांचे अमर्याद पिणे .. तिसऱ्या दिवशी तेच .. आता जवळचा माल संपत आला होता .. सगळा हिशोब केल्यावर जाणवले की आमचे भांडवल कमी झालेय ..म्हणजे २४०० रुपयांच्या पुड्या आणल्या होत्या ..त्यापैकी विक्री करून ..आमचे पिणे .. वगैरे सगळे करून आता हातात १५०० रुपये उरले होते .. याचा अर्थ मुद्दल पण निघाले नव्हते . ..फक्त भरपूर ब्राऊन शुगर पिणे झाले ..दारू मनसोक्त झाली .. मी दोन दोन दिवसांपासून घराकडे फिरकलो नव्हतो ते वेगळेच .
पुन्हा अंबरनाथ ला गेलो ..या वेळी भांडवल कमी असल्याने १०० पुड्या आणल्या होत्या ..त्या अर्ध्या करून मागच्या सारखेच विक्री केली .. चार दिवसात पुन्हा माल संपला आता जवळ जेमतेम ८०० रुपये राहिलेले ..पुन्हा अंबरनाथ .. एकूण १० दिवसातच सगळे भांडवल संपले ..मध्ये दोन तीन वेळा घरी जावून आलो ..तयार कपड्यांचा धंदा सुरु केलाय त्यात खूप बिझी आहे ..नाशिकरोड ला मित्राकडेच राहतोय असे सांगून आईचे समाधान केले .. जवळ फक्त १० पुड्या उरलेल्या .. एकाने बातमी दिली की काल सकाळी पोलीस एका गर्दुल्ल्या जवळ आमची चौकशी करत होते ..म्हणजे कोणीतरी आम्ही बाऊन शुगर ची विक्री करतोय अशी टीप पोलिसांना दिली होती तर ..कोणत्याही भागात दारूचा अवैध धंदा ..ब्राऊन शुगर किवा गांजा वगैरे अमली पदार्थ विकी सुरु झाल्याची बातमी पोलिसांना जास्तीत जास्त आठ दिवसात कळते .....अर्थात कारवाई करायची किवा नाही ..वगैरे बाबतीत ..चाल ढकल होत रहाते ..कारवाई होणे हे तेथील पोलीस अधिकाऱ्याच्या प्रामाणिकते वर अवलंबून असते ..तसेच काही कायदेशीर अडचणी येवू शकतात .. आमच्या बाबतीत तर कारवाई लगेच होऊ शकत होती ..कारण पकडले गेले तर त्यांना द्यायला आमच्याकडे पैसे तर नव्हतेच आणि घरच्या लोकांचा पाठींबाही नव्हता ..पोलीस आमची चौकशी करत होते हे ऐकून आमची फाटलीच ... दिवसभर मित्राच्या घरातून बाहेर पडलोच नाही .. बरोबर २३ जानेवारी १९९१ जानेवारी ही तारीख होती ..संध्याकाळी नाशिकरोड च्या बस स्टँड वर खिश्यात जेमतेम चार पुड्या ..वीस पंचवीस रुपये उरले होते .. आता पुढे कसे असा आम्ही दोघे मित्र विचार करत असताना सिन्नर फाट्याला राहणारा आमचा गायकवाड नावाचा मित्र भेटला तो देखील आमच्या सारखाच ब्राऊन शुगर चा व्यसनी होता ...त्याची तब्येत चांगली झालेली दिसली .. आमच्या जवळ येवून बसला .. काय कसे काय चाललेय ? असे विचारल्यावर सांगू लागला की त्याला त्याच्या भावाने ' मुक्तांगण ' व्यसनमुक्ती केंद्र पुणे येथे दाखल केले होते ..तेथे तो ३५ दिवस राहून आला होता ..खूप छान वातावरण आहे .. तेथे खूप प्रेमळ आहेत सगळे .. खूप मजा आली वगैरे सांगू लागला .. ते ऐकून माझ्याही मनात ' मुक्तांगण ' ला जावे असे वाटू लागले .. आता बाहेर फिरण्यात धोका होता कारण पोलिसांना कोणीतरी गर्दुल्ल्याने आमचे दोघांचे वर्णन दिले होते ..पोलीस आपल्याला पकडतील ही भीती होतीच ... ' मुक्तांगण ' मध्ये मेंटल हॉस्पिटल प्रमाणेच त्यावेळी १८० रुपये लागत होते असे त्याने सांगितले .. माझ्या मनात ' मुक्तांगण ' ला जाण्याचा विचार जोर धरू लागला .....मित्राला तसे म्हंटले तर तो नकार देवू लागला .. शेवटी उरलेल्या चार पुड्यांपैकी दोन पुड्या मित्राला दिल्या ..दोन स्वतः ठेवल्या ..आणि घरी जायला निघालो ... जरा सावधगिरी बाळगत घरी पोचलो ... आईला सरळ सांगितले की माझे पिणे पुन्हा सुरु झालेय ..या वेळी मी मेंटल हॉस्पिटल येथे न जाता ' मुक्तांगण ' व्यसनमुक्ती केंद्र पुणे येथे जाणार आहे .. आई म्हणाली ते सगळे तू तुझ्या भावाला सांग ..मग भाऊ घरी आल्यावर ..त्याला तसे सांगितले .. आधी खूप चिडला ..तू आयुष्यात कधीच सुधारू शकणार नाहीस असे सुनावले .. शेवटी म्हणाला तिथे मला तुझ्यासोबत यावे लागेल पण आता मला इतक्यात सुटी नाहीय ..तेव्हा शनिवारी जावू आपण पुण्याला .. मला इतका धीर नव्हता ..शिवाय डोक्यावर पोलिसांची टांगती तलवार होतीच .. तिथे सोबत पालक नसले तरी घेतात असे खोटेच सांगितले भावाला ..मला तेव्हढा आत्मविश्वास होता की .मी ' मुक्तांगण ' च्या लोकांना पालक इतर कामात व्यस्त असल्यामुळे येवू शकले नाही असे सांगून .....पालकांच्या सोबतीशिवाय तेथे दाखल होऊ शकेन ...शिवाय भावाला सोबत न नेण्याचा अजून एक स्वार्थ होताच की भाऊ नेहमी मला जेव्हा मेंटल हॉस्पिटलला सोबत घेवून जात असे तेव्हा मला वाटेत अजिबात ब्राऊन शुगर पिऊ देत नव्हता ..त्याच्या सोबत जाताना टर्की सहन करत जावे लागे .. मी एकटा जाईन यावर भावाचा विश्वासच नव्हता .. काहीतरी खोटे सांगून आपल्याकडून पैसे काढण्याचा याचा डाव आहे अशीच त्याची समजूत होती ...तरी त्याला कसेतरी पटवले ..त्यावेळी नशिक-पुणे बसभाडे ४२ रुपये होते ... शेवटी तो उद्या जा ...देतो तुला पैसे असे म्हणाला तेव्हा हायसे वाटले .
जवळच्या दोन पुड्या दुसऱ्या दिवशी सकाळीच संपवल्या .. सायंकाळी पूर्ण कफल्लक झालेलो होतो .. पुण्याला जाण्यापूर्वी एकदा माल घेण्याची इच्छा बाकी होतीच .. पण आता घरून पैसे मिळणे कठीण होते .. रात्री आठ वाजता भावाने मुक्तांगणला जाण्यासाठी भाड्याचे म्हणून १०० अधिक 'मुक्तांगण ' येथे भरायला १८० अधिक वीस रुपये वाटखर्च असे एकूण तीनशे रुपये हाती दिले .अर्थात मी पुण्याला जाईन की नाही याची त्याला खात्री नव्हती म्हणून ..तुला बस मध्ये बसवून द्यायला मी सोबत बसस्टँड वर येतो म्हणाला ..आता वांधे झाले माझे ..कारण मी थेट पुण्याला जाणारच नव्हतो .. येतानाच्या भाड्याचे जे पैसे मिळाले होते त्यातून आधी मी नाशिक मध्येच ब्राऊन शुगर घ्यायचे ठरवले होते .. आता भाऊ सोबत बसमध्ये बसवून द्यायला येतोय म्हंटल्यावर ..मला जाताना शेवटचे पिणे जमणे कठीणच होते ...मग मनात कल्पना आली की एकदा बस सुरु होऊन भाऊ मागे राहिला की बसमधून परत खाली उतरून जायचे .. माल वगैरे पिवून झाला की दुसऱ्या बसणे पुढे जायचे ..छान आयडिया होती .. सी .बी .एस च्या स्थानकावर भावाच्या सोबत स्कुटर वरून पोचलो सोबत एका पिशवीत एक जोडी कपडे ..टॉवेल ..टूथ ब्रश पेस्ट..वगैरे घेतले होते ...नाशीक - पुणे बस लागतातच त्यात चढलो जरा गर्दीच होती बसला .. भाऊ खाली उभा राहून खिडकीतून माझ्याकडे पाहत म्हणाला ---आधी तू तिकीट काढ बसचे ..कंडक्टर जवळ जावून भावाला ऐकू जाईल असे मोठ्याने शिवाजीनगर असे ओरडलो ..आणि पन्नासची नोट कंडक्टर ला दिली ..त्याने तिकीट देवून ...वरचे आठ रुपये मला परत केलेले भावाने खाली उभे राहून नीट पहिले ..मग त्याचे समाधान झाले ..आता हा खरेच पुण्याला जाणार याची खात्री झाली त्याची ...मग तो स्कुटर स्टार्ट करून जायला निघाला ... बसही सुरु झाली .. बस स्टँड च्या बाहेर पडून ..शालीमार कडे जायला निघाली तसे मी एकदम कंडक्टर जवळ जावून बारीक चेहरा करून म्हणालो ' साहेब मी पुण्याला नोकरीच्या मुलाखती साठी निघालोय ..मात्र आता माझ्या लक्ष्यात आले की एक महत्वाचे प्रमाणपत्र घरीच राहिले आहे ..तेव्हा कृपया माझे तिकीट कँन्सल करून मला माझे पैसे परत त्या ..माझा मुद्दा कंडक्टरला पटला ..मात्र असे तिकीट कँन्सल करता येत नाही ..त्या ऐवजी तू दुसऱ्या कोणला तरी बसमध्ये हे तिकीट दे असे तो म्हणाला .. आमचे बोलणे ऐकत असेलला एक जण शिवाजीनगर लाच निघाला होता .. त्याने अजून तिकीट काढलेले नव्हते ..त्याने पटकन मला ४२ रुपये देवून माझ्याकडील तिकीट घेतले ..कंडक्टर ने बेल मारून गाडी थांबवली ..मी खाली उतरलो . भाऊ केव्हाच दृष्टीआड झाला होता .मी मागे वळून मालेगाव स्टँड कडे निघालो ..शेवटचा माल प्यायला !
===========================================================================================

भाग १४९ वा   ' आनंद वार्ड ' 

मालेगाव स्टँड भागात ब्राऊन शुगरच्या अड्ड्यावर पाहतो तर खूप गर्दुल्ले जमलेले होते ..म्हणजे बहुतेक मालाचे वांधे असणार .. तसेच झाले होते .. तेथे माल विकणारा अजून मुंबईहून माल घेवून परत यायचा होता ..तो रात्रीच्या पंचवटी एक्सप्रेस ने येईल या अंदाजाने गर्दुल्ले त्याची वाट पाहत थांबले होते .. मी तेथे न थांबता भद्रकाली भागात आलो ..एका ठिकाणी माल मिळत होता ..पण जास्त भाव सुरु होता ..तुटवडा असला की भाव वाढतातच ... शेवटी मी १०० रु . ला एक पुडी घेतली . ती पुडी आडोश्याला बसून ओढली .. पण समाधान होईना दोन दिवसांपूर्वी माझ्या खिश्यात भरपूर माल होता आणि आज मीच माल शोधात फिरत होतो ....वक्त बदलते देर नाही लगती ...मग परत एक पुडी घेतली ..म्हणजे आता माझ्याकडे फक्त १०० रु . शिल्लक होते ..' मुक्तांगण ' मध्ये भरायचे पैसे देखील मी उडवून टाकले होते ..का कोण जाणे मला तेथे आपण पैसे न भरता कसेही हातापाया पाडून दाखल होऊ शकू असे वाटत होते .. सगळे धंदे उरकून रात्री १० वाजता एकदाचा शिवाजीनगर च्या बस मध्ये बसलो ..तिकीट काढून झाल्यावर आता फक्त ५८ रुपये खिश्यात शिल्लक होते ... पहाटे साडेतीनच्या सुमारास शिवाजीनगर बसस्थानकात बस शिरली .. इतक्या पहाटे कुठे जाणार ? ... तेथे स्थानकातच वर्तमानपत्र टाकून त्यावर पडून राहिलो ... २५ जाने.१९९१ ही तारीख होती ... नाशिकच्या तुलनेत चांगलीच थंडी होती पुण्यात ... कुडकुडत होतो खूप .. नशा उतरली तशी टर्की देखील सुरु झाली ....चहा घेवू म्हणून स्थानकाच्या बाहेर आलो ..यापूर्वी एकदा भावाच्या इंजिनियरिंग कॉलेजच्या अँडमिशनच्या वेळी वडील आणि भावासोबत पुण्यात आलो होतो व नंतर एकदा भाऊ इंजिनियरिंग कॉलेजला शिकत असताना त्याला भेटायला म्हणून ...पुण्याची फारशी माहिती नव्हतीच फक्त शिवाजीनगर रेल्वे स्थानकाजवळ असलेले रेल्वेचे हॉस्टेल ..आणि इंजिनियरिंग कॉलेज हीच दोन ठिकाणे माहित होती .....शिवाजीनगर बस स्थानकासमोरच चहाची दुकाने ..पान टपऱ्या वगैरे होत्या .. चहाच्या टपऱ्या .. हॉटेल्स .. पानपट्ट्या येथे मोठ्या आवाजात टेपवर गाणी वाजवली जात होती ...भजने ..मराठी भक्तिगीते ..हिंदी फिल्मिगीते असा एकत्र गोंधळ सुरु होता ...एका ठिकाणी चहा घेतला .. मग सगळ्या घटनांचा विचार करू लागलो .. पुण्यात आलो होतो खरा .. पण काल रात्री नशेत पैसे उडवले .. आता खिश्यात जेमतेम ४० रुपये उरलेले .. टर्की देखील सुरु झालेली होती ... ' मुक्तांगण ' ला जावे की नाही असा संभ्रम निर्माण झाला मनात ... काल घेतलेले सगळे निर्णय चूक वाटू लागले .. व्यसनी व्यक्ती चंचल असल्याने सारखे निर्णय ..तसेच मानसिक अवस्था बदलत असते ...एका बाकावर विमनस्क बसून राहिलो ... नेमके काय करावे ते समजेना .. जरा सावधपणे चौकशी केली तर समजले की शिवाजीनगर रेल्वे स्टेशनच्या मागील भागात ' वाकडेवाडी ' नावाची वस्ती आहे ..तेथे ब्राऊन शुगर मिळू शकत होती ... उठून सरळ वाकडेवाडी भागात गेलो ..मात्र तेथे काही ब्राऊन शुगर मिळेना .. पुन्हा परत बसस्थानकावर आलो .. मुंबई की ' मुक्तांगण ' घोळ मनात सुरूच होता .. होणाऱ्या टर्की मुळे मुंबई ला जावेसे वाटत होते .. तर चांगल्या जिवनाच्या ओढीने ' मुक्तांगण ' ला ... !
तितक्यात योगायोग म्हणा की चत्मकार म्हणा ... एका पानटपरीवर चक्क मराठी गाणे वाजू लागले ..मोठ्याने ...' या जन्मावर ..या जगण्यावर ..शतदा प्रेम करावे ' त्या अवस्थेत ते गाणे जणू माझ्यासाठी संजीवनी होते ... लगेच उठून त्या पानटपरी वर जावून सिगरेट घेतली .. तन्मय होऊन गाणे ऐकू लागलो ...या गाण्यामुळे अनघाच्या स्मृती जागृत झाल्या .. तिच्या मांडीवर डोके ठेवून सहन केलेली टर्की ... तिचे निरागस निस्सीम प्रेम .. मला वारंवार जगण्याचे बळ देणारे तिचे शब्द .. सारे सारे आठवले .. अनघा आज जगात भले कुठेही असेल तरी आपण व्यसनमुक्त राहावे म्हणून नक्कीच ती प्रार्थना करत असणार असे वाटू लागले .. हळू हळू ' मुक्तांगण ' चा निर्णय पक्का होत गेला .. इतर सगळे विचार झटकून फक्त ' या जन्मावर ' हाच विचार पक्का झाला ..एव्हाना उजाडले होते .. मुक्तांगण चा सविस्तर पत्ता माहित नव्हता ..फक्त येरवडा मेंटल हॉस्पिटल इतकेच माहिती होते .. येरवडा ला जाणाऱ्या बसची चौकशी केली..एकाने कार्पोरेशनच्या स्टँड वरून बस मिळेल येरवड्यासाठी असे सांगितले ..तर एकाने इतक्या दूर जाण्यापेक्षा इंजिनियरिंग कॉलेजच्या बसस्टॉप वर जायला सांगितले ...शेवटी कार्पोरेशन च्या स्थानकावर जावून विश्रांतवाडीची बस पकडली ..वाटेत येरवडा मेंटल हॉस्पिटलच्या स्टॉपवर उतरलो ..समोरच मुक्तांगण व्यसनमुक्ती केंद्राची पाटी होती ..एक छोटा रस्ता सरळ आत मेंटल हॉस्पिटलच्या गेट पर्यंत जात होता .. सावकाश चालत पोचलो एकदाचा मेंटल हॉस्पिटल मध्ये ... सकाळचे आठ वाजत आले होते .. मेंटल हॉस्पिटल च्या गेट वरील अटेंडंट नी मला हटकले .. त्यांना मुक्तांगण ला जायचे आहे असे सांगितले ...त्यांनी समोर एका इमारतीकडे बोट दाखवले ... मी त्या एकमजली इमारतीजवळ पोचलो बाहेर उन्हात बरेच जण बसलेले दिसले .. त्यांच्यावर एकजण देखरेख करत होता .. सगळे माझ्याकडे कुतूहलाने पाहत होते ...माझ्या अवतारावरून मी उपचार घेण्यासाठी आलोय हे उघड होते ..एकदोघांनी माझ्याशी बोलण्याचा प्रयत्न केला तसे त्यांच्या सोबतच्या लक्ष ठेवणाऱ्या माणसाने त्यांना हटकले .. व त्याने माझी चौकशी सुरु केली ..मी डॉ. अनिता अवचट यांना भेटायचे आहे असे सांगतच ..म्हणला 'मँडम १० बजेतक आयेगी ' आपको इंतजार करना पडेगा ... बाजूला उन्हात बिड्या फुकत बसून राहिलो ..टर्की होतच होती .. पण आता निर्धार पक्का होता ..कोणत्याही परिस्थितीत ' मुक्तांगण 'ला दाखल होण्याचा .. जरा वेळाने बाहेर उन्हात बसलेली सर्व मंडळी आत निघून गेली ..मी एकटाच उरलो होतो .

