प्रस्तावना !

माझ्या जीवनप्रवासा बद्दल ' मला समजलेला देव ..अल्लाह .गाँड वगैरे ' ही लेखमाला लिहितो आहे .. याचे प्रमुख कारण म्हणजे .. बालपणापासून एखाद्याला पडणारे स्वाभाविक प्रश्न .. त्यांची न मिळणारी उत्तरे ..बालसुलभ कुतूहल .. त्यापोटी धाडसी वर्तन .. त्यातून होणारा अनर्थ ..तारुण्यात प्रवेश करताना केलेल्या चुका .. एकदा भरकटल्या वर आयुष्याची होणारी फरफट ..त्यातून सावरण्याची केविलवाणी धडपड .. यश ..अपयशाचा लपंडाव .. आणि त्यातून मला झालेले जीवन दर्शन कदाचित वाचकांना काही शिकण्यास मदत करू शकेल असे वाटले .. व्यसनाधीनता हा भयानक मनो -शारीरिक आजार .. तो होण्याची कारणे .. त्यामुळे व्यसनी व्यक्तीचे व त्याच्या जवळच्या नातलगांचे होणारे गंभीर नुकसान या सगळ्या बद्दल सविस्तर माहिती मिळून त्यातून कोणाला सावरण्याची संधी मिळाली .. सुधारणेची शक्ती मिळाली कोणाचे जीवन सुरळीत झाले तर मी नक्कीच स्वतःला भाग्यवान समजीन....
तुषार नातू -फेसबुक प्रोफाइल
ब्लॉग संबंधी सूचना आपण comment box मध्ये देऊ शकता , किंवा मेल करा : tusharnatublog@gmail.com



मंगलवार, 12 मार्च 2013

कैसा ये नशा......हाय!!

भाग १६
एकीकडे आम्ही गांजा आणि चरस ओढत होतो तरी नेहमी नशा करताना आमच्या चर्चा मात्र देशहिताच्या व्हायच्या व भ्रष्टाचार , काळाबाजार , जातीयवाद असे विषय आमच्या चर्चेत असत . आमच्या या ' गंजडी ' समूहात सर्व जातीधर्माची मुले होती आणि आमचा वयाने मोठा असणारा मित्र विलास गोवर्धने हा जेव्हा जेव्हा आम्हाला भेटत असे तेव्हा तो नेहमी आम्हाला
चार चांगल्या गोष्टी सांगत असे ( मागे मी विलास गोवर्धने ची ' मी जिवंत आहे ' ही कविता वॉल वर टाकली होती , तो ' आकाश विश्व ' या नावाने देखील फेसबुकवर आहे ) विलास चे लग्न झाले होते व तो ' आर्टिलरी सेंटर ' मध्ये लिपिक पदावर नोकरी ला होता मात्र त्याचा मुळचा पिंड नोकरीचा नव्हताच , तो नेहमी देशात क्रांती झाली पाहिजे , सगळे भ्रष्टाचारी , लबाड राजकारणी संपले पाहिजेत असे बोलायचा त्याच्या मते आमचा समूह खूप चांगल्या मुलांचा होता पण फक्त ही मुले गांजा पिऊन वाया जात आहेत असे त्याला वाटे . आम्ही स्थापन केलेल्या ' शीतल ग्रुप ' या सामाजिक कार्य करण्यासाठी असणाऱ्या समूहाचे देखील त्याला खूप कौतुक होते . एकदा अशीच चर्चा सुरु असताना आपण एखादी गुप्त संघटना सुरु केली पाहिजे व अतिशय जहाल अशी ही संघटना असली पाहिजे आपण गुप्त पणे काम करून भ्रष्टाचारी , दोन नंबर चे काम करणारे लोक , मटक्याचा अड्डा चालवणारे , लबाड राजकारणी या प्रकारच्या लोकांना धाकात ठेऊन त्यांना वठणी वर आणले पाहिजे किवा संधी मिळाली तर यांचा खातमा केला पाहिजे असा विचार चर्चेत पुढे आला , प्रत्येकालाच काहीतरी करून दाखवायचे होते , सगळ्या जगाला हादरा बसेल असे काहीतरी . झाले ठरले लगेच विलास देखील होताच चर्चेत तो आमचा या गुप्त संघटनेचा ' बॉस ' असणार होता . मग संघटनेचे नाव काय ठेवायचे या वरून जरा चर्चा झाली आणि नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या आझाद हिंद सेनेच्या धर्तीवर काम करणारी आमची संघटना असणार होती म्हणून तिचे नाव ' आझाद सेना ' असे ठरले .