पावणेदहाच्या सुमारास एक मारुती जिप्सी इमारतीजवळ येवून थांबली त्यातून गुलाबी रंगाचा खादीचा कुर्ता घातलेली एक महिला उतरली .. वय साघारण पन्नास असावे ..केस मानेपर्यंत कापलेले .. माध्यम उंची .. चालण्यात प्रचंड आत्मविश्वास आजूबाजूला कुठेच न पाहता ती महिला सरळ पोर्च मधून इमारतीच्या आत शिरली ..मी पण पटकन मागोमाग आत शिरलो .. त्यांनी माझ्याकडे प्रश्नार्थक मुद्रेने पाहिल्यावर ..मला 'डॉ. अनिता अवचट यांना भेटायचे आहे असे म्हणालो ..तर हसून मीच आहे म्हणाल्या ..मी लगेच त्यांच्या पाया पडलो तश्या मागे सरकल्या ..अरे अरे राहुदे असे पुटपुटल्या .. मग मोठ्याने काय काम आहे माझ्याकडे असे म्हणाल्या ...मी एक ब्राऊन शुगरचा व्यसनी आहे ..नाशिकला राहतो ..व्यसनाला खूप कंटाळलोय वगैरे माहिती सांगू लागलो .. शांतपणे सगळे ऐकून मग म्हणाल्या ..तू अर्धवट माहिती घेवून आला आहेस .. इथे ' मुक्तांगण ' मध्ये डायरेक्ट दाखल होता येत नाही ..आधी तुला समोरच्या मेंटल हॉस्पिटलच्या कार्यालयात जावून तेथे रीतसर फॉर्म भरून .. मेंटल हॉस्पिटल च्या ' आनंद ' वार्ड मध्ये दाखल व्हावे लागेल ..नंतर मग साधारण पंधरा दिवसांनी तुला मी तेथे भेटीन आणि तुझी बदली त्या वार्डातून ' मुक्तांगण ' ला करून घेईन ..अतिशय ठाम शब्दात त्यांनी माहिती दिली .. ही माहिती मला नवीन होती ..माझ्या मित्राने मला ही माहिती सांगितलीच नव्हती .. माझा विरस झाला ..तितक्यात आठवले की मी पुण्यात मुक्तांगणला जातो म्हंटल्यावर आईने तेथील डॉ. अनिता अवचट तुझ्या चुलत बहिणीच्या मिस्टरांच्या नात्यात लागतात असे सांगितले होते .. मी त्यांना चुलत बहिणीचे आडनाव सांगून तिच्या मिस्टरांची ओळख सांगितली ..क्षणभर त्यांनी आठवल्यासारखे केले मग हसत म्हणाल्या ..हो बरोबर आहे ..पण इथे नियम पाळावे लागतात .. तुला आधी रीतसर मेंटल हॉस्पिटलला दाखल व्हावेच लागेल ...शिवाय तुझ्या सोबत कोणी तरी नातलग असणे पण गरजेचे आहे ..मग माझ्या खांद्यावर हात ठेवून प्रेमळपणे म्हणाल्या ..जा समोरच्या मेंटल हॉस्पिटलच्या कार्यालयात ..सगळी प्रोसिजर पूर्ण कर ..नंतर आपण भेटूच .. आणि आत वरच्या मजल्याकडे जाणारा जीना चढू लागल्या ..मी जरा हताश झालो होतो ..इतकी गयावया करून ..ओळख सांगूनही ..आधी नियमाकडे बोट दाखवले गेले होते ...त्यावरून डॉ . अनिता अवचट या नक्कीच तत्वांना महत्व देणाऱ्या वाटल्या .. सगळे अधिकारी ..नेते .. असे नियम पाळतील तर नक्कीच देशाच्या अर्ध्या समस्या तरी नष्ट होतील ....एकंदरीत त्यांची माझ्या मनावर कडक ..नियमपालन करणाऱ्या ..प्रसंगी कठोर निर्णय घेणाऱ्या ..मात्र डोळ्यात करुणा आणि माणुसकी अशी छाप पडली .

बाहेर येवून समोरच्या मेंटल हॉस्पिटलच्या कार्यालयात शिरलो तेथे दाखल होण्यासंबंधी चौकशी केली ..टर्की वाढत चालली होती .. तरी कसेतरी स्वतःला ढकलत होतो ..दाखल होण्यासाठी १८० रुपये आधी भरावे लागतील ..मग फॉर्मवर नातलगाची सही लागेल असे समजले .. माझ्या खिश्यात फक्त ५ रुपये उरले होते .. नातलग तर बरोबर नव्हतेच ..मी अजिबात नियमात बसत नव्हतो .. हताश झालो खूप .. पण जिद्द सोडली नाही ..समोर मेंटल हॉस्पिटलच्या सोशलवर्कर ची केबिन दिसली .. ..त्यावर इंगळे अशी पाटी होती ..आधीचे नाव आता आठवत नाही फक्त आडनाव लक्षात आहे .. मी विचारणा करून आत शिरलो .. आत एक साधारण तिशीच्या महिला बसल्या होत्या .. त्यांना माझी सर्व माहिती सांगितली ..आताही मी खूप टर्कीत आहे हे सांगितले ..पण आज कसेही करून मला दाखल व्हायचे आहे ..नाहीतर आत्महत्या करण्यावाचून माझ्याकडे पर्याय नाही हे सांगितले .. सगळे नीट ऐकत होत्या इंगळे मँडम ..मध्ये मध्ये अरेरे ..अशा अर्थाने मान डोलावून मला सहानुभूती दर्शवित होत्या ..माझे बोलणे संपल्यावर म्हणाल्या ..तर तुझ्याकडे पैसे आणि नातलग देखील नाहीत .. अरे तुला उपचार खर्चात सवलत मिळवून देण्यासाठी मी अधीक्षक साहेबाना विनंती करते ..पण नातलग मात्र हवेच .. कारण हे सरकारी हॉस्पिटल आहे .. तुझी जवाबदारी कोणीतरी घेतलीच पाहिजे .. अधीक्षक डॉ . केळकर आहेत असे समजले तसा माझा आत्मविश्वास वाढला .. हे डॉ. केळकर माझ्या ठाण्याच्या मेंटल हॉस्पिटल च्या पहिल्या अँडमिशन च्या वेळी तेथे होते हे माझ्या लक्षात होतेच .. इंगळे मँडम सोबत मी डॉ. केळकर यांच्या केबिन मध्ये गेलो .. सरांना मँडम नी माझी माहिती सांगितली ... आणि शेवटी माझे नाव सांगताच ते जरा चमकले .. म्हणाले ' अरे तू या पूर्वी मला भेटला आहेस ना .. ठाण्याला असताना ? मी होकारार्थी मान हलविली .. तर म्हणाले ..म्हणजे अजून सुधारलाच नाहीस की काय तू ? खेदाने मान हलविली त्यांनी .. पुढे म्हणाले ..चल तुला उपचार खर्चात सवलत देतो मी .. पण नातलग तर हवेतच ..मी पुन्हा हिरमुसलो .. लगेच हसून म्हणाले ..अरे तू इतका हुशार आहेस ..ब्राऊन शुगर बरोबर मिळवितोस कसेही करून ..एखादा नातलग पण मिळव इथे .. त्याच्या बोलण्यातील गर्भिर्तार्थ माझ्या ध्यानात आला ..म्हणजे तू कुणीही माणूस नातलग म्हणून सही करण्यासाठी घेवून ये असे ते सुचवीत होते ... मी समजले अश्या अर्थाने मान हलविली तर मिस्कील हसले .. त्यांनी माझ्या हातात एक फॉर्म सही करून दिला .. म्हणालो जा एका नातलगाला घेवून खाली भोसले बसले आहेत त्यांच्याकडे नातलगाची सही घेवून फॉर्म दे तुझे काम होईल .. मी पटकन खाली रस्त्यावर आलो .. मेंटल हॉस्पिटलचे कर्मचारी ..तसेच उपचारांकरिता येणारे पेशंट नातलग ..अशी वर्दळ रस्त्यावर सुरु होती ..जरा सभ्य दिसणाऱ्या एकदोघांना मी हटकले व थोडक्यात माझी अडचण सांगून तात्पुरते माझे नातलग म्हणून माझ्यासोबत चला अशी विनंती केली .. ते घाबरले व नकार दिला .. शेवटी एक लुकडा ..सावळा.. पण तरतरीत असा विशीचा मुलगा सायकलवरून येताना दिसला त्याला अडवले व माझी अडचण सांगितली .. तो म्हणाला मी येथेच प्रायव्हेट अटेंडंट म्हणून काम करतो .. त्याचे नाव सिद्धार्थ होते .. जरा वेळ विचार करून मग म्हणाला चल मी करतो तुझा नातलग म्हणून सही .. मला खूप आनंद झाला .. सिद्धार्थ सोबत आत भोसले या कर्मचार्‍याच्या खिडकी जवळ गेलो फॉर्म आत सरकाविला... भोसले यांनी फॉर्म पाहून मग नातलागाची सही म्हणाले ...तसा सिद्धार्थ पुढे झाला भोसले सिद्धार्थ ला ओळखत होते ..ते म्हणाले ' सिद्धू ..कायरे कोण आहे हे तुझे .. यावर सिद्धू ने मामेभाऊ असे उतर दिले ..सही केली .. एकदाची माझी तेथे अँडमिशन झाली पैसे आणि नातलग नसतानाही सगळे जुळून आले होते ... एका अटेंडंट सोबत मी ' आनंद वार्ड ' अशी पाटी असलेल्या एका वार्डात शिरलो .. दुपारचे चार वाजत आले होते ..सकाळपासून टर्की असताना मी नेटाने पुढे जात राहिलो होतो .

( बाकी पुढील भागात ... ' मुक्तांगण ' आता स्वतच्या स्वतंत्र जागेत आहे मात्र पूर्वी ते मेंटल हॉस्पिटलच्या आवारात होते )

=================================================================================

भाग १५० वा   येरवडा मेंटल हॉस्पिटल !

महाराष्ट्रातील चार सरकारी मनोरुग्णालयांपैकी सगळ्यात मोठे मनोरुग्णालय म्हणून येरवडा मेंटल हॉस्पिटलचा नंबर लागतो ..त्या नंतर ठाणे ..नागपूर ..रत्नागिरी असा क्रम आहे .. ' मुक्तांगण ' ची इमारत या रुग्णालयाच्या आवारात तर होतीच पण मुक्तांगण मध्ये दाखल होण्यासाठी देखील मनोरुग्णालयाचाच फॉर्म भरावा लागे .. ' मुक्तांगण ' हा जरी स्वतंत्र ट्रस्ट म्हणून काम करत असला तरी ' मुक्तांगण ' ची सुरवात ..मनोरुग्णालयाच्या मदतीनेच झाली होती ... गोष्ट मुक्तांगणांची ' या डॉ. अनिल अवचट यांनी लिहिलेल्या नवीन पुस्तकात ..मुक्तांगण च्या स्थापनेची सविस्तर माहिती दिलीच आहे ....फॉर्म भरल्यावर एकदम ' मुक्तांगण ' मध्ये नेण्याऐवजी आधी 'आनंद वार्ड 'मध्ये ठेवण्याचे कारण असे होते की .. उपचारांसाठी भरती होणाऱ्या ब्राऊन शुगरच्या पेशंट्सना खूप टर्की होत असे ..सुमारे आठ दहा दिवस होणारा प्रचंड त्रास .. त्यावेळी असणारी त्यांची घातक मनस्थिती .. ... टर्की सुरु झाल्यावरची शारीरिक तडफड ...असे पेशंट पळून जाण्याचा प्रयत्न करतात ..किवा होणाऱ्या प्रचंड त्रासामुळे बैचेन होऊन काहीही ..आत्मघात करू शकतात ..अश्या वेळी मुक्तांगणचे नवीन तयार होत असलेले कार्यकर्ते त्यांची नीट काळजी घेण्यापुरते सक्षम नव्हते त्या वेळी ..तसेच मुक्तांगण मध्ये मुख्यतः मानसिक उपचार म्हणजे व्यक्तिगत समुपदेशन ...समूह उपचार ..योग्याभ्यास अशी उपचार पद्धती विकसित होत असल्याने ..अश्या टर्कीत असलेल्या रुग्णांकडून त्याने स्वतःला आणि इतरानाही त्रास होऊ नये या साठी ही काळजी घेतली जात असे ...मुक्तांगणची सुरवातच खास ब्राऊन शुगरच्या व्यसनींना योग्य पद्धतीने मानसोपचार देणारे व्यसनमुक्ती केंद्र या संकल्पनेतून झाली असल्याने ..त्या काळी मुंबई ..पुणे ..नाशिक या भागातील ब्राऊन शुगर चे व्यसनी मोठ्या प्रमाणात तेथे उपचारांसाठी दाखल होत होते ..' आनंद वार्ड ' मध्ये राहून काही दिवस टर्की काढली की मग आठवड्यातून दोन दिवस डॉ. अनिता अवचट या आनंद वार्ड मध्ये राउंड घेवून ..ज्यांना साधारणतः आनंद्वार्ड मध्ये राहून १० दिवस उपटून गेले आहेत व टर्की संपली आहे अश्या व्यसनींना तपासून त्यांच्याशी बोलून मग त्यांची बदली ' मुक्तांगण ' मध्ये करत असत .
मी ' आनंद वार्ड ' मध्ये पाउल टाकताच तेथे आधीपासूनच असलेल्या गर्दुल्ल्यांना बातमी समजली की कोणीतरी नवीन गर्दुल्ला आला आहे .. माझ्या सोबतच्या अटेंडंटने मला एका खोलीपाशी नेवून आधी माझी संपूर्ण झडती घेतली ..माझ्या कडे ब्राऊन शुगर ..अथवा इतर काही व्यसनाचे पदार्थ लपवून आणलेले नाहीत अशी खात्री झाल्यावर त्याने .. एका १० बाय १५ च्या खोलीजवळ मला सोडले ..' आनंद वार्ड ची रचना छान मोकळी आणि हवेशीर होती .. चारीही बाजूंनी छोट्या छोट्या खोल्या ..प्रत्येक कोपऱ्यात चार चार संडास बाथरूम .. मध्ये मोठे पटांगण ..खोल्यांच्या समोर मोठा व्हरांडा .. तेथे वेगवेगळ्या मानसिक आजारांचे... जरा बरे असलेले किवां..फारसे त्रासदायक नसलेले मनोरुग्ण ठेवले जात असत .. मला त्या अटेंडंटने ज्या खोलीपाशी सोडले ती खोली खास गर्दुल्ल्यांसाठी राखीव होती ..त्या खोलीत टी.व्ही .होता म्हणून तीला टी.व्ही रूम म्हणत असत .. तेथे दाखल झालेले गर्दुल्ले दिवसभर समोरच्या पटांगणात ..किवा इतर खोल्यांमध्ये टाईम पास करत असत मात्र रात्री सर्वाना आठवणीने या टी .व्ही .रूम मध्ये गोळा केले जाई ..तेथेच त्यांनी एकत्र झोपावे असा दंडक होता कारण सर्व गर्दुल्ल्यांवर नीट लक्ष ठेवण्यासाठी ते सगळे एकत्र असणे आवश्यक होते . मी त्या खोलीजवळ जाताच दोन तीन गर्दुल्ल्यानी मला घेरा घेतला ...आधी मी कुठे माल तर लपवून आणलेला नाही याची त्यांनी चाचपणी केली .. मी नाशिकचा आहे समजल्यावर तेथे दोन तीन वेळा आलेल्या जुन्या गर्दुल्ल्यानी ..याला ओळखतोस का ? त्याला ओळखतोस का वगैरे नाशिकच्या येथे पूर्वी येवून गेलेल्या गर्दुल्ल्याची चौकशी केली .. मला कोणाशीही काहीही बोलण्याची इच्छा नव्हती ..सकाळपासून टर्कीत धावपळ केल्याने खूप थकवा आला होता ..शिवाय टर्की होतीच ...त्या वेळी आनंद्वार्ड मध्ये मुक्तांगणला बदली होऊन जाण्याच्या प्रतीक्षेत असलेले सुमारे १५ गर्दुल्ले होते .. काही एकदोन दिवसात आपली मुक्तांगण मध्ये बदली होणार म्हणून आनंदात होते ..तर माझ्यासारखे नवीन येथे अजून १० -१२ दिवस राहावे लागेल या विवंचनेत ... डॉ . अनिता अवचट यांचा उल्लेख सगळे जण ' मँडम ' असा करीत असत ...एकदोन तासातच माझी बहुधा सर्वांशी ओळख झाली ..गिरीश ..इरफान .. राजू .. असलम ..वगैरे .. सगळ्यांची जेवणे सरकारी हॉस्पिटलच्या नियमाप्रमाणे सायंकाळी पाच लाच उरकली होती .. सात वाजता सर्वांची गिनती झाल्यावर दोन तीन अटेंडंटनी मिळून सगळे गर्दुल्ले झाडून झटकून शोधून टी .व्ही .रुम मध्ये एकत्र केले .. आता या रूम मधून फक्त लघवी..संडास या नैसर्गिक कामासाठीच बाहेर पडता येणार होते ...बाहेरून रूमचे दर बंद करून ..रुमच्या समोरच ते अटेंडंट बाहेरच्या पटांगणात खुर्च्या टाकून बसून राहिले .. त्यांनी पाळलेली दोन मोठी गावठी कुत्री देखील होती त्यांच्या सोबत ..ही कुत्री देखील खास पळून जाणाऱ्या गर्दुल्ल्यांवर लक्ष ठेवण्यासाठीच होती .
टी.व्ही रूम मध्ये एकत्र आल्यावर सगळ्या गर्दुल्ल्यांच्या मनमोकळ्या गप्पा सुरु झाल्या .. त्यापैकी तीन चार जण पूर्वी ' मुक्तांगण ' मध्ये होते मात्र बाहेर गेल्यावर काही दिवसातच त्यांचे परत पिणे सुरु झाले म्हणून ते पुन्हा उपचार घेण्यासाठी आले होते ..बहुधा सगळ्या गप्पा ...कुठे ब्राऊन शुगर चांगली मिळते ..कोठे महाग आहे .. बाहेर कोणी कोणी काय काय लोचे केले ...अश्याच स्वरूपाच्या होत्या ... मी टर्कीत असल्याने मला कोणाशीही बोलण्याची इच्छा उरली नव्हती ..ते सगळे हे जाणून होते व माझ्या टर्की बाबत मला सहानुभूती देखील देत होते ...एकाने मला स्पष्ट सांगितले ' कितनाभी टर्की हुवा तो भी ..हवालदार हो बताना नही..वो लोग तुम्हे ' सिक वार्ड ' भेज देंगे ..वहाँ का माहोल बहोत खतरनाक होता है " ' सिक वार्ड ' म्हणजे ठाण्याला होता तसा आजारी ..अपंग .. असहाय अश्या लोकांचा वार्ड होता तसलाच .. मी पूर्वीच ठाण्याला असताना जेवणातून विषबाधा झाली असतानाअशा प्रकारच्या वार्डचा अनुभव घेतला होता .. तसा अनुभव घेण्याची पुन्हा घेण्याची माझीही इच्छा नव्हती ..११ वाजता एका अटेंडंट ने आम्हाला टी.व्ही .बंद करण्याची सूचना दिली .. मग टीव्ही बंद झाल्यावर सगळे एका मोठ्या सतरंजीवर पडून झोपेची आराधना करू लागले .. अर्थात सगळे नुकतेच टर्की तून बाहेर पडणारे होते त्यामुळे झोप अशी कोणालाच येत नव्हती . इकडच्या तिकडच्या ..गप्पा ..हास्य विनोद सुरु होते ..गर्दुल्ला म्हणजे एक नंबर बेरकी असतो .. ब्राऊन शुगर मिळवण्यासाठी ..पैसे जमवण्यासाठी त्याला बुद्धीचा वापर करताना हे बेरकीपण आपोआप मिळते .. सगळ्यांचे बोलीबचन एकदम हार्ड असते .. आणि गप्पांचे विषय देखील मनोरंजक .. ज्यांना आनंदवार्ड मध्ये १० दिवस होऊन गेले ते साधारणतः २ वाजेपर्यंत झोपी गेले ..मी आणि अजून तीनचार जण जागेच होतो . .. थंडी म्हणून आम्ही मेंटलची जाडे कांबळी अंगावर पांघरून बसलो रात्रभर गप्पा मारत .. बिड्यांचा तुटवडा येथेही होता म्हणून मग एक बिडी तीनचार जण मिळून पीत होतो ...मला रात्री तीन चार वेळा जुलाबांसाठी जावे लागले तेव्हा ..आधी आतून दार वाजवावे लागले ..किंवा मग खिडकीतून कोणी आहे का ? असा आवाज दिल्यावर कोणीतरी अटेंडंट येई ..त्रासून दार उघडे .. घाबरत घाबरत त्याला संडास असे सांगितले ..की तो चल मोत्या असा आवाज त्या काळ्या कुत्र्याला देई ..मग मी पुढे ..माझ्या मागे तो अटेंडंट आणि त्याच्या मागे शेपटी हलवत मोत्या ..अशी वरात कोपऱ्यातील संडासपर्यंत निघे . सगळा गमतीदार प्रकार होता .


( बाकी पुढील भागात )

जिंदगी के सफर मे....!!

भाग १४१ वा 

आम्ही ते भीषण दृश्य पाहून थिजून गेलो होतो ...उताण्या पडलेल्या बाळूजवळ एक थाळी पडलेली होती ...आणि त्याच्या चार फुट दूर ..मागच्या भिंतीला टेकून एक दुसरा मनोरुग्णा उकिडवा बसला होता .. आम्ही चौकशी केल्यावर समजले की त्या उकिडव्या बसलेल्या पेशंटने बाळू ला काल रात्री डोक्यावर जाड स्टीलची थाळी जोरात मारली होती ..आणि तेव्हापासून तो असा पडलेला होता .. त्या पेशंट चे नाव फिलीप असे होते ..हा प्रकार घडला तेव्हा चारपाच जण जागे होते ..त्यांनी सारा प्रकार प्रत्यक्ष पहिला होता .. यांचे भांडण बिडीवरून झाले .. बाळू हा खूप जुना पेशंट असल्याने त्याला वार्डच्या बाहेर ..मेंटल हॉस्पिटलच्या आवारात फिरण्याची परवानगी होती .. बाळू बाहेर फिरणाऱ्या इतर पेशंट प्रमाणे .. रुग्णांना भेटायला येणाऱ्या पालकांकडे पैसे मागून त्यातून बिड्या घेवून त्या वार्डात इतर रुग्णांकडून जास्त पैसे घेवून विकायचे काम करत असे .. किवा बिडीच्या बदल्यात ..पाय दाबून घे ..मालीश करून घे ..स्वतचे कपडे धुवून घे अशी कामे ..इतर बिडी साठी तरसणाऱ्या रुग्णांकडून करून घेत असे ..काल रात्री म्हणे बाळू झोपला असताना फिलीपने जावून बाळूच्या खिश्यात बिडी साठी हात घातला .. तेथे बिडी मिळाली नाही ..मग बाळूने कमरेच्या करदोड्याला बांधलेल्या पिशवीत बिड्या असतील म्हणून फिलीप तेथे चाचपू लागला तशी बाळूला जाग आली ..थोडी झटापट झाली दोघांची ..रागाने फिलीप ने बाळूच्या डोक्यावर कोपऱ्यात पडलेली स्टीलची सुमारे दिड किलो वजनाची थाळी जोरात मारली ...बाळू तसाच खाली पडून तडफडू लागला ..मग फिलीप ने शांतपणे ..बाळूच्या कमरेची पिशवी काढून त्यातील बिड्या घेतल्या ..आणि कोपऱ्यात उकिडवा बसून रात्रभर त्या आठदहा बिड्या फुंकून संपविल्या ... अजूनही फिलीप नुसताच तडफडणाऱ्या बाळूकडे त्वेषाने पाहत होता ..त्याचे डोळे लाल भडक झालेले होते ...हा प्रकार घडला त्यावेळी रात्री आम्हाला जो धाडकन काहीतरी पडल्याचा ..न भांडे जमिनीवर पडल्याचा जो कर्कश्य आवाज ऐकू आला तो हाच होता .. हहा सगळा प्रकार पाहणाऱ्या चार पाच जणांना नेमके काय करावे हे सुचलेच नव्हते ..ते भेदरून आपापल्या जागेवर जाऊन झोपले .. तर वार्डचा नाईट ड्युटी वरील अटेंडंट .. गाढ झोपलेला .. ड्युटीवर असणारा स्वीपर देखील नेमका झोपलेला .. सकाळी जेव्हा चारला उठून त्यांनी वार्ड मध्ये राउंड मारला तेव्हा हे त्यांच्या ध्यानात आले .. म्हणजे  सुमारे गेल्या तीन तासांपासून बाळू तसाच तडफडत पडला होता .

आता पुढील कारवाई म्हणजे आधी डॉक्टरला बोलाविणे ..त्या नुसार डॉक्टर आले ..मात्र मुख्य अडचण अशी होती की बाळू जवळ जायला डॉक्टर घाबरू लागले ..कारण बाळूला ज्याने मारले तो फिलीप बाळूपासून जेमतेम चार फुट अंतरावर उकिडवा बसून लाल डोळे करून सर्वांकडे पाहत होता ..ती प्राणघातक थाळी फिलिपच्या हाताशी चटकन लागेल अशी पडलेली .. जर फिलीप ने पुन्हा कुणावर हल्ला केला तर ? ही भीती सर्वांच्या मनात होती ..कोणीही पुढे होऊन बाळूला मदत करण्यास धजावत नव्हते ...इतर वार्ड मध्ये एव्हाना बातमी जावून तेथील अटेंडंट देखील आले होते ..पण फिलीप असा बसलेला होता . त्याचे लाल झालेले डोळे .. थरकाप उडवत होते काळजाचा ..एकदोन अटेंडंट नी फिलीपला हाक मारून ..त्याला बोलते करण्याचा प्रयत्न केला .. पण फिलीप नुसताच जळजळीत नजरेने सगळ्यांकडे पाहत होता ..बाळूला मदत करायला पुढे व्हायचे तर आधी फिलीपला तेथून हलवावे लागले असते .. नेमके काय करता येईल ते कोणाला सुचेना ..फिलिपला पाठीच्या भागाकडून त्याला न दिसता पकडणे सोपे झाले असते ..पण फिलीप भिंतीला पाठ लावून बसला होता ..त्याला कशीतरी भिंत सोडायला लावली असती तर .. पटकन पाठीमागून झडप घालून पकडता आले असते ...हा सगळा प्रकार पाहताना ..बिडीची तल्लफ आली म्हणून ..मी माझ्या खिश्यातील बिडी काढून पेटविली ..तसे पटकन फिलीपने माझ्याकडे पहिले ..त्याच्या डोळ्यात क्षणभर चमक आली ...माझ्या डोक्यात कल्पना चमकली ..जर फिलिपला बिडीचे आमिष देवून भिंत सोडून पुढे बोलावले तर ...कोणीतरी त्याला मागून पकडू शकले असते ..मी पटकन दुसरी बिडी काढून फिलीपच्या दिशेला हात केला ..' फिलीप ये लो ..बिडी पियो 'असे म्हणालो ..फिलीपच्या डोळ्यात मोह दिसला ..मात्र तो काही उठुन पुढे यायला तयार होईना .. नुसताच बसल्या जागेवरून हात पुढे केला त्याने .. मग मी माझ्या खिश्यातील अख्खा बिडीबंडल काढला ..फिलीपला दाखवला .तेव्हा त्याने बसल्या जागी जराशी चुळबुळ केली .. माझ्या मनात योजना तयार झाली ..फिलीप नक्कीच बिडीच्या मोहाने उठू शकला असता हे मी ताडले होते ..


मी दोन अटेंडंटना सांगितले की मी फिलीप ला बिडी बंडल घ्यायला पुढे बोलावितो ..तुम्ही तो उठला की पटकन मागच्या बाजूने त्याच्यावर झडप घाला ...त्यावर त्यातील एक जण घाबरला .. म्हणाला मी नाही पकडणार फिलीपला ..शेवटी तो बिडी बंडल मी दुसऱ्या अटेंडंटच्या हाती दिला ..मग मी आणि सुहास वाडेकर असे दोघे जण फिलीप ला पकडायला सज्ज झालो ..हळू हळू फिलीपच्या ध्यानात येणार नाही अश्या पद्धतीने एक डाव्या बाजूने ..एक उजव्या बाजूने सरकत फिलीप च्या थोडे जवळ पोचलो .. मी सांगितल्या नुसार एका अटेंडंटने बिडी बंडल फिलीप पासून थोड्या चार पाच फुट पुढे पडेल अश्या बेताने फेकला .. फिलीप पासून बिडी बंडल फक्त पाच फुटावर होता .. फिलीप बावचळल्या सारखा वाटला .. त्याला उठून बिडी घेण्याचा मोह होत होता ..मात्र आपण भिंतीला पाठ टेकून सुरक्षित आहोत ..ती भिंत सोडून उठायला तो तयार नव्हता ..आम्ही फिलीप उठण्याची वाटच पाहत होतो ....शेवटी बिडीच्या मोहाचा विजय झाला ..फिलीप उठून समोर पडलेला बिडी बंडल घेण्यास भिंत सोडून पुढे आला ..तशी मी आणि सुहासने...मागून झडप घालून फिलीप ला ताब्यात घेतले .. पटकन त्याला आडवा पाडून त्याचे हात पाय बांधले ..ती जीवघेणी थाळी हटवली गेली ..मग डॉक्टर ने पुढे होऊन तडफडणाऱ्या ..आचके देणाऱ्या ..पण हळू हळू थंड पडत चाललेल्या बाळूला तपासले .बाळूला ताबडतोब ठ्ण्याच्या सरकारी सरकारी दवाखान्यात हलविण्याचे ठरले ..त्या नुसार एका स्ट्रेचर वरून बाळू ची रवानगी झाली आणि आम्ही फिलीपला आठ नंबर वार्ड मध्ये घेवून गेलो .. आता फिलिपला कायमचे क्रिमिनल वार्डात ठेवले जाणार होते ..कारण तो घातक बनला होता ..या पुढे देखील किरकोळ कारणावरून तो एखाद्यावर हल्ला करू शकला असता ...दुपारी बाळू गेल्याची बातमी समजली .. म्हणजे फिलीपवर आता मनुष्यवधाचा गुन्हा दाखल होणार होता हे नक्की ..मी केलेल्या हुशारी बद्दल मला त्या वार्डच्या अटेंडंट ने पाच बिडी बंडल बक्षीस दिले .. तर बीडीपायी फिलीप खुनी बनला होता ...या विरोधाभासाची मला अजुनही गम्मत वाटते .


पुढे काही वर्षांनी ..मी चांगला असताना जेव्हा ठाण्याला नातलगांच्या कडील कार्याला गेलो होतो तेव्हा मेंटल हॉस्पिटल मध्ये सगळ्यांना भेटायला गेलो होतो .. फिलीपला मला पहायचे होते ..आठ नंबर वार्डात फिलीप एका बंद खोलीत बसला होता तसाच उकिडवा भिंतीला टेकून .. खूप बारीक झाला होता ..मी गजाच्या बाहेरून बिडी दाखविताच त्याचे डोळे तसेच चमकले ..आणि बिडी बंडल गजांच्या आत फेकताच फिलीप त्या दिवशी प्रमाणेच पटकन बंडल उचलायला भिंत सोडून पुढे आला .. मला फिलीप बदल वाईट वाटत होते ..बिडीच्या नादात त्याने स्वतःवर मोठे संकट ओढवून घेतले होते ..
==================================================================

भाग १४२ वा जिंदगी कें सफर में..गुजर जाते है जो मकाम ..फिर नही आते

मला या वेळी मेंटल हॉस्पिटल मध्ये राहून सहा महिने होऊन गेले होते .. केव्हा सुटका होईल ते काहीच सांगता येत नव्हते .. अनघाच्या पत्राची वाट पाहून ..शेवटी मीच तिच्या घरच्या पत्त्यावर ..तिच्या आईबाबांच्या नावे एक पत्र लिहिले होते ..त्यात सर्वांची माफी मागून .. या पुढे माझ्या मुळेआपणास कधीच त्रास होणार नाही याची खात्री दिली होती .. त्याचेही काहीही उत्तर मिळाले नाही ..अनघा एकदातरी संपर्क करण्याचा प्रयत्न करेल असे वाटले होते .. पण ते देखील नाही ..तिचे नेमके काय झालेय हे काहीच कळेना .. त्या दिवशी फोनवर बोलताना तीने कदाचित हे आपले शेवटचे बोलणे असेल असे म्हंटले होते ..ते खरेच ठरत होते तर ? एकदा ' चित्रहार ' मध्ये राजेश खन्नावर चित्रित झालेले ' जिंदगी कें सफर में ..गुजर जाते है जो मकाम ..फिर नही आते ..हे गाणे ऐकताना खुपच व्याकुळ झालो होतो ..अतिशय सुंदर ..भावपूर्ण शब्द ..तितकेच सुंदर संगीत ..आणि किशोरकुमारचा आवाज .. प्रेयसी ला शोधत भटकणा-या राजेश खन्नाची अर्धवट वाढलेली दाढी .. सकाळ ....दुपार ..सायंकाळ चे बदलते चित्र .. ' एक बार चले जाते है ..जो दिन रात..सुबह श्याम ..हो फिर नही आते ..हो फिर नही आते ' अतिशय वास्तववादी संदेश ... मध्ये एकदा राजेश खन्ना च्या चेहऱ्यावर पडणारे मध्यानीचे ऊन ... बापरे ..अंगावर काटा तर आलाच माझ्या ..चक्क रडू कोसळले ...काळ कोणासाठी थांबत नही हेच खरे ..माणूस मात्र व्यसनांच्या ..तर कधी पैश्यांच्या .सत्तेच्या ... शक्तीच्या .. गुर्मीत आज जे आहे ते तसेच राहील असे समजून जगत जातो ... सुखाच्या क्षणी आपणास कधी दुखः मिळू शकेल याचा विचारही त्याच्या मनाला शिवत नाही .. कालचक्र फिरतेच आहे... कणाकणांनी पुढे जातेय ..त्याला कोणी थांबवू शकत नाही .. मला सगळ्यांनी कानीकपाळी ओरडून ..रागावून ..चिडून .. प्रेमाने हात जोडून ..विनवण्या करून वारंवार व्यसने कायमची बंद कर असे सांगितले होते ...पण माझे काही वाकडे होऊ शकत नाही ...माझ्या चातुर्याच्या जोरावर सगळे निभावून नेईन ..माझा स्वतःवर कंट्रोल आहे ..या भ्रमात राहिलो होते आणि पाहता पाहता चित्र बदलले होते ... कदाचित आता मेंटल हॉस्पिटल मध्ये कायमचे तर राहावे लागणार नाही ना ? या विचाराने मनाचा थरकाप होत असे ..