' आजाद सेना ' हे आमच्यासाठी एक स्फुरण होते , आमची सगळ्यांनी त्याच दिवशी दुर्गा बागेत आम्ही जेथे गांजा पीत होतो तेथेच एकमेकांच्या हातात हात देऊन गुप्ततेची शपथ घेतली . ( आता ही माहिती तुम्हाला सांगून मी गुप्ततेची शपथ मोडत आहे ) , गुप्त क्रांतिकारी संघटना म्हंटली म्हणजे आपल्याकडे शस्त्रे हवीत असे प्रत्येकाला चा वाटले पण त्या वेळी म्हणजे सुमारे १९८३-८४ मध्ये पिस्तुल मिळवणे आजच्या इतके सोपे नव्हते , विलासचे मुंबईला काही मित्र होते तो त्यांच्या कडून एखादे पिस्तुल मिळवू शकेल असे त्याने सांगितले , इतर शस्त्रे म्हणून मग आम्ही गुप्ती , तलवार , त्यावेळी ब्रुसली ने प्रसिद्ध केलेला नॉन चाकू , हाताच्या चार बोटात अडकवून समोरच्याला माराचायची पितळी फाईट , एक बटन चाकू अश्या प्रकारची शस्त्रे गोळा करण्यास सुरवात केली होती आम्ही सगळे ' आझाद सेनेच्या ' कल्पनेने भारलो गेलो होतो .

मी एका जाड साखळीला एका टोकाला एक सुमारे १ इंच व्यासाचा लोखंडी गोळा वेल्ड करून घेतला होता आणि नॉनचाकू सारखा तो फिरवायला देखील शिकलो होतो . हा गोळा मी पँट च्या बाहेर ठेवून बाकीची चेन आत सोडून देत असे . व जसा ब्रुसली लढण्याच्या वेळी अचानक त्याचा शर्टात लपवलेला नॉनचाकू जसा बाहेर काढतो तसे मी तो गोळा अचानक बाहेर काढण्याचा देखील सराव गुपचूप करत असे . त्या वेळी ' लावारीस ' हा सिनेमा नुकताच प्रदर्शित झालेला होता त्यात अमिताभ बच्चन ते चामड्याचे गुढघ्या पर्यंत घातलेले बुट आम्हाला खूप आवडले होते , शस्त्रे लपवण्यासाठी हे बुट छान होते , मात्र हे बुट खूप महाग होते सुमारे १००० हजार रुपयांना मिळत त्यावेळी, पण आपल्या कडे हे बुट असावेतच असे आम्हाला वाटे , मग आम्हाला एका बुट चोरणाऱ्या टोळीचा शोध लागला. नाशिकरोड ला ' मुक्तिधाम ' येथे खूप श्रीमंत लोक दर्शनाला येत असत , तेथे पूर्वी जरी चपला बुट ठेवण्यासाठी स्टँड होता तरीही काही लोक ' मुक्तीधामच्या पायरीवर चपला बुट ठेवत असत तेथून संधी साधून हे लोक चांगल्या नव्या चपला व बुट चोरत असत तर या टोळीकडून आम्ही मिळतील ते अगदी स्वस्तात म्हणजे १०० ते १५० रु. पर्यंत चोरीचे लावारीस छाप बुट देखील मिळवले होते . फक्त ' आझाद सेनेच्या ' कारवाई च्या वेळीच ते बुट घालयचे असे ठरले होते .