एकदा लव्हात्रे साहेबांनी मला टायपिंग येतेय म्हंटल्यावर ..येथील कार्यालयात जावून तेथे टायपिंग च्या कामात मदत करत जा असे सुचविले होते ..त्या नुसार अधूनमधून तेथे जावून जरा टायपिंग चे काम करत होतो ..पण सातत्य नसे .. असाच लहानपणापासून चंचल स्वभाव व धरसोड वृत्ती मुळे काही काळानंतर जे करतो आहे त्याचा कंटाळा येई ..मन दुसरीकडे कुठेतरी ओढ घेई .. अनघाच्या सहवासात जरा आयुष्य नव्याने शिकत होतो ..समजून घेत होतो .. शेवटी व्यसनामुळे ती देखील दुरावली .. वाटे जर आपल्याला अनघा दुरावणार आहे हे आधी माहित असते तर . ..आपण पुन्हा व्यसन सुरु केलेच नसते मग अनघा आपलीच झाली असती ..आता या जर ..तर ला काही अर्थ उरला नव्हता ..वास्तव स्वीकारण्यावाचून गत्यंतर नव्हते ..सगळी चूक माझीच आहे हे मान्य करूनही त्याची इतकी मोठी शिक्षा ? हे काही पचनी पडत नव्हते ...एखादा गुन्हेगार जसा आधी गुन्हा केल्यावर नाकबूल करतो ..सगळे पुरावे सदर केले गेले की मग ..शेवटी नाईलाजाने कबुल करतो ..पण तरीही निमुटपणे शिक्षा भोगण्यास तयार होण्याएवजी ..मग तो कमीत कमी शिक्षा मिळावी यासाठी प्रयत्न सुरु करतो ..जे घडले ते अनाहूत पणे घडलेय ..त्यात माझा फारसा दोष नाहीय ..असलाच तर .त्यासाठी इतकी मोठी शिक्षा नको ..माझे वय ..माझे कुटुंबीय .. वगैरे गोष्टी लक्षात घेवून माननीय न्यायधीश महोदयांनी दया करावी अशी समर्थने देतो ..शिक्षा कमी व्हावी म्हणून प्रयत्नशील राहतो ... न्यायाधीश महोदयांनी शिक्षा कमी केली अथवा शिक्षेत सुट दिली ..त्यांनी केलेल्या कृपेचा विचार न करता स्वतच्या हुशारीवर खुश होतो .. शिक्षा कमी होऊ शकली नाही तर ..हायकोर्ट ..सुप्रीम कोर्ट .. असा प्रवास करत राहतो ..तसेच मी करत गेलो .. शेवटी सर्व दयेचे अर्ज फेटाळले गेले ..मग अन्याय.. अन्याय म्हणून रडत बसलो !
५ ऑगस्ट १९९० रोजी सकाळी सकाळी ..अगदी ६ वाजता ..अचानक एका अटेंडंट सोबत माझा चुलत भाऊ व पुतण्या आमच्या वार्ड मध्ये आले ..मी त्यांना असे सकाळी सकाळी पाहून जरा आश्चर्यच वाटले ..त्यांचे चेहरे गंभीर होते .. मला म्हणाले ' चल आपल्याला नाशिक ला जायचे आहे ...दादांची ( म्हणजे माझ्या वडिलांची ) तब्येत जरा जास्त आहे ... 'चटकन तयारी कर ..आम्ही डिस्चार्ज घेण्याची प्रक्रिया केली आहे ' ... मी पटापट आवरून सगळ्यांचा निरोप घेवून निघालो .. त्यांनी सोबत त्यांची कार आणली होती .. गाडी लगेच नाशिककडे निघाली ...वडील गेल्या ३ वर्षांपासून अंथरुणाला खिळून होते .. आता बहुतेक पुन्हा त्यांना पक्षाघाताचा झटका आला असावा ..किवा रक्तदाब वाढला असेल .. असा विचार करत होतो ..आता या पुढे त्यांना त्रास होईल असे अजिबात वागायचे नाही .. जमेल तशी त्यांची सेवा करायची ..बिचाऱ्यांनी खूप कष्ट करून आम्हाला मोठे केले होते ..केवळ माझ्यामुळे त्यांना खूप मानसिक त्रास झाला होता ..असा विचार करत होतो ...वाटेत एका ठिकाणी हॉटेल मध्ये चहा घेतला ..माझा चुलत भाऊ मला काहीतरी खावून घे म्हणून आग्रह करत होता ..पण मी नकार दिला ..आधी वडिलांना भेटल्याशिवाय मला चैन पडणार नव्हते !
==================================================================

भाग १४३ वा  वडिलांचे देहावसान !

आम्ही सकाळी साडेदहा च्या सुमारास नाशिक ला घराजवळ पोचलो तर ' आदर्श गोकुळ ' सोसायटीच्या आवारात बरीच गर्दी दिसली ..माझ्या मनात पाल चुकचुकली ... गाडीतून खाली उतरताना पावले एकदम जड झाली .. चुलत भावाने माझा हात पकडला होता .. हळू हळू जिन्याच्या पायऱ्या चढून घराच्या दाराजवळ आलो ..दार उघडेच होते .. आत पुढच्या हॉल मध्ये वडिलांचे पार्थिव ठेवलेले दिसले .. मी दारातच थबकून उभा राहिलो ..आत प्रवेश करायची हिम्मतच होईना ..सगळे माझ्याच तोंडाकडे पाहत होते .. एकदम दगडी चेहरा करून ...डोळे विस्फारून समोरचे दृश्य पाहत होतो .. एकदम रडू देखील येईना .. फटाक्याची वात पेटवली की ती जशी सुरसुर जळत मग फटाक्याला भिडून फटाका फुटतो ..तसे आतून खोल खोल मनाच्या तळातून वात पेटली ..सर्व शरीरभर फिरत मग एकदम स्फोट झाला ..धाय मोकलून रडायला लागलो मी .. धावत जावून वडिलांच्या पार्थिवावर पडलो ...त्यांच्या छातीवर डोके ठेवून ढसाढसा रडत होतो ... इतका वेळ थांबलेली इतरांची रडारड पुन्हा सुरु झाली ..त्यांच्या एका बाजूला आई आणि दुसऱ्या बाजूला भाऊ बसला होता ...आई त्यांचे शरीर हलवत ' अहो .. आला बघा तुषार .. पहा न त्याच्या कडे ..बोला काहीतरी ' ..असे म्हणत रडत होती .. ' भावाने देखील मला मिठी मारून रडणे सुरु केले .. सुमारे १० मिनिटे लागली तो उमाळा संपायला ..मग नुसतेच हुंदके सुरु झाले ..शरीर गदगद हलवत येणारे .. वडिलांच्या ऑफिस मधले लोक सकाळीच आले होते ..भावाने शक्य तेथे फोन आणि बाकी ठिकाणी तारा करून बातमी कळविली होती .. अकोल्याहून येणारी सोईस्कर गाडी लगेच नसल्याने बहिण उशिरा येणार होती .. वडील पहाटे चार च्या सुमारास गेले होते .... त्यांना खूप अस्वस्थ वाटल्याची चाहूल लागून आईला जाग आली होती ..तीने त्यांना पाणी पाजण्याचा प्रयत्न केला .. छाती चोळली .. बहुधा रक्तदाब वाढला होता असे वाटले तीला .. घाईने तीने भावाला उठवले ..भाऊ उठून डॉक्टर ला आणायला जाईपर्यंत कारभार संपला होता .. दोन्ही मुले आलीत ... मुलगी ( बहिण ) यायला खूप उशीर होईल ..तो पर्यंत थांबता येणार नाही असे सगळ्यांचे मत पडले ..म्हणून मग बाकी तयारी सुरु झाली

कोपऱ्यात भिंतीला टेकून उकिडवा बसून मान गुडघ्यात खुपसून मी हुंदके देत बसलो होतो .. माझे काही नाशिक रोडचे मित्र देखील त्यांना बातमी समजली म्हणून आले होते .. मला खूप अपराध्यासारखे वाटत होते .. कारण वडिलांच्या शेवटच्या काळात मी त्यांना फार दुखः दिले होते व मला नुकसान भरपाईची संधी न देताच ते गेले होते ..जाताना मनात ..आपला एक मुलगा बिघडला आणि सुधारू शकला नाही ..त्याचे सगळे व्यवस्थित झालेले पाहता आले नाही ही खंत घेवून .. त्यांचे पार्थिव स्मशानापर्यंत नेण्यासाठी शववाहिनी आली होती .. मी भाऊ ..ऑफिस चे काही लोक माझा जिवलग मित्र किरण ..असे काही लोक त्यात बसून निघालो ..शेवटचा विधी करण्यासाठी ...अतिशय शांत चेहरा दिसत होता त्यांचा ..हे कदाचित सुटका झाल्याचे भाव असावेत असे उगाच मनाला वाटून गेले .. माझ्या मन:पटला वर भरभर त्यांच्या आठवणी येत होत्या .. अगदी लहानपणी उताणे झोपून मला पायावर घेवून ते पाय वर उचलून मला वरखाली झोका देत असत तिथपासून .. आमचा भावंडांचा आभ्यास घेणे .. महिन्यातून एकदा बाहेर हॉटेलात घेवून जाणे .. मित्राच्या ओळखीने थेटरचा पास मिळवून सिनेमा ..वर्षातून एकदा सर्कसला नेणे .....मी आजारी असताना माझ्या उशाला बसून राहणे .. महिना अखेर जवळचे पैसे संपले की त्यांची होणारी चीडचीड ... मी ११ वी ला नापास झाल्यावर आधी खूप रागावून ...मग शेवटी मला पास करून घ्यावे म्हणून लेले मँडम न गळ घालणारे वडील .. केसांच्या झिपऱ्या मानेपर्यंत वाढवल्या म्हणून जबरदस्ती कटिंगला पाठविणारे .. तेथे समोर उभे राहून केस कापणाऱ्याला सूचना देणारे ... आणि कानाची गोलाई , मानेवरचा कट मनासारखा झाला म्हणून समाधानाने मान डोलावणारे ...मी व्यसने करू लागल्यावर रात्री उशिरा आलो की फक्त एक रागाची नजर टाकणारे ..पाकिटातून मी त्यांचे पैसे चोरले की .. अस्वस्थ होणारे ..मला खोदून खोदून प्रश्न विचारून ' खरे सांग ' म्हणत ..शेवटी नाईलाजाने चूप बसणारे .. मी मोठा आडदांड झाल्यावर खूप संतापाने माझ्यावर हात उगारलेले ..मात्र मी त्यांचा हात धरताच ..चेहरा पाडून डोळे विस्फारून माझ्या कडे अविश्वासाने पाहणारे ...घरात मी तमाशे करत असताना .. ' माझ्या गरजा पूर्ण करता येत नसतील तर जन्म कशाला दिला ' असे मी म्हंटल्यावर ..अपमान वाटून कोणाशीही न बोलता झोपी जाणारे ...नंतर पक्षाघाताचा पहिला झटका आल्यावर ..स्मृती गेल्याने सगळ्यांकडे अनोळखी नजरेने पाहणारे .. स्मृती परत यावी म्हणून वयाच्या ५४ व्या वर्षी पुन्हा नव्याने पाटी पेन्सिल घेवून अंक ..डाव्या हाताने गिरवणारे .. सगळे नातलग जमल्यावर त्यांच्या लहानपणीच्या गमती सांगून ..नकला करून सगळ्यांना हसवणारे ..खेळकर मूड मध्ये असले की विनोद करणारे .. शेवटी शेवटी जेव्हा वाचा गेली होती तेव्हा ..नुसते मानेनेच इशारे करणारे .,,,किवा बोलण्याचा केविलवाणा प्रयत्न करताना दयनीय दिसणारे ...अनघाला पाहिल्यावर माझ्या कडे पाहून मुलगी खूप छान आहे ..पसंत आहे असे मान डोलावून सांगणारे .. प्रत्येक वेळी मी मेंटल हॉस्पिटलला जाताना ... आशीर्वादाच्या नजरेने पाहणारे ..नशे साठी पैसे मिळावेत म्हणून मी त्यांच्यावर वाट्टेल तसे आरोप करत असताना .. प्रयत्न पूर्वक ओठ दाबून शांत राहण्याचा प्रयत्न करणारे .. एकदा त्यांची खोटी सही करून मी बँकेतून पैसे काढल्याचे समजल्यावर धक्का बसून ..मी पोलिसात तक्रार करतो तुझी असे धमकावणारे आणि मग असहाय होऊन मला समजावणारे ..चतुर्थीला खणखणीत आवाजात अथर्वशीर्षा म्हणणारे .. रोज कामावर जाताना आधी ' ऊर्ध्वमूल मध:शाखं ' ..हा गीतेचा अध्याय डोळे मिटून म्हणणारे ....दिवाळीत सगळ्यांना पहाटे उठवून लवकर अंघोळ करा ..नाहीतर नरकात जाल असे बजावणारे ....प्रत्येक वेळी या वर्षी फटाकें आणायचे नाहीत ..उगाच पैश्यांचा धूर ..प्रदूषण अशी कटकट करत शेवटी आमच्या आग्रहापुढे मान तुकवून फटाके आणणारे ..सर्वाना नवीन कपडे घेतल्यावर ..आता बजेट संपले म्हणत स्वतः कपडे नवे कपडे न घेता आम्ही नवीन कपडे घालून फटाके फोडायला सज्ज झालो की कौतूकाने पाहणारे घेणारे .... आठवीत असताना मी N C C चा खाकी ढगळ ... कडक स्टार्च केलेला ड्रेस अन पायातील अवजड लाल चामडी बुट पाहून गालात हसून माझ्याकडे अभिमानाने पाहणारे ...' कृष्णा कशी रे लागली रक्ताची धार ..तुझिया बोटाला ' हे गाणे आलाप घेत म्हणणारे ...बापरे ..आता परत आपल्याला वडील कधीच भेटणार नाहीत ..त्यांचे पार्थिव घेवून आपण जाळायला निघालोय .. आता कितीही रडलो ..माफी मागितली तरी उपयोग नाही ..वेळ गेलीय ..निसटलीय ..संपलीय ..!
==================================================================

भाग १४४ वा   स्मशानवैराग्य !


शववाहिनी स्मशानात पोचल्यावर ..पुढची तयारी जाणकारांनी सुरु केली .. लाकडे रचणे .. बाकीच्या धार्मिक विधींची तयारी ..मला भावाचे नवल वाटले ..तो अतिशय संतुलित पणे सगळ्याला सामोरा जात होता .. अगदी जवाबदार व्यक्तीसारखा ..अर्थात तो जवाबदार आहे हे त्याने पूर्वीच सिद्ध केले होते ..माझ्या अश्या वागण्याने त्याला अनेक वेळा त्रास झाला ..घरात सतत कटकटी .. त्याची नोकरी ..संसार ..सगळे नीट सांभाळून होता तो ..इतकेच नव्हे तर सर्व नातलगांच्या लग्न व इतर कार्यात सामील होणे ..सामाजिक संबंध नीट सांभाळणे वगैरे गोष्टी तो लीलया करत असे .. येथेही तो तसाच शांतपणे वागत होता .. उलट मला धीर देत होता ..तेथे जमलेल्या बहुतेक लोकांना मी व्यसनी आहे ..माझ्यामुळे आमच्या कुटुंबाला खूप त्रास भोगावा लागला आहे हे माहित होते ..ते माझ्या बाबत काय विचार करत असतील याची कल्पना करून मला अपराध्यासारखे वाटत होते ..विशेष हे की त्या क्षणी मला बिडीची प्रचंड तल्लफ आलेली होती .. ठाण्याहून येताना वाटेत सोबत चुलत भाऊ व पुतण्या असल्याने ..नंतर घरी पोचल्यावर सगळ्या नातलगांच्या गराड्यात असल्याने गेल्या सहा तासांपासून बिडी ओढणे जमलेच नव्हते .. सगळ्या व्यसनांची मानसिक गुलामीची अवस्था आली की ..प्रत्येक सुख -दुख्खात ... तणावांच्या क्षणी .. अवस्थता ..बैचैनी .. निराशा .. वैफल्य .. अशा भावनिकतेत त्या व्यसनाची तीव्रतेने आठवण होते ..तसेच माझे झाले होते .. केव्हा एकदा सगळे सोपस्कार उरकून मला एकांतात बिडी ओढायला मिळेल हा विचार देखील मनात होताच .. मोठा मुलगा म्हणून भावाने सगळे विधी केले .. मी फक्त त्याच्या मागे मागे यंत्रवत फिरत होतो .. चितेला अग्नी दिल्याच्या क्षणी पुन्हा रडण्याचा उमाळा आला .. धडाडून पेटलेल्या चितेत वडिलांचा चेहरा धुसर होत गेला ... चहू बाजूंनी त्यांच्या देहाला ज्वालांनी वेढलेले पाहून कसेतरीच होत होते .. एक आयुष्य संपले ..असेच केव्हातरी आपल्याला ही करतील .. एकदा काळाची झडप पडली की कितीही पैसा ..सत्ता ..समर्थक .. असले तरी काही उपयोग नाही .. तुम्हाला जावेच लागणार ..उरतील त्या फक्त आठवणी ..चांगुलपणाच्या किवा ...तुम्ही केलेल्या विध्वंसाच्या .. कारवायांच्या .. सुप्रसिद्धी ..कुप्रसिद्धी .. .. बहुधा मानले जाते की शरीर सोडून गेल्यावर ..वर ..आभाळातल्या त्या उच्च शक्तीला हिशोब द्यावा लागणार आहे ..आपल्या कर्मांचा पाढा वाचला जाईल .. इतका सुंदर मानवी जन्म मिळाल्यावर तुम्ही त्याचे काय सार्थक केलेत ? ...किती लोकांना सुखी केलेत .. आपल्या बुद्धीचा ..निसर्गाने दिलेल्या वेगवेगळ्या क्षमतांचा वापर आपण मानव कल्याणासाठी केला का ? ..की पैसा .. अधिकार .. सत्ता .. यांचा गैरवापर करत लोकांना कसे फसवले ..लुटले ..लुबाडले .. विकारांची राक्षसी भूक भागविण्यासाठी किती बळी घेतले ...स्वतःला परमेश्वर समजून काय काय अन्याय केले ...सगळा सगळा हिशोब द्यावा लागेल .. मुख्य म्हणजे तेथे वकील ..चौकशी समिती ..आयोग .. क्लीनचीट देण्यास असणार नाही ..कारण आरोपपत्र आधीच पुराव्यासहित तयार झालेय ..आणि शिक्षाही ठरलीय ...मानवाने तयार केलेल्या कायद्यातून पळवता शोधता येतात ..निसर्गाच्या कायद्यातून कोण वाचवणार ? ..

चितेला अग्नी देवून झाल्यावर सगळे जरा पांगले ..मी पटकन लघवीच्या निमित्ताने आडोश्याला जावून बिडीचे दोन चार झुरके मारले ..आणि पुन्हा चितेजवळ येवून उभा राहिलो .. जाणकार अधूनमधून अग्नी धगधगता ठेवण्यासाठी त्यावर मीठ .. रॉकेलचा मारा करत होते ..बाहेरच्या लोकांना जायची घाई झाली होती .. म्हणे कवटी तडकल्याचा आवाज येईपर्यंत थांबावे लागते .. एकदा कवटीचे मेंदूला असलेले संरक्षण संपले की समजायचे आता काम पूर्ण झाले .. विषण्ण मनाने पुन्हा शववाहीनीत् बसून घराकडे परतलो ..घरात पोचल्या बरोबर .. अंघोळीची घाई सुरु झाली .. असे कोणाला पोचवून आल्यावर ..अंघोळ करणे फार आवश्यक मानले जाते .. लहानपणी जेव्हा मी अंघोळ का करायची असे विचारले होते तेव्हा .. कारण स्मशानात अतृप्त आत्मे वगैरे असतात ..ते तुमच्यासोबत घरात येतात... अंघोळ करून त्यांना पळवून लावावे लागते असे उत्तर मिळाले ..माझे काही समाधान झाले नव्हते .. आता पुन्हा जेव्हा विचार करतो तेव्हा असे वाटते की अतृप्त आत्म्यांपेक्षा स्मशानात गेल्यावर ..तेथील सगळे दृश्य पाहून मनात् जो उदासीचा ..वैफल्याचा ... क्षणभंगुर जीवनाचा ..शेवटी सगळे व्यर्थ असल्याचा भाव येतो तो भाव काढून टाकून पुन्हा जीवनाच्या रहाट गाडग्याला जुंपून घेण्यासाठी .. कर्तव्य ..जवाबदारी .. यांचे भान येवून कर्माच्या चक्रात शिरण्यासाठी स्वतःला तयार करायचे म्हणून अंघोळ असावी ..शेजारच्या घरून चहा बनवून पाठवला गेला होता सर्वांसाठी .. नको नको करत शेवटी सगळ्यांनी चहा घेतला .. आता संध्याकाळी जेवण देखील करतील .. मग हळू हळू दुखः कमी होत जाईल ..स्मृतींच्या कप्प्यात वडील बंद होतील ....मग दहावे .तेरावे ..चौदावे ..वर्षश्राद्ध या निमित्ताने पुन्हा त्या स्मृती ताज्या केल्या जातील ..

रात्री बहिण आल्यावर पुन्हा रडणे झाले .. हॉल मध्ये मध्यभागी एका ठिकाणी परातीत पिठाचा साधारण दोन इंचाचा थर लावून त्यावर एक पेटती पणती ठेवली गेली ..यावर झाकण म्हणून एक टोपली उपडी ठेवली होती .. नंतर ती टोपली काढल्यावर मृत आत्म्याला कोणता जन्म मिळालाय ते त्या पिठावर उमटलेल्या खुणांवरून समजते .. टोपली काढल्यावर सर्वानी बारकाईने पहिले ..पिठावर चित्रविचित्र अस्पष्ट रेघोट्या उमटल्या होत्या ..एखाद्या लहान मुलाच्या हातात पाटी पेन्सिल दिल्यावर तो पेन्सिल ने पाटीवर काहीतरी वेड्यावाकड्या रेघा मारतो तसे ...सगळे त्या खुणांवरून अंदाज बांधत होते .. वेगवेगळ्या प्राण्यांची ..पक्षांची नावे घेतली गेली ..कोणाचेच एकमत होईना .. त्या रेघोट्या तेथे कश्या आल्या हे एक कोडेच होते ..पुढे मला समजले की दिव्याच्या ज्योती कडे आकर्षित होऊन बारीक चिलटे त्या काड्यांनी बनलेल्या टोपलीच्या आत शिरून हे प्रताप करतात .. किवा तेलाच्या वासाने मुंग्या व सरपटणारे सूक्ष्म कीटक पिठावर ये जा करतात त्याच्या या खुणा असतात ..खरे खोटे तो देवच जाणे...! बाहेरगावाहून आलेले नातलग दुसऱ्या दिवशी निघून गेले आता ते पुन्हा चौदाव्या दिवशी येणार होते ..घरात फक्त घरातील सदस्य उरले .. साधारण चार दिवसांनी ..वडील नेहमी ज्या पलंगावर झोपत तो पलंग तेथून हलवून ...खाली ठेवलेल्या जुन्या पेट्या वगैरे हटवल्या गेल्या ..साफसफाई करण्यात आली तेव्हा भाऊ पुन्हा रडू लागला .. त्या पलंगाखाली .पेटीच्या मागे .. वडिलांना दिल्या जाणाऱ्या अनेक औषधाच्या गोळ्या पडल्या होत्या ..म्हणजे आई नेहमी वडिलांना पलंगावर भिंतीला टेकवून बसवून ..त्यांना नियमित देण्यात येणाऱ्या रक्तदाबाच्या .. पक्षाघाताच्या ..टॉनिकच्या वगैरे डॉक्टरांनी सांगितलेल्या गोळ्या वडिलांच्या जवळ काढून ठेवून ...बाजूला वडिलांना डाव्या हाताने सहज घेता येईल असा दुधाचा ग्लास ठेवून ..त्यांना सवडीने गोळ्या घ्या असे सांगून कामाला आत निघून जात होती तेव्हा ..वडिलांनी त्या गोळ्या न खाता हळूच उचलून पलंगाच्या मागे टाकून दिल्या होत्या ..आणि आईने गोळ्या घेतल्या का असे विचारल्यावर होकारार्थी मान डोलावली होती .. त्यांनी किमान एक महिनाभर तरी हे गोळ्या घेणे टाळले होते .. असे का केले असावे ..त्यांची जीवनेच्छा संपुष्टात आली होती का ? की आपण बरे होणार नाही असे वाटत होते ? की माझ्या त्रासाने वैतागून असे जगण्यात काय अर्थ आहे या विचाराने त्यांनी हे केले ? आम्ही भावंडे खूप रडलो ते पाहून ..मला वाटले वडिलांची जगण्याची ओढ केवळ माझ्यामुळेच संपुष्टात आली होती .. अजून पुढे पुढे मी काय काय प्रताप करीन ते उघड्या डोळ्यांनी असहायपणे पाहण्यापेक्षा त्यांनी मृत्यूला जवळ केले होते .. वडिलांच्या या आत्माघातला केवळ मीच जवाबदार आहे असे मला वाटू लागले .
==================================================================

भाग १४५ वा  ' जीवन चलनेका नाम '

वडील गेल्यानंतर....एकदोन दिवसातच .. आमचे जेवण वगैरे सुरळीत सुरु झाले... मात्र सगळ्यांच्या चेहऱ्यावरील दुखा:चा भाव मात्र मात्र अजून तसाच होता .. सगळ्यात जास्त एकटेपणा जाणवत होता तो आईला ... पूर्वीच्या प्रथेनुसार वयाच्या चौदाव्या वर्षी तिचे वडिलांशी लग्न झालेले .. तसेच आता नवरा हेच आपले सर्वस्व असे वारंवार तीला सांगण्यात आलेले ...इतक्या वर्षांच्या प्रदीर्घ काळाचा जोडीदार आता आपली साथ सोडून गेलाय..हे स्वीकारणेच काय ..साधे मान्य करणे देखील तीला खूप कठीण जात होते .. अनेकवेळा ती वडिलांचा दुधाचा ग्लास भरून घेवून बाहेर ...येवून ..मग त्यांच्या रिकाम्या पलंगाकडे विषण्णपणे पाही ...मग तिच्या लक्षात येई ....पुन्हा गहिवर ...वडील आजारी असल्यापासून गेल्या चार वर्षात तीने जणू बाहेरच्या जगाशी नाळ तोडली होती .. फक्त वडिलांची सोबत ..त्यांची सेवा ..त्यांचे आजारपण हेच तिच्या आयुष्यातले प्रमुख विषय होते ..या काळात ती कोणत्याही नातलगाच्या ..लग्नाला ..कोणत्याही सार्वजनिक समारंभाला गेली नव्हती .. त्यांच्या संसाराच्या सुरवातीच्या काही वर्षात वडिलांना आर्थिक स्थिरता नव्हती ..तेव्हा आईने तिखट ..हळद कुटून देणे ..पापड वगैरे करुण देणे अशी कामे करुन संसाराला हातभार लावला होता ..नंतर शिवणकम शिकून घेवून ...शिवणकाम काम करून ... घर समृद्ध होण्यासाठी सतत कष्ट केले ...भारतीय संस्कृतीचे हे वैशिष्ट्य आहे ..कदाचित ' पुरुष वर्चस्ववादी ' व्यवस्थेचा देखील भाग असावा.... ' पती परमेश्वर ' ही संकल्पना लहानपणापासून मनात इतकी खोल रुजविली जाते की ....बहुधा पत्नी आपल्या पतीचा मनापासून राग ..तिरस्कार ..द्वेष करूच शकत नाही ..पती कसाही वागला तरी ती त्याला माफ करता जाते ..माझे वडील व्यसनी नव्हते ..व त्यांचा स्वभाव देखील चांगलाच होता .. आईवडिलांचे भांडण असे क्वचितच होई ..आणि ते देखील आर्थिक गोष्टींवरून ......नाहीतर माझ्या वागण्यावरून ..बाकी त्यांच्यात काहीही मतभेद नव्हते ...परंतु पुढे व्यसनमुक्ती च्या क्षेत्रात तसेच सामाजिक क्षेत्रात काम करू लागल्यावर अश्या बहुसंख्य स्त्रिया पहिल्या आहेत की ज्या ..दारुड्या ... ..मारहाण करणाऱ्या..कमाई न करणाऱ्या .. पतीवर जीवापाड प्रेम करतात..वारंवार त्याला माफ करतात ...पाठीशी घालतात .... एकदा असेच सुधारित केलेले ..घटनेत महिलांना दिलेल्या हक्कांचे पुस्तक पाहण्यात आले . महिलांना संरक्षण देणारे अनेक कायदे वाचले तेव्हा जाणवले ...महिलांवर घरगुती अत्याचार ..किवा इतर अत्याचार होऊ नयेत याची योग्य दखल घेतली गेली होती ... जर प्रत्येक महिलेने तीला घटनेने दिलेल्या अधिकार आणि हक्कासाठी संघर्ष केला किवा उल्लंघन झाल्याची रीतसर तक्रार दाखल केली तर .. तर ... बहुधा ९० टक्के पुरुष्याना एकदा तरी पोलीस कोठडी अनुभवावी लागेल .. आम्ही पुरुष खरोखरच भाग्यवान आहोत की महिला मुळातच सहनशील .. दयाळू .. असतात व संस्कृतीने सांगितलेले मायेचे पाश सहसा तोडत नाहीत . निसर्गाने त्यांना प्रदान केलेल्या मातृत्वाच्या जवाबदारीमुळे देखील कदाचित हे घडत असेल ! घरात या काळात कोणाचे फारसे एकमेकांची बोलणे होत नव्हते .. भावाचा लहानगा मुलगा मोहित तेव्हा काय घडलेय हे समजण्याइतका मोठा नव्हता ..त्यामुळे त्याच्या बाललीलांनी घरात जरा चैतन्य वाटत होते .. साधारण आठ दिवसांनी माझ्या नावाने सरकारी शिक्का असलेले पत्र आले ...सेवायोजन कार्यालयाचे ते पत्र होते ( एम्प्लॉयमेंट एक्स्चेंज ) त्यात मला १० दिवसांनी होणाऱ्या महाराष्ट्र पोलीस ' शिपाई पदाच्या भरतीसाठी' ..मुलाखतीला..आणि परीक्षेला आमंत्रित केले गेले होता .. सर्वाना खूप आनंद झाला .. शारीरिक पात्रतेच्या योग्यते साठी माझी उंची तर चांगलीच होती ..पण छातीची रुंदी तितकी भरत नव्हती ..एक इंच कमी होते .. मग मी व्यायाम सुरु केला .. सकाळी रनिंग ला जाणे .. सूर्यनमस्कार .. भावाचे बुलवर्कर वापरू लागलो ..अर्थात केवळ आठ दिवसात काही मोठा चत्मकार होणे कठीणच .. पण मनापासून मी प्रयत्न करू लागलो ...सरकारी नोकरी मिळण्याच्या संधी कमी कमी होत गेल्या असताना ..ही संधी चांगलीच होती ..मला कधी काळी सेवायोजन केंद्राचे काही पत्र येईल असे स्वप्नातही वाटले नव्हते ..कारण मागच्याच वर्षी जेव्हा मी बारावी पास अशी नोंदणी केलेल्या सेवायोजन कार्डावर ..पदवी धारक झाल्याची नव्याने नोंद करण्यासाठी सेवायोजन कार्यालयात गेलो असताना ..तेथे मी भांडण केले होते ..झाले असे की .. जुन्या नोंदवलेल्या कार्डावर ..घेतलेले नवीन शिक्षण नोंदविण्यासाठी एक अर्ज करून ते कार्ड ताब्यात घेवून मग कार्डसोबत तो अर्ज पुन्हा नोंदणी अधिकाऱ्याकडे द्यावा लागतो ..मी अर्ज घेवून गेलो ..तिथे प्रचंड मोठी रांग लागलेली होती .. बराच वेळ झाला तरी रांग पुढे सरकेना ..सगळे कंटाळले होते रांगेतले .. पण रोजगाराच्या आशेने ..तासंतास रांगेत उभे राहण्याची तयारी होती त्यांची .. रांग पुढे न सरकण्याचे कारण असे समजले की त्या अधिकाऱ्याच्या म्हणा की कारकुनाच्या म्हणा केबिन मध्ये सारखे कोणी कोणी वशिल्याचे तट्टू ओळख काढून पुढे घुसत होते .. मग आपले काम झाले की विजयी मुद्रेने रांगेतल्या तरुण तरुणींकडे पाहत ताठ्याने निघून जात होते .. असे दोन तीन वेळा घडल्यावर ..रांग मोडून पुढे केबिन मध्ये जाणाऱ्या एकाला मी अडवले ' रांगेत चल .. आम्ही इतक्या वेळ पासून काय मुर्ख म्हणून उभे आहोत का ? ' असे त्याला दरडावले .. माझे धाडस पाहून रांगेतल्या इतरानाही चेव आला ..सगळे आरडा ओरडा करू लागले ... ते ऐकून केबिन मधला क्लार्क बाहेर आला व त्या घुसणाऱ्या तरुणाच्या हातातील चिट्ठी त्याने घेतली ..वाचून ..आम्हाला रागावू लागला ..' असे गोंधळ कराल ..तर एकाचेही काम होणार नाही वगैरे ..' मी जास्त आरडा ओरडा करतोय हे त्याच्या लक्षात येवून तो माझ्याकडे वळून ओरडला ' काय रे तू काय बँरिष्टर झाला आहे का ? नोंदणी करण्यासाठी इतकी घाई का करतो आहेस ..आणि तुला काय लगेच नोकरी मिळणार आहे की काय ? ' असे कुत्सितपणे म्हणाला ..झाले माझे डोके फिरले .. सगळ्या व्यवस्थेला शिव्या घालत मी माझ्या हातातील अर्ज फाडला ..म्हणालो ' लाथ मारतो तुमच्या नोकरीवर .. समजतात काय स्वतःला ..तुम्ही सरकारी अधिकारी झालात म्हणून परमेश्वर नाही आहात ' वगैरे बडबड करत मी तावातावाने बाहेर पडलो .. त्यामुळे कार्डवर पदवी नोंदविण्याचे राहूनच गेले होते .. तरीही बारावीच्या नोंदणीवर मला सेवायोजन केंद्राचा कॉल आला होता .
वडिलांच्या चौदाव्याच्या विधीच्या वेळी ..सगळे सोपस्कार करून पिंडदान करण्याच्या वेळी ..काहीही केल्या एकही कावळा पिंडाला शिवायला जवळ फिरकत नव्हता .. सर्वांच्या चेहऱ्यावर चिंतेचे भाव होते .. तू पुढे होऊन .म्हण की ..' या पुढे मी कधीच व्यसन करणार नाही ' म्हणजे कावळा शिवेल असे सर्वानी मला सुचविले ..मी तसेही केले ..तरी परिणाम नाही ..मुळात कावळ्याच्या रुपात असा मृत नातलगाचा आत्मा येतो हे मनाला पटत नव्हते ...शिवाय वडील गेल्याच्या दुसऱ्याच दिवशी ..पणती लावलेल्या पिठावर ज्या रेघोट्या उमटल्या होत्या त्यावरून सर्वानी वडील कोणत्या जन्मात गेले याचे आडाखे बांधून झाले होते ..मग आता ते परत त्या नवीन जन्मातून ..पुन्हा कावळ्याच्या रुपात कसे येणार ? हे कोडेच होते ...तिथे अजून एक गम्मत झाली ..एक नातलग इथे घाटावर फोटोग्राफी चा व्यवसाय खूप जोरात चालेल असे कोणाला तरी सांगत होता ..त्याच्या मते नाशिकला गोदावरीच्या घाटावर रोज असे अनेक पिंड ठेवले जातात ..फोटोग्राफर ने जर ...ज्यांचा नातलग मृत झाला आहे ..त्यांच्या कडून ऑर्डर घेवून ... पिंडाला शिवणाऱ्या कावळ्याचा फोटो काढला तर ..स्मृती म्हणून किवा ..हा बघा या कावळ्याच्या रुपात आत्मा आला होता पिंडाला शिवायला असे फोटो दाखवून .. लोकांना सांगता येईल ..असे म्हणत होता .....त्या गंभीर अवस्थेत देखील मला खूप हसू आले या कल्पनेचे .सुमारे तासभर वाट पाहिल्यावर विधी करणाऱ्या गुरुजींनी दर्भाचा कावळा प्रतीत्कात्मक म्हणून बनवून त्याचा स्पर्श पिंडाला जरी करवला तरी काम होते हे सांगितल्यावर तर मला हा सगळा भंपकपणा वाटू लागला ..हे अश्या प्रकारचे विधी खरोखर आवश्यक आहेत का ? असे वाटू लागले .. अर्थात भावनांच्या पुढे माझ्या प्रश्नांना काही किंमत नव्हती .. शिवाय जर आई ..भाऊ .. आणि इतर जवळच्या नातलगांना मानसिक समाधान मिळत असेल तर ... त्यासाठी हे विधी करणे आवश्यक होते .. शेवटी प्रत्येकाच्या मानसिक समाधानाच्या कल्पना वेगवेगळ्या असू शकतात ..मी नाही का व्यसनात मानसिक समाधान शोधात होतो ... !
( बाकी पुढील भागात )

काहे को ..दुनिया बनाई

भाग १३६ वा  ३१ डिसेंबर १९८९ !