विलास ने आर्टिलरी सेंटर मधून कशा कोणजाणे चार पाच सल्फ्युरिक अँसिड असलेल्या सुमारे ८ इंच लांबीच्या काचेच्या बंद ट्युब्ज मिळवल्या होत्या , वेळप्रसंगी त्या ट्युब्ज समोरच्या शत्रू च्या तोंडावर फोडता येणार होत्या .अशी सगळी जय्यत तयारी सृरू होती आमची , तसेच आम्ही भले गांजा पिऊन का होईना दुपारी चार वाजता सिन्नर फाटा येथील पालिकेच्या व्यायाम शाळेत देखील जात असू तेथे सूर्य नमस्कार , डंबेल्स , मुद्गल , उंच उड्या मारणे , हवेत पळत येऊन उलटी उडी मारणे असे प्रकार शिकत होतो , गांजाच्या तारेत मजा यायची व्यायाम करायला .एकंदरीत ' आझाद सेनेचे ' सैनिक चांगले तयार होत होते .

========================================================================
 
भाग १७   आझाद सेना ... गर्द चा प्रवेश .!

आझाद सेनेची पहिली मिशन असली पाहिजे या वर आमच्या रोज चर्चा होत असत , शहरातील काही लबाड राजकारणी , दोन नंबरचे काम करणाऱ्या लोकांची यादी तयार करून त्यांना धमकीची पत्रे पाठवावीत असा एक मुद्दा समोर आला , म्हणजे अश्या लोकांना तुमचे सगळे धंदे आम्हाला माहित आहेत आणि आपण हे सगळे सोडून जर नीट वागले नाहीत तर होणारे परिणाम भोगायला तयार राहा असे पत्र या लोकांच्या पत्यावर पोस्ट करायचे . पण जर त्यांनी पत्राकडे दुर्लक्ष केले तर नक्की काय करायचे त्या बाबतीत या बाबत एकमत होईना कोणी म्हणे डायरेक्ट खातमा करायचा , तर कोणी म्हणे की आपण त्यांनी पत्राला दाद दिली नाही तर अश्या लोकांचे पुरावे गोळा करून पोलिसात तक्रार द्यायची ..वगैरे . एकमत होण्याबाबत जरा अडचणच होई ..

एक मात्र खरे की आपण काहीतरी भव्य करणार या कल्पनेनेचे आम्हाला खूप समाधान मिळत असे , विलास ( आमचा बॉस ) आम्हाला रोज भेटत नसे मात्र आम्ही नेहमी जमून चर्चा करून विलास भेटला की त्याला योजना सांगत असू, या सर्व काळातच एकदा गोसावी वाडी या विभागातील आमच्या नेहमीच्या गांजा विकत घेण्याच्या अड्ड्यावर एकदा त्या अड्डेवाल्या माणसाने एक नवीन नशा आलीय गर्द नावाची आणि त्याने खूप मस्त नशा येते असे सांगितले ,,आमच्या सगळ्या मित्रांमध्ये सगळ्यात जास्त प्रयोगशील आणि कुतूहल असणारा मी होतो . झाले मी ते गर्द खरेदी केले त्या वेळी फक्त ५ रुपयांना एक छोटी बाटली मिळत असे .

होमिओपॅथि च्या गोळ्यांची छोटीशी बाटली असते तश्या छोट्या लाल झाकणाच्या बाटलीत हे गर्द मिळे , फिकट पिवळसर तपकिरी रंगाची ही पावडर सुरुवातीला मी अड्ड्यावर एका सोबत चीलीमितून टाकून ओढली गांजाची चिलीम भरून त्या वर माचीस च्या काडीच्या चमच्याने अगदी अर्धी चिमूट पावडर त्यात टाकून चिलीमिचा दम मारला आणि काही मिनिटातच माझे अंग शिथिल झाले ,मन शून्य होऊ लागले , सगळ्या काळज्या चिंता व्यर्थ वाटू लागल्या . खूप मस्त अनुभव होता मात्र तोंडात वेगळीच कडवट चव जाणवू लागली , थोडेसे मळमळल्या सारखे झाले .