नाशिकला पोचल्यावर.मला पाहून वडिलांनी समाधानाने मान हलविली ..बोलता येतच नव्हते त्यांना ..पण त्यांच्या डोळ्यातून ओघळणारे अश्रू ..मी सुखरूप परत आल्याचे पाहून त्यांना आनंद झाल्याचे दर्शवित होते ..त्यांच्या जवळ पलंगावर बसलो तसा त्यांनी चांगला असलेला डावा हात माझ्या डोक्यावरून फिरवला ..मग माझा एक हात हातात घेवून बसून माझ्या तोंडाकडे पाहत राहिले .. ही काय स्वतची परवड करून घेत आहेस ? ..कधी अक्कल येणार तुला ?.. हे असे जगून काय मिळावीत आहेस ? वगैरे प्रश्न ते मला विचारात असावेत .. त्यांची अवस्था पाहून माझेही डोळे भरून आले .. वाटले .. असे का घडते आहे माझ्याच बाबतीत ..व्यसनमुक्त राहण्याची इच्छा असूनही मला यश का येत नाहीय .तारुण्यात प्रवेश करताना माझी जीवनाबद्दलची स्वप्ने अशी अजिबात नव्हती ..उलट मला चांगले शिकायचे होते ..चांगली नोकरी करायची होती ..यशस्वी व्हायचे होते ..अर्थात माझी स्वप्ने प्रत्यक्षात आणण्यासाठी लागणारे कृतीचे पाठबळ मी देण्यास असमर्थ ठरलो होतो हे मला समजत नव्हते .. उद्या ठाण्याला जायचे आहे असे भावाने ठरवले होते .. म्हणजे अजून २४ तास काढायचे होते मला .. टर्की मी ठाण्याला सहन करू शकत होतो ..कारण मिळण्याची शक्यताच नसे .. त्यामुळे एकदा मनाने आपल्या येथे ब्राऊन शुगर प्यायला मिळू शकत नाही हे मान्य केले की आपोआप टर्की सहन करण्याची हिम्मत वाढते ..तसेच कसे मिळू शकेल ..काय करावे हे विचार देखील मग सतावत नाहीत .. निमुटपणे त्रासाला सामोरे जाता येते .. शेवटचे म्हणून अकोल्याला घेतलेल्या चार पुड्यांपैकी एक पुडी शिल्लक होती ती सकाळी प्यायलो होतोच .. अजून संध्याकाळ ..रात्र .. आणि उद्याची दुपार काढायची होती ..उद्या दुपारी मी ठाण्याला पोचलो असतो .. तेथे सगळ्यांच्या चांगल्या ओळखी असल्याने फारशी अडचण येणार नव्हती ..कशीही टर्की सहन केली असती .. आई जवळ पैसे मागितले ..तर तीने पर्स उघडून दाखविले ..जेमतेम दहा रुपये होते तिच्याकडे .. भावाजवळ मागणे शक्यच नव्हते ..त्याच्या मते आम्ही तुला वारंवार उपचार देतोय तेच खूप होते .. खायला . ..कपड्यांसाठी .. सिनेमा ..नाटक पाहण्यासाठी तो कितीही पैसे देण्यास तयार झाला असता ..मात्र नशेसाठी अजिबात एक पैसा देखील देणार नाही हे त्याचे ब्रीद होते ..

दुपारी घरातच थांबून .. पैसे कुठून मिळू शकतात का ?..काही मौल्यवान वस्तू विकण्यासाठी सापडते का ? याचा शोध घेत होतो ..घरचे लोक माझ्या बाबतीत तेव्हढी सावधगिरी बाळगून होते .. सगळे पैसे ..दागिने ..मी सहजपणे नेवू शकेन अश्या इतर मौल्यवान वस्तू ..अगदी कडी कपाटात बंदिस्त होत्या .. शेवटी नाईलाजाने बाहेरच काहीतरी जमवावे लागेल हे समजून संध्याकाळी घराबाहेर पडलो ... नाशिकला ब्राऊन शुगर मुंबई आणि अकोल्याच्याही तुलनेत महाग असल्याने किमान शंभर रुपये तरी मिळायला हवे होते ..त्या दिवशी ३१ डिसेंबर ही तारीख असल्याने ..सगळीकडे उत्साहाचे वातावरण होते .. दुकानांवर ..हॉटेलमधून रोषणाई केलेली ... आणि मी टर्की त शोधक नजरेने फिरत होतो ..कोणीतरी नशेबाज मित्र भेटेल ही आशा होती . ..एक दोन जण भेटले पण ते अगदीच दयनीय झालेले गर्दुल्ले .. ओवाळून टाकलेले ..ते स्वतच काहीतरी झोल करण्याच्या शोधात होते .. मी एखादी कुलूप न लावलेली सायकल .. दिसली तर हात मारण्याचे ठरवले होते ..सरळ भद्रकाली च्या बाजारात विकत आली असती ..बराच वेळ हिंडूनही काही गणित जमेना .. मग फिरत फिरत मेनरोड वरून शालीमार कडे जाणाऱ्या रस्त्यावर शाली ..मफलर .. स्वेटर्स वगैरे गरम कपडे विकणाऱ्या तिबेटी लोकांच्या पालाजवळ पोचलो ..त्यांची दुकाने रांगेने लांबलचक पसल्रेली होती ..म्हणजे सिव्हील हॉस्पिटल च्या कंपांऊड वॉल ला लागून प्लास्टिक किवा ताडपत्रीचा आडोसा करून ही दुकाने लावलेली असत .. 

थंडीचे दिवस असल्याने दुकानारून स्वेटर्स वगैरे घेण्यासाठी चांगलीच गर्दी .. गर्दीतून काही संधी मिळते का ते पाहत होतो ..पूर्वी आम्ही दोनतीन वेळा असे दुकानातून गर्दीचा फायदा घेवून गिऱ्हाईक असल्याचा बहाणा करून स्वेटर्स लांबवले होते .. आज मी एकटाच असल्याने ती हिम्मत करता आली नसती .. मग मनात एक कल्पना आली की जर सिव्हील हॉस्पिटलच्या भिंतीच्या आतल्या बाजूने कोणाच्या नकळत हात घालून जर एखादा स्वेटर लांबविता आला तर बरे होईल ..हा विचार मनात येताच सिव्हील हॉस्पिटल च्या आवारात जावून भिंतीच्या आतील बाजूने निरीक्षण केले तेव्हा एक दुकान असे सापडले की मागून हात घालून सहज स्वेटर लांबवता आला असता ..पण त्यासाठी दुकानात असलेल्या तिन्ही तिबेटी स्त्रियांचे लक्ष विचलित व्हायला हवे होते .. दुकानात गर्दी होती त्यामुळे त्या पैकी दोन जणी ग्राहकांशी बोलत होत्या तर एक मात्र स्वेटर्स लटकवलेल्या बाजूकडे पाहत होती ..मी हात घातला असता तर तीला नक्कीच दिसले असते .. बराच वेळ तिथे अंधारात दबा धरून बसलो ..अचानक लक्षात आले की पायाला काहीतरी चावते आहे .. एकदम सुया टोचल्या सारख्या वेदना पायावर पोटऱ्यावर होऊ लागल्या ..मग लक्षात आले की मी अंधारात एका लाल मुंग्यांच्या वारुळावर उभा होतो ..मुंग्यांनी आधी अंदाज घेतला असावा .. मग दोन्ही पायावर चढून आपले प्रताप दाखायला सुरवात केली होती ..मनात आले ..तू चोरी करायला निघाला होता म्हणूनच की काय इतक्या मुंग्या एकदम चावल्या .. तेथून पाय झटकत पळालो . जरा दुरवर जावून पायावरच्या सर्व मुंग्या झटकल्या .. पायाला खूप खाज सुटली होती ..पण एखादा स्वेटर तेथून घेतल्याखेरीज मागे फिरायचे नाही ही जिद्द होतीच .. अर्ध्या तासाने पायाची आग होणे थांबल्यावर सावध पणे पुन्हा तेथे गेलो ..या वेळी मुंग्यांचे वारूळ टाळून उभा राहिलो .. स्वेटर्स काढून देणा-या तिबेटी स्त्री ची पाठ वळली तसा पटकन आत हात घातला ..न हाताला येईल तो कपडा अंदाजाने लांबवला .. मागे न पाहता धूम पळत सुटलो ...

माझ्या हाताला एक शाल लागली होती ... सरळ भद्रकालीत पोचलो ..अड्ड्यावर जावून मुश्ताकभाई ला ती शाल दाखवली ..त्याने फक्त एक पुडी देईन असे सांगितले ..खरे तर किमान दोन पुड्यांचा तरी डाव होईल असा माझा अंदाज होता .. मुश्ताक हा स्वतः देखील गर्दुल्लाच होता .. तो मुंबईहून गर्द विकत आणून ते नाशिकला महाग विकून स्वतची नशा भागवत होता .. त्याच्याकडे केव्हाही जा एकतर तो झोपलेला असे किवां ..जागा असेल तर त्याच्या हातात पन्नी असे ..मला त्याचा नेहमी हेवा वाटे .. असे आपल्याला देखील दिवसरात्र नशा करायला मिळाले तर बरे होईल असे वाटे ..शेवटी एकच पुडी मिळाली ती घेवून घरी आलो गच्चीवर जावून आडोश्याला ती पुडी मारली ..आणि मग घरात गेलो .. उद्या सकाळच्या पंचवटीने ठाण्याला जायला निघायचे होते .. झोप अशी लागलीच नाही .. मी पुन्हा अनघाची भेट होणे शक्य होईल या आशेने मेंटल हॉस्पिटल ला दाखल व्हायला तयार झालो होतो ..मात्र एकदा अँडमीट झाल्यावर तेथे किती दिवस राहायचे ते माझ्या मनावर नव्हते .. पहिल्या वेळेस ५० दिवस ..दुसऱ्या वेळेस तीन महिने ..तर तिसऱ्या वेळी मला सहा महिने तेथे रहावे लागले होते.. आताच्या वेळी किती महिने राहावे लागेल याची काही शाश्वती नव्हती ....व्यसनमुक्त राहिलो तर ....नक्कीच परत अनघाची भेट होऊ शकेल असे वाटत होते .

=======================================================================

भाग १३७ वा उबदार स्वागत ! 

सकाळच्या पंचवटी एक्सप्रेस ने निघून दुपारी बाराच्या सुमारास ..मेंटल हॉस्पिटल ठाणे येथे पोचलो ..गेट च्या बाहेरच माझ्या ओळखीचे दोन तीन अटेंडंट उभे होते ..मला पाहून त्यांना आनंद झालेला दिसला ..' अरे वा ..तुषार .. बरे झाले तू आलास ..२६ जाने .ला मस्त कार्यक्रम आहे इथे 'असे म्हणू लागले ..भावाला जरा आश्चर्यच वाटले .. गेट च्या आंत शिरताच जे जुने .. मला ओळखणारे व वार्डच्या बाहेर फिरणारे .. मनोरुग्ण होते ते मला नमस्कार करत होते ... चिना ने मला कुठूनतरी पहिले असावे ..तो जरा अंतर राखून आमच्या मागे मागे चालू लागला ..त्याला तर खुपच आनंद झालेला दिसला ..कारण ऐरवी त्याला कोणी व्ही .सी .आर वर सिनेमा लावला की पहायला बोलवत नसे .... त्याच्या हातापायावर असलेल्या कुष्ठरोगाच्या जखमांची इतरांना भीती वाटे ..कुष्ठ रोगाबद्दल असलेल्या गैरसमजांपोटी अश्या लोकांच्या वाट्याला नेहमी उपेक्षा ..तिरस्कार येत असतो ... मी आल्यावर मी चिनाला वार्ड न. १८ मध्ये सिनेमा पाहू देईन याची त्याला खात्री होती ..तसेच माझ्या शेजारी तो अगदी बिंधास बसू शकत होता .. भावाला हे सगळे बघून माझी गम्मत वाटत असावी ...मला म्हणाला ' तू इथे कायमचा का राहत नाहीस... इथे तुझे बरेच मित्र आहेत ..अर्थात तो हे गमतीने म्हणाला होता .. अधीक्षकांच्या कार्यालयात पोचलो तर अजूनही डॉ . लव्हात्रे हेच तेथील अधीक्षक होते ..मला पाहून म्हणाले ' अरे ..काय रे तुषार ..परत आलास ? ..कधी सुधारणार तू ..त्यांच्या बोलण्यात राग नव्हता तर माझ्याबद्दलची माया होती ..मग भावाकडे वळून ते म्हणाले ..हा इथेच जास्त सुरक्षित आहे ..आणि तुम्हाला देखील काळजी नसते ..नाहीतर बाहेत असला की ..नेमके काय काय भानगडी करेल ..किती पैसे उडवेल ..तब्येतीचे काय हाल होतील खात्री नाही .. ..त्यांनी माझ्या फाईल वर वार्ड न . १८ AB असे लिहिले .. मी त्यांना ' स्नेहदीप ' बद्दल विचारले तर खेदाने म्हणाले तो वार्ड सध्या बंद झालाय ..तिथे आम्ही इतर मनोरुग्ण ठेवले आहेत .. तुम्ही व्यसनी लोक किती डेंजर असता ते मला चांगले अनुभवायला मिळाले आहे ..धरले तर चावते ..सोडले तर पळते ..ही म्हण तुमच्यासाठीच असावी .. म्हणत ..जोरात हसून माझ्या पाठीवर थाप मारली ..

मला वार्ड न .१८ पाशी सोडून भाऊ निघून गेला ..लव्हात्रे साहेबांनी मला घरचे कपडे घालायला परवानगी दिलेली होती .. वार्डात गेल्या वर माझे अटेंडंट मित्रच ड्युटीवर होते ..मला पाहून त्यानाही आनंद झालेला दिसला .. त्यांनी लगेच माझी कपड्यांची पेटी ठेवण्याची सुरक्षित व्यवस्था केली ..मला चांगला पंख्याखाली असलेला पलंग पाहून दिला ..' एकजण म्हणाला वार्डात पुन्हा ढेकुण झालेत ..बरे झाले तू आलास ..आता एकदा मस्त साफसफाई करू..चारपाच नवीन चेहरे सोडले तर वार्डात तेच जुने चेहरे दिसले ..दिलीप .अनिरुद्ध ..कीथ ..नंदू ..वगैरे ...म्हातारा त्रिभुवनदास देखील होता ..मला पाहून जवळ आला आणि त्याचे प्रश्न सुरु झाले ' क्या पिया ? ..गांजा ? शराब ? ब्राऊन शुगर ? हेरॉईन ? कोकेन ? " मी नुसताच हसलो ..तर मला टाळी दिली त्याने .. मला टर्की सुरु झालेली होती .म्हणून पलंगावर पडून राहिलो .. सिस्टर ने दुधात ग्लुकोज घालून आणून दिले ..घेण्याची इच्छा नव्हती मात्र सिस्टर ने इतक्या अगत्याने आणले म्हणून डोळे मिटून पटकन दुध प्यायलो ..पडल्या पडल्या...घडल्या घटनांचा विचार करत होतो .. या वेळी पुन्हा ब्राऊन शुगर प्यायला सुरवात केल्यावर माझे जास्तच नुकसान झाले होते .. प्रत्येक वेळी असेच होत आलेय .. जरा तब्येत बरी झाली ..घरचे विश्वास ठेवू लागले .. हाती पैसा आला ..की माझ्या मनातील ..एकदा घ्यावे ..थोडेसेच ..फक्त आजच.. हे व्यसनाचे आकर्षण जागृत होत होते .. मी एकदा म्हणून घ्यायला गेलो की नकळत अडकत होतो ..प्रत्येक वेळी कारणे जरी वेगवेगळी सांगितले असली मी व्यसन सुरु करण्याची तरी देखील ..खरे कारण हेच होते ..की मला व्यसन केल्यानंतरची ती गुंगीची .. हलकेपणाची .. सगळे ताण संपल्याची जी अवस्था प्राप्त होते ..ती मनापासून आवडत होती .. एकदा नियमित सुरु झाले की घर दार ..कुटुंबियांचे प्रेम .. नोकरी ..इतकेच काय .. स्वतची तब्येत .. या सगळ्या बाबत मी बेपर्वा होत होतो .. मला वाटे जे काही होईल ते पाहून घेवू ..ठीक करू .. वगैरे ..मात्र पाहता पाहता सगळे माझ्या कंट्रोल च्या बाहेर होई ..आणि पश्चातापाची पाळी येत असे माझ्यावर !
आता तीनचार दिवस टर्की सहन करावी लागणार होती ..संध्याकाळी जास्त त्रास होऊ लागला म्हणून .बाथरूम मध्ये नळाखाली जावून बसलो ..थंड पाण्याची धार बरी वाटत होती अंगावर .. अर्धा तासाने थंडी वाजू लागली तसा उठलो .. पुन्हा पलंगावर .. तिन्हीसांजा झाल्या होत्या ..आठवणींची पाखरे .. मनात भिरभिरू लागली होती ..मला लता मंगेशकरांचे '' या चिमण्यांनो परत फिरा रे ..घराकडे आपुल्या ..जाहल्या तिन्ही सांजा "..हे गाणे आठवले ... अंगावर का टाच आला .. लतादीदींनी ' दहा दिशांनी येईल आता अंधाराला पूर ...ही ओळ इतक्या उंच आणि कातर स्वरात म्हंटली आहे की खरच सगळीकडून अंधाराच्या लाटा अंगावर येतात की काय असा भास होतो ..एका आईच्या भावनांचे यथार्थ वर्णन केलेय गाण्यात .. घराबाहेर असलेली मुले सुरक्षित तर आहेत ना ? या काळजीने तिचे मन व्यापून गेलेय ...बाहेरच्या क्रूर ..निष्ठुर ...फसव्या जगात आपले भाबडे पोर गेलेय ..केव्हा एकदा ते घरी येईल असे तीला होते .. पण मुलांना असते का आईच्या अश्या काळजीची पर्वा ..मी तर रात्री ..बेरात्री घरी येत असे ..तो पर्यंत आई जागीच असे ..जिन्याच्या पायऱ्यांवर माझी चाहूल लागताच पटकन बेल वाजविण्याच्या आधीच दार उघडलेले असे ..आणि पहिले वाक्य ...जेवण करून घे ...त्यावेळी आईचा खरे तर राग येई ..इतकी काय काळजी करायची ..मी काय आता कुकुल बाल आहे का ? .. वगैरे विचार मनात येत असत ..त्यावेळी आई म्हणे ..तुला बाप झाल्याशिवाय नाही कळणार ते ..खरेच मला कोणाच्या भावनांची पर्वा नव्हती .. फक्त माझा आनंद ..माझी मजा .. माझ्या इच्छा.. यात गुरफटलो होतो म्हणूनच तर असा भरकटलो देखील होतो .

=======================================================================

भाग १३८ वा   प्रजासत्ताक दिन !

या वेळेस टर्की चा फारसा त्रास जाणवला नाही .. थंडीच्या दिवसात तसाही टर्की चा त्रास कमी होतो असा माझा अनुभव होता ..पण हा त्रास घरी राहून सहन कारणे अगदी जीवघेणे असते .. कारण सगळ्यात मोठा त्रास म्हणजे रात्री झोप न येणे .. दिवसभर घरातील लोक जागे असताना .. वेळ निघून जातो कसातरी ..अन रात्र एकदम अंगावर आल्यासारखी होते ..जेव्हा सगळे गाढ झोपलेले असतात . छान घोरत असतात ..तेव्हा आपण टक्के जागे .. मन अश्यावेळी खूप तडफडते .. अनेक जुन्या ...जुन्या आठवणी मन:पटलावर येतात .. त्यातील बहुतेक आठवणी या विसरून जाव्यात म्हणून आपण ठरवले असते .. त्या अंतर्मात खूप तळाला गेलेल्या असतात ...स्वताच्या केलेल्या चुकांची बोच ..त्यांचे झालेले परिणाम .. कितीही प्रयत्न केला तरी भरून न येणारा काळ .. स्वत:चाच खूप राग येतो ..आपण असे वागलोच कसे ? हा प्रश्न वारंवार सतावतो ..जीवन किती अशाश्वत आहे याची प्रखरतेने जाणीव होऊन मनात निराश्या दाटून येते .. पुढे कसे ? हा प्रश्न डोंगराएवढा होऊन मनावर दडपण येते ...सारखे कुस बदलत झोपेचा प्रयत्न केला ...तरी मन काही कुस बदलण्यास तयार नसते .. अपराधीपणाची काटेरी बोच ..मनाला रक्तबंबाळ करत राहते ..येथे तशी समस्या नव्हती झोप आली नाही तरी नाईट ड्युटीवर असलेल्या अटेंडंट सोबत गप्पा मारण्यात ..चेस खेळण्यात रात्री दीड दोन वाजत ..मग तो पर्यंत औषधे खावून लवकर म्हणजे सायंकाळी ७ ला झोपी गेलेले एकेक जण जागे होण्यास सुरवात होई .. त्यांच्या येरझाऱ्या सुरु होत . त्यांच्याकडे पाहत वेळ जाई ..पाहता पाहता पहट होत असे ..या वेळी दाखल होण्याआधी वरोरा ..अकोला येथे मी टर्की सहन केलीच होती व त्यानंतर जास्त प्रमाणात व्यसन केले नव्हते म्हणून टर्की लवकर संपली .. मी बरोबर १ जाने .१९९०९ मध्ये ही चौथी अँडमिशन घेतली होती मेंटल हॉस्पिटल येथे .. नवीन वर्षाची सुरवात तर चांगली झालेली होती ..

दरवर्षी प्रमाणे यंदाही २६ जाने. या प्रजासातक दिनानिमित्य येथे झेंडावंदन आणि खेळ ..सांस्कृतिक कार्यक्रम वगैरे होणार होते ....त्यात गाणी वगैरे म्हणायला ..राष्ट्गीत म्हणण्यासाठी पुढाकार घ्यायला मी आलो होतो म्हणून मेंटल च्या मला ओळखणाऱ्या सर्व कर्मचा-यांना आनंद होणे स्वाभाविक होते ...वार्ड न . १८ चा माझा हार्मोनियम वाजविणारा आणि अशा सांस्कृतिक कार्यक्रमांची जवाबदारी घेणारा अटेंडंट मित्र मला पाहून खूशच झाला होता .. तो नाईट ड्यूटी वर असला की रात्री आम्ही संगीत कक्षात जावून मस्त नवी जुनी गाणी आठवत असू .. तो मला एकेक कठीण .. गाणे म्हणायला सांगे ..गाण्यातील दर्दी होता चांगला ..२ दिवसानंतर आपण प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमाची तयारी सुरु करू असे मला सांगितले होते .. आपल्या देशात स्वातंत्र्य दिवस ..प्रजासत्ताक दिवस हे दिन राष्ट्रीय दिन म्हणून पाळण्यात येवून त्याची सुट्टी असते ..सगळीकडे आनंदाचे ..देशभक्तीचे वातावरण असते .. या दिवशी देशभक्तीची लाट येते .. सगळीकडे समर गीते ..स्वातंत्र्याचे मोल ..पुढारी वर्गाची आश्वासक भाषणे ..लाल किल्ल्यावर मा .पंतप्रधान यांचा संदेश ... सेनेचे संचालन .. राष्ट्रध्वजाचे महत्व .. वगैरे गोष्टीना उधाण येते ..स्वातंत्र्य प्राप्तीसाठी जीवाची ..घरादाराची बाजी लावणारे केव्हाच काळाच्या पडद्या आड गेलेत . ..राज्य घटना लिहिताना डॉ .बाबासाहेब आंबेडकर यांनी पाहिलेले समृद्ध ..सशक्त ..भारताचे स्वप्न ..लबाड लोकप्रतिनिधीनी लुटून खाल्लेय ...प्रजासत्ताक दिन म्हणजे प्रजेची सत्ता ..लोकशाही कार्यपद्धती लागू केलेला दिवस ...आपल्या देशातील लोकशाही ही फक्त नावालाच राहिली आहे ..घराणेशाही ..भांडवल शाही .. ठोकशाही ..झुंडशाही .. या सगळ्यांचे जे काही विचित्र मिश्रण तयार होऊन त्याची मिळून सध्या कार्यरत असलेली जी खुर्चीशाही झालीय त्यालाच आपण सर्वसामान्य लोक लोकशाही समजतो . माझा मित्र विलास पाटील याने सध्याच्या संधीसाधू स्वार्थी पुढारी वर्गावर एक छान स्फोटक कविता केलेली होती ..बारावीला असताना त्या कवितेने आम्ही खूप प्रेरित झालो होतो ..ती कविता अशी होती .

सावधान !

तमाम मंत्री -संत्री ,आमदार -खासदार , आणि पुढारी जनहो ..सावधान दूर रणशिंग निनादते आहे ..फाटलेल्या आभाळातून कोसळणारे तुमच्या आश्वासनांचे शिलालेख ..आणि त्या खाली चेंगरणारे..माझे कोट्यावधी देशबांधव ..रक्त मांसाच्या त्या चिखलातून क्रांतीची चाहून एकू येते आहे ..सावधान !

तुमचे दौरे ..दुष्काळ ग्रस्तांचे..पूरग्रस्तांचे ..वादळग्रस्तांचे विमानातून सौ . सह ..आणि त्या हृदयद्रावक आठवणी सांगतायेत तुमच्या सौ . क्लबमध्ये बसून चिकन खाताना वा ...क्या कहेने है ! सावधान 

तुमची बंटी ..पिंकी .कॉन्व्हेंटला ....कारमधून ..कँडबरी चघळत जाईनात ..जाईनात ..पण रस्त्याच्या कडेलाबसून बुटपाँलिश करणाऱ्या चार ..दोन ध्रुवांच्या अंगावर धूळ पाखडत ? ...सुभानल्लाह ..सावधान ! 

तुमची सुकन्या ..लिपस्टिकचे ठसे उमटवतेय तिच्या प्रियकराच्या गालावर सिमल्याच्या निसर्गरम्य वातावरणात ..पाँश ..महागड्या हॉटेलात आणि ..त्या क्षितीजा पलीकडे.. टिचभर पोटाची खळगी भरण्यासाठी आभाळमोलाची अब्रू विकणाऱ्या माझ्या शेकडो भगिनी माशाल्ला..सावधान !

ठीक आहे ..ठीक आहे ..खुर्च्या तुमच्या ताब्यात आहेत माईक तुमच्या हातात आहेत ..कारण ..कारण अजून तलवार माझी म्यानात आहे ..पण सावधान .निखाऱ्यावर अजून राख आहे उद्या कदाचित उडून जाईल ..रोकतो कोण मग मला ..मी नक्षलवादी होईन ..

ही कविता माझी पूर्वीची ..बापाच्या जीवावर कॉलेजात जायचो हिटलर ..लेनिन .मार्क्स वगैरे वाचला होता ..पण.. पण आताश्या मी उभा असतो लाईनीत रेशनच्या ..हातात घामेजलेले रेशनकार्ड अन ...रिकामा रॉकेलचा डबा घेवून ..युनिटला अर्धा ..या हिशोबाने मिळणारे दीड लिटर रॉकेल ..न ..राशनकार्डचा एवढासा कागदी तुकडा ..या भांडवलावर या साल्यांच्या टोप्या तरी जळतील काय ? 

गावाबाहेर उजाड माळरानावर एक पडकी विहीर आहे ..इतिहासाची सारी सोनेरी पाने काढून .. मी तिची डागडुजी केलीय ..अन घरची चूल विझवून दीड लिटर रॉकेल त्यात ओतून ..वाट पाहत बसलोय .वेड्यापिरांची ..एक दिवस असा येईल ..विहीर तुडुंब भरेल ..मग मग भडका उडवून देवू एकदम .. है कोई दिलवाला ..है कोई माई का लाल ? साद दिलीय ..पण प्रतीसाद ...प्रतिसाद मात्र शून्य .. 

अहो प्रतिसाद उमटेलच कसा ? ..आंधळ्या धृतराष्ट्राचे माजलेले पुत्र नाक्या नाक्या वर मोर्चे बांधून सज्ज आहेत ..शिखण्डीचे समस्त भाऊबंद आपल्या घरादाराची बिळे बुजविण्यात मग्न आहेत ..दधीची चा वंश उरलाच कुठेय .. उरत वणवा पेटलाय ..रॉकेलची मला गरज नाहीय समुद्र पाण्याचा मी पेटवणार आहे ..

असे म्हणतात की संतृप्त अश्रू कधीच वांझ नसतात ..ते देखील जोपासत असतात ..अणु-विभाजनाचा स्फोटक सिद्धांत .. संतृप्त अश्रुना आईनस्टाईन ..मी भेटवणार आहे ..रॉकेलची मला गरज नाही समुद्र आसवांचा मी पेटवणार आहे ..समुद्र आसवांचा मी पेटवणार आहे !

विलास गोवर्धने ( पाटील )

ही कविता विलास इतका आक्रमक आणि ठामपणे म्हणे की ऐकताना अंगातून रक्त सळसळत असे आमच्या .. आजही इतक्या वर्षानंतर ही कविता माझी तोंडपाठ आहे .. खरोखर या राजकीय लोकांनी सर्वसामान्य माणसांना इतक्या वेगवेगळ्या प्रकराच्या समस्यात ..भेदात ..दुहित ..इतके छान अडकवून ठेवले आहे की सर्वसामान्य जनता त्यांच्या विरोधात एकत्र येवून कधीच आंदोलन करू शकत नाही ... 

( बाकी पुढील भागात ) 

=======================================================================

पुन्हा एकदा अलार्म ! ( भाग १३९ वा ) 


मेंटल हॉस्पिटल मध्ये तसा जेल पेक्षा सुरक्षित कारभार असतो .. कारण कैदी अन मनोरुग्ण यातील प्रमुख फरक हा की समजून उमजून .. एखाद्या विकाराच्या अधीन होऊन गुन्हा केलेले ..आणि त्या बद्दल शिक्षा प्राप्त झालेले लोक जेल मध्ये असतात ..या पैकी बहुतेकांना ..आपण केलेल्या चुकांचा पश्चाताप होण्याऐवजी ..पकडले गेल्याचे दुखः जास्त असते .. आणि पुढच्या वेळी पकडले न जाता गुन्हा करण्याची योजना सतत मनात घोळत असते बहुतेकांच्या .. सुधारण्याऐवजी ....ते गुन्हेगारीच्या नवनवीन कल्पना आत्मसात करू शकतात .. तर मेंटल हॉस्पिटल मध्ये ...न केलेल्या ..गुन्ह्यांची शिक्षा निसर्ग देत असतो ...आता हे असे का ? काही जन्मतः... अपंग वेडे वाकडे जन्माला येतात ..त्यांच्या मेंदूतील काही रासायनिक बिघाड त्यांना सर्व सामान्य माणूस म्हणून जगण्यापासून देऊ ठेवतो .. तर काहीना आयुष्याच्या वाटेवर काहीतरी मानसिक आघातामुळे .. अचानक अश्या बिघडले पणाला सामोरे जावे लागते .. आणि सर्व सामान्य लोकांमध्ये राहण्याच्या कामाचे नाहीत म्हणून मेंटल मध्ये आणले जाते ..ज्या प्रमाणे काही शारीरिक आजार पूर्ण बरे होत नाहीत .. अधूमधून डोके वर काढतात ..तसेच मानसिक आजारांचे देखील आहे .. काही मानसिक आजार .. पूर्ण बरे न होता ..दिवसेंदिवस परिस्थिती डॉक्टरांच्या दृष्टीने अधिक अधिक बिघडत जाते ..आणि मग कायमचे मेंटल हॉस्पिटल मध्ये राहावे लागते .. प्रगत शास्त्राकडे अजूनही अशा दुर्धर मानसिक व शारीरिक आजारांसाठी उपाय सापडले नाहीत .. शेवटी डॉ . आम्ही शर्थीचे प्रयत्न करतो आहोतच ..मात्र शेवटी त्याची इच्छा म्हणून आभाळाकडे बोट दाखवितात .. येथे आठ नंबर आणि एक नंबर हे वार्ड ' क्रिमिनल ' म्हणून ओळखले जातात हे मी मागे सांगितले होते .. तर आमच्या १८ AB या वार्ड च्या मागील बाजूस हा आठ नंबर वार्ड होता .. तेथे वेडाच्या भरात खून केलेले ... कोणावर तरी जीवघेणा हल्ला केलेले .. त्यांच्या आजारामुळे कधीही आक्रमक होऊ शकणारे असे रुग्ण ठेवले जात असत .. मला या वार्ड बद्दल खूप कुतूहल होते ..मात्र तेथे ड्युटीवर असलेल्या अटेंडंटशी फारशी ओळख नसल्याने मला तो वार्ड आतून या पूर्वी पाहता आला नव्हता ..एकदा माझा अटेंडंट मित्र शत्रू याची तेथे ड्युटी लागली ...त्याने मग मला तो वार्ड आतून दाखविला .. वेगवेगळ्या स्वतंत्र खोल्या ..सर्व खोल्यांची तोंडे बाहेरच्या व्हरांड्याकडे .. समोर भक्कम गज लावलेली जाळी ..आत मध्ये पिंजऱ्यात कोंडलेल्या वाघासारखा ..येरझाऱ्या घालणारा ..किवा खोलीत भिंतीला टेकून बसलेला ..भावरहित डोळे .. कठोर चेहरा .. असा आतील मनोरुग्ण पाहून भीतीच वाटे ...काही जण जरा माणसाळत असलेले अधून मधून खोलीच्या बाहेर काढले जात .. तुलनेत चांगले असलेले वार्डचे जेवण चहा वगैरे आणण्यात मदत करत .. 

काही चतुर गुन्हेगार ..गुन्हा केल्यानंतर शिक्षा होऊन जेल मध्ये राहावे लागू नये म्हणून कोर्टात वेडाचे सोंग घेतात ...त्या साठी संबंधित वैद्यकीय अधिकाऱ्यांची प्रमाणपत्रे जोडून .. जेल मध्ये राहण्या एवजी कमी त्रासदायक म्हणून मेंटल हॉस्पिटल मध्ये राहणे पसंत करतात .. येथेही तसे दोन जण होते ..त्यापैकी एक खरोखर मनोरुग्णा असावा असा संशय येण्याइतपत विचित्र वागत असे ..तर दुसरा मात्र कोणतेही वेडाचे लक्षण नसलेला असा मला वाटला .. त्याचे नाव वाजीदअली आहे असे समजले ..अंगाने मजबूत ..जरा बुटका .. हसतमुख असा वाजीदअली ...अनेक वर्षांपासून आठ नंबर वार्ड मध्ये आहे अशी माहिती मिळाली ..त्याने खून केला होता .. आणि जेल मध्ये जाण्याऐवजी तो कोर्टात मनोरुग्ण आहे असे सिद्ध होऊन येथे राहत होता .. घरचा चांगला श्रीमंत होता ..त्याला रोज घरून तीनखणी डबा येत असे ..तसेच त्याच्या जवळ नेहमी भरपूर पैसे देखील असत ..त्या पैश्यांच्या जोरावर त्याने सगळ्या अटेंडंट ना विकत घेतले असावे असे वाटे ...अधून मधून त्याला दारू ...देखील मिळत असावी ..तो रात्रीचा जुगारी अटेंडंट बरोबर पत्ते कुटण्यातला साथीदार देखील होता ..एकंदरीत त्याने सर्वांचा चांगला विश्वास संपादन केलेला होता ..आठ नंबर वार्ड पाहिल्यानंतर माझ्या लक्षात दोन जण राहिले ..एक जण दिलीप म्हणून पत्रकार होता ..अतिशय हाडकुळा .. हाडे वर आलेली .. चेहऱ्यावर भीतीचे भीतीचे भाव ...याचा नेमका गुन्हा काय ..ते कोणी सांगितले नाही मला मात्र ..त्याला दर चार तासांनी म्हणे एक इंजेक्शन द्यावे लागे .. हा दिलीप कोणाशीही कधीही बोलत नसे ..मी जेव्हा वार्ड पाहायला गेलो ..तेव्हा त्याला बाहेरून हँलो केले ..तर नुसताच तोंडाकडे पाहत राहिला .. मग मी एक बिडी पुढे केली तर पटकन उठून माझ्या हातातील बिडी घेतली ..आणि हलकेच स्मित केले फक्त मात्र बोलला नाही काही .. 

एकदा रात्री सुनील आणि मी ..चेस खेळत असताना ११ च्या सुमारास एकदम वार्ड नंबर १८ च्या बाजूने गोंधळ ..आरडा ओरडा एकू आला .. आम्ही खिडकीतून पहिले तर बरेच लोक वार्डच्या बाहेर जमलेले दिसले ..मग जोरात शिट्या फुंकल्याचा आवाज आला ..अजून गर्दी जमली .. अटेंडट ने अशी शिटी फुंकणे म्हणजे धोक्याचा इशारा असे ..शिटी फुंकून तो इतरांची मदत मागत असल्याची निशाणी होती ..मला खूप उत्सुकता होती बाहेर जावून काय घडते आहे हे पाहायची ..पण सुनील ने मला रात्रीचे बाहेर जाण्यास मनाई केली ..म्हणाला सकाळी समजेलच सारे आपल्याला काय घडले ते ...दुसऱ्या दिवशी सकाळी बातमी आली की वाजीदअली गेला .. रात्री हार्टफेल ने वारला .. मग पुन्हा सकाळी ड्युटीवर आलेल्या खाजगी अटेन्डट बाळू याने सविस्तर बातमी सांगितली की ..रात्री म्हणे ८ नंबर मधील अटेंडंट वार्डच्या किल्ल्या वाजीदअली कडे देवून जेवायला गेले असताना .. अचानक वाजीदचे डोके फिरले ..बहुधा दारू देखील प्यायलेला होता तो ..त्याने वार्डचे गेट आतून लावून घेवून ..मग बंद खोल्यांमध्ये असलेल्या एकेका मनोरुग्णाला आपल्या तीन साथीदारांच्या मदतीने बाहेर ओढून उगाचच मारहाण सुरु केली होती .. अगदी बेफाम झाला होता वाजीदअली .. ड्युटीवरचे अटेंडंट जेवून परत आले होते त्यांनी बाहेरून वाजीदकडे किल्ल्या मागितल्या मात्र तो कोणाचेही ऐकायला तयार नव्हता ..अगदी रणकंदन माजवले होते त्याने .. मग पप्पू नावाच्या एका पायाने अधू .. असलेल्या मनोरुग्णाने जर धाडस करून वाजीद च्या हाताला कडकडून चावा घेतला तेव्हा त्याच्या हातातील किल्ल्या बाहेर गेटजवळ फेकल्या गेल्या ..अटेंडंट ने त्या किल्ल्या पटकन आत हात घालून हस्तगत केल्या ... मग सगळे अटेंडट आत शिरले ..बेफाम झालेल्या वाजीदला पकडले गेले ..त्याला बांधून ठेवले गेले ..आणि रात्री म्हणे झोपेतच हार्ट अँटँक येवून वाजीद मरण पावला ...आधीच्या सगळ्या कथेवर माझा विश्वास बसला ..मात्र नंतर वाजीदला रात्री बांधून ठेवल्यावर त्याला हार्ट अँटँक येवून तो मरण पावला ..या गोष्टीवर अजूनही माझा विश्वास बसलेला नाहीय ..पप्पू नंतर बाहेर भेटला तेव्हा त्याला काय झाले ते विचारले ..हा पप्पू पूर्वी पाकीटमार होता .. एकदा त्याला पाकीट मारताना पब्लिकने पकडून बेदम मार देवून धावत्या लोकलच्या खाली फेकून दिले होते म्हणे ..त्यावेळी त्याचा एक पाय मोडला होता ..व डोक्याला मार लागून त्याला फिट आली होती ..तेव्हापासून तो मनोरुग्णा झाला ....पप्पू ने देखील तेच सांगितले ..आधी पप्पू ने फुशारकी मारत बाजीदअली च्या हाताला कसा चावलो ..किल्ल्या कश्या हाती लागल्या ..वगैरे वर्णन केले शेवटी ' बादमे साले वाजीद को पकडकर बांधा था ..कैसे मर गया मालूम नही ....मै तब सो गया था " असे सांगितले ..! 

=======================================================================

भाग १४० वा   काहे को ..दुनिया बनाई ... !

या वेळी मेंटल हॉस्पिटल मध्ये पूर्वीसारखी मजा येत नव्हती .. उगाच कसे तरी ढकलायचे म्हणून दिवस मी ढकलत होतो .. राहून राहून अनघाचा विचार मनात येत असे .. ती कोठे असेल ? ..आपली आठवण करत असेल का ? परत तिचे पत्र येईल नक्की आपल्याला मागच्यावेळे सारखे ...या आशेने रोज सकाळी १ वा. पर्यंत मी हॉस्पिटल च्या मेनगेट पाशी बसून पोस्टमन आला की माझ्या नावाचे पाकीट आहे का हे पाहत असे ... हे असे वाट पाहणे जीवघेणे असायचे .. पोस्टमन ने पत्र नाही सांगितले की ..मग पाय ओढत वार्डात यायचे .. माझे जेवण काढून ठेवलेले असायचे ते पोटात ढकलायचे ...मग दिवसभर उगाच इकडे तिकडे टंगळ मंगळ .... रात्री उलटेसुलटे विचार करून झोपेचे खोबरे .. घडल्या प्रकारचा दोष कोणावर तरी ढकलून उगाच माझ्यावर किती अन्याय होतोय अशी मानसिकता ...कधी कधी तर असे वाटे एकदाचे लवकर तिसरे महायुद्ध होऊन सगळे सगळे संपून जावे.. एकदा दुपारचा असाच फिरत फिरत वार्ड न. १३-१४ मध्ये गेलो होतो ..येथे 'इपिलेप्सी ' या आजाराचे मनोरुग्ण ठेवलेले होते ... बहुतेकांचे चेहरे भयानक झालेले .. वारंवार फिट आल्याने त्यांचे पुढचे दात तर हमखास गायब झालेले .. अचानक फिट आल्यावर तोंडावर पडल्याने ..किवा ओठ दाताखाली आल्याने ८० टक्के लोकांच्या ओठावर....कपाळावर..अथवा हनुवटीवर जखमांचे भयानक व्रण ... भेसूर दिसायचे बिचारे ..शिवाय जेवणाची आबाळ झाल्याने दिवसेंदिवस खराब होत चाललेली तब्येत ..एखाद्याला रस्त्यात फिट आल्यावर .कांदा फोडून त्याच्या नाकाशी धरणे ..चप्पल सुंघवणे वगैरे गोष्टींबाबत मी ..तेथील डॉक्टर कडे माहिती विचारली ..तर त्याने या गोष्टींचा फिट शी काहीही शास्त्रीय संबंध नाही असे सांगितले .. मेंदूत अपघाताने निर्माण झालेल्या रासायनिक बिघाडामुळे ..किवा जन्मतः मेंदूच्या विकासातील काही कमतरतेमुळे हे असे होते असे त्यांनी सांगितले ...चप्पल वगैरे सुंघवण्याऐवजी ...त्याला कुशीवर वळवणे .. त्याचे कपडे सैल कारणे ..फिट आलेल्या अवस्थेत त्याला स्वतचे रक्षण करता येत नसल्याने त्या काळात त्याला काही इजा येणार नाही याची काळजी घेणे ..डोक्याखाली उशी किवा मऊ वस्तू ठेवणे ज्यामुळे त्याचे डोके जमिनीवर वगैरे आपटून डोक्याला इजा होणार नाही ..किवा दाताने ओठाला ..अथवा जिभेला इजा न होण्यासाठी काळजी घेणे वगैरे गोष्टी सांगितल्या .. आणि सर्वात महत्वाचे म्हणजे अश्या माणसाला तो पूर्ण शुद्धीवर येवून पाणी मागे पर्यंत जबरदस्ती पाणी पाजण्याचा प्रयत्न न करणे ..कारण अश्यावेळी पाणी श्वासनलिकेत जावून जीवघेणा ठसका लागण्याची शक्यता असते .

येथेही एक विचित्र प्रकार समजला .. अर्थात यात कितपत सत्यता आहे हे पडताळणे जरा कठीणच होते .. तेथे असलेल्या एका खाजगी अटेंडंट ने एका जन्मतः मुक्या... दात पडून चेहरा अतिशय विद्रूप झालेल्या साधारण तिशीच्या व्याक्तीकडे बोट दाखवून ..सांगितले की येथे पूर्वी एक समलिंगी संबंधाची आवड असलेल्या अटेंडंट ने याच्या वर त्याचे समलिंगी संबंधांचे प्रयोग केले होते ..हा ओरडला तेव्हा सगळे बिंग बाहेर पडले ... मग त्या अटेंडंट वर कारवाई झाली .. हे ऐकून मला कसेतरीच झाले ...ही अशी ओढ एखाद्याच्या मनात कशी निर्माण होत असेल ? असा प्रश्नही मनात डोकावला ....असे काही लोक बाहेरच्या जगात देखील मी ऐकून होतो .... असे लोक ..उगाचच जवळीक करतात ..अंगाला हेतुपूर्वक नको त्या जागी स्पर्श करून ...एखाद्याची चाचपणी करतात हे माहिती होते....लहान मुलांना अश्या लोकांपासून धोका असतोच ..इतकेच नव्हे तर एखाद्या मुलाला हे अश्या प्रकारे बिघडवू देखील शकतात ...म्हणजे अश्या प्रकारच्या संबंधाची चटक लावून देवू शकतात ...त्याच्या मानसिकतेत बिघाड निर्माण होऊन ..लैंगिक संबंध म्हणजे हे असेच असते अशी अशी भावना वाढीस लागून ..तो देखील पुढे अश्या संबंधात इतरांना ओढू शकतो ...काही जणांच्या बाबतीत निसर्गतः हार्मोनल असंतुलनामुळे अशी लक्षणे उद्भवतात हे नंतर समजले ..एकदा तर अश्या प्रवृत्तीच्या एका व्यक्तीला एकांतात गाठून लुबाडण्याचा आमचा प्रयत्न फसला देखील होता ...

मेंटल हॉस्पिटल मध्ये अजून एक गोष्ट लक्षात आली ..की तेथे असलेल्या अनेक मनोरुग्णांना ..धड कपडे घालणे .. अंघोळ करणे ..जेवणे ... सुसंगत बोलणे ..अथवा विचार करणे ..त्यांच्या आजारामुळे येत नसले तरी लैंगिक सुखाच्या पूर्तीची ओढ मात्र कायम असे ...निसर्ग या बाबतीत त्याचे काम चोख करत असे ...अश्या लोकांना हस्तमैथुन मात्र बरोबर समजत असे .. काही जण तर दिवसातून चार पाच वेळा असे करीत असत .. हे सगळे पाहून कधी कधी मानवी जीवनाचे खूप वैषम्य वाटे ... नैसर्गिक किवा उपलब्ध बौद्धिक ..शारीरिक ..भौतिक ..क्षमतांचा जास्तीत जास्त गैरवापर करण्यात मानवाचा कोणी हात धरू शकणार नाही हे नक्की ... याचे कारण बुद्धीला विवेकाचा लगाम नसणे हेच असावे ... आपले कोणी काही वाकडे करू शकत नाही हा माज ..नाहीतर क्षणिक सुखासाठी काहीही करायची मानसिकता ... त्यामुळे माणूस सर्व कौटुंबिक ..सामाजिक आणि नैसर्गिक बंधने माणूस झुगारून देवू शकतो ...मी देखील असाच माझ्या बौद्धिक क्षमतांचा गैरवापर व्यसने करण्यासाठी करत होतो .. केवळ मनाला बरे वाटते ..काही काळचा ..तणावमुक्तीचा अनुभव ... मनोराज्ये रचण्यासाठी नशा केल्यावर मिळणारी स्फूर्ती .. यासाठी मी वारंवार सगळे जीवन असेच पणाला लावत होतो .... नुकसान झाले की तात्पुरता .. माफी मागत होतो .. काही काळ व्यसने बंद करत होतो ..मग पुन्हा ये रे माझ्या मागल्या ...आणि वर नुकसान झाले की दोष स्वतःकडे न घेता .. माणसे ..परिस्थिती .. व शेवटी नशिबाला दोष देत होतो .. अनघाच्या प्रकरणात सगळा दोष माझाच होता ..तरीही मला वाटत होते की माझे नशीब खराब आहे .. मला कोणी सहकार्य करत नाही .. सगळे जग स्वार्थी आहे ..ढोंगी आहे वगैरे .. खरेतर सगळ्यात जास्त स्वार्थी आणि ढोंगी ..दुटप्पी वागणारा मी होतो .. हे लक्षात आले की ..पण मनातील स्वतचे समर्थन करणारा वकील .. जगात आपल्यापेक्षा कितीतरी लोक जास्त वाईट वागतात .. खून ..बलात्कार करतात .. जमिनी हडपतात .. आपल्या मानसिक आनंदासाठी अनेकांचा प्राण वेठीस धरतात ... मी तर फक्त व्यसने करतो .. असे स्वतःला समजावून पुन्हा माझा व्यसनमुक्तीचा निश्चय डळमळीत करण्याचे काम करत होता .

एकदा रात्री एक दीड च्या सुमारास नाईट ड्युटीवर असलेल्या सुनीलशी .. चेस खेळत बसलो असताना ..आमच्याच तिसऱ्या मजल्यावर असेलल्या समोरच्या १८ CD या वार्डातून एकदम काहीतरी धाडकन पडल्याचा ..आणि एखादे भांडे जमिनीवर पडल्यावर जसा कर्कश्य आवाज होतो तसा आवाज आला ..मग पुन्हा शांतता .. रात्रपाळीचा ओवरसीयर नुकताच व्हिजीट देवून गेला होता ..व आम्हीही लवकरच झोपण्याच्या तयारीत होतो ..हा एकदम कसला आवाज आला हे जाणून घेण्याची दोघानाही उत्सुकता होती ..मात्र थंडी इतकी वाजत होती त्या दिवशी की आम्हाला उठून काय घडले आहे ते पाहण्यासाठी उत्साह नव्हता ..मी सुनील ला म्हंटले देखील ' चल पाहून येवू समोरच्या वार्डात काय झालेय ते .. ' यावर सुनील म्हणाला ' तिथे अटेंडंट आहे ना ड्युटीवर ..काही विशेष असेल तर तो येईलच आपली मदत मागायला ..तू काळजी नको करूस ' मग आम्ही झोपलो ..पहाटेचार च्या सुमारास समोरच्या वार्डातील अटेंडंट येवून आमच्या वार्डचा दरवाजा ठोकू लागला ..तो खूप घाबरलेला दिसला ... अगदी बोबडीच वळली होती त्याची ..काय झाले म्हणून ते पाहायला मग आम्ही त्याच्या मागोमाग गेलो .. वार्डातील हॉल मध्ये शिरलो आणि समोरचे दृश्य पाहून जागेवरच थिजलो .. वार्डच्या मध्यभागी ...बाळू नावाचा एक जुना पेशंट उताणा पडला होता ..त्याच्या डोक्याखाली रक्ताचे थारोळे साचलेले ... प्राण सोडताना शेवटचे आचके दिल्यासारखे हात पाय झाडत होता ... सताड उघडे डोळे आकाशाकडे .. त्याच्या पासून दूर सगळे वार्डातील इतर पेशंट भेदरून गोलकार उभे होते ..त्याच्या बाजूला एक स्टीलची कप्पे असलेली थाळी पडलेली ..

( बाकी पुढील भागात )