सर्व मित्रांमध्ये सुरुवातीपासूनच मी जरा जास्त करणाऱ्यांपैकी होतो म्हणजे एखादी गोष्ट आवडली की सतत ती गोष्ट करण्याचा माझा प्रयत्न असे ,शिवाय माझ्या डोक्यात अनेक प्रकारचे गहन प्रश्न नेहमी फेर धरून असत म्हणूनच की काय रात्री सहजा सहजी मला झोप लागत नव्हती , आधी दारू, मग गांजा , मग भांगेच्या गोळ्या , नंतर अफुच्या गोळ्या असे माझे व्यसन वाढत चालले होते , तरी रात्री मी शांत झोपू शकत नसे मला आठवते अगदी पहाटे तीन पर्यंत मी जागा राही मग जेमतेम झोप लागे , अर्थात माझ्या सततच्या अस्वस्थते मुळे तसेच , व्यक्तिगत आयुष्यात प्रेम प्रकरणातील अपयश मी फारच मनाला लावून घेतले होते व त्यामुळे जीवनाबद्दल वैफल्यग्रस्त होतो . मात्र तारुण्यातील जोम , उत्साह , काहीतरी करून दाखवण्याची किवा स्वतःला सिद्ध करून दाखवण्याची उर्मी आणि अंतर्मनाच्या पातळीवरील वैफल्य असे विचित्र मिश्रण झाले होते माझ्या व्यक्तिमत्वाचे !

मी जेव्हा माझ्या इतर मित्रांना गर्द बाबत सांगितले तेव्हा आधी सर्व मला रागावले हे भलतेच नको करूस हे गर्द फार भयंकर आहे असे त्यांनी ऐकले होते , जर मटनाच्या छोट्या तुकड्यावर गर्द ची पावडर टाकली तर तो तुकडा पाच मिनिटात विरघळून जातो असे ऐकिवात होते आपल्या शरीरातील मास असेच गळून जात राहील तेव्हा हे करू नको असे मला बजावले मित्रांनी पण मी असे सहजा सहजी ऐकणाऱ्या मुलांपैकी नव्हतोच लहानपणापासून .

========================================================================

 
भाग १८   मिशन --इलेक्शन आणि मटका !


मी हळू हळू माझ्या मित्रांच्या नकळत ब्राऊन शुगर ओढू लागलो होतो , सगळे एकत्र असताना गांजा , चरस आणि मग सगळ्यांना शुभरात्री करून झाले की मी घरी येताना सोबत ब्राऊन शुगर ची ती छोटीशी लाल झाकणाची बाटली घरी आणून सिगरेट मध्ये गांजा भरून त्यात थोडीशी पावडर टाकून ओढत असे . मला आठवते एरवी आम्ही गांजा चिलीमितून ओढत असू व त्या वेळी अनेकदा मातीची चिलीम नीट सांभाळावी लागे नाहीतर फुटून जात असे म्हणून मी सायकलच्या पायडल ला असलेल्या स्टील च्या नळी ची एक कायम टिकेल अशी चिलीम बनवली होती , ती नळी मागच्या बाजूने ठोकून थोडी चपटी केली होती आणि त्यात एक खडा टाकला होता , ही चिलीम मात्र खूप गरम होत असे त्या मुळे जाड रुमालात धरून ओढावी लागे , एकीकडे व्यसनाची प्रचंड ओढ आणि दुसरीकडे देशभक्ती , समाजसेवा वगैरे च्या गप्पा आणि योजना असे दुहेरी जिवन जगत होतो मी .

आझाद सेनेची पहिली मिशन ठरली ती कॉलेज च्या निवडणुका निपक्षपातीपणे व्हाव्यात या साठी मुलांना जागृत करण्याची . त्या वेळी नाशिक रोड कॉलेज ला बहुधा युवक कॉंग्रेस चेच उमेदवार निवडून येत असत , तसेच बहुजन युवा संघटना या संघटनेचा देखील कॉलेजच्या निवडणुकीत लक्षणीय सहभाग असे , उमेदवारांना दम देणे , उमेदवार फोडणे , निवडणुकीच्या दिवशी उमेदवार पळवणे वैगरे प्रकार चालत . त्या वेळी नाशिक रोड ला दलित -सवर्ण अशी दंगलही एकदोन वेळा झाली होती त्यामुळे नेहमी कॉलेजच्या निवडणुकीत पुन्हा दलित -सवर्ण हा वाद उफाळून येई .

निवडणुकीत कोणतीही जात पात न पाहता मतदान करावे , जातीपेक्षा उमेदवाराच्या चारित्र्याला प्राधान्य द्यावे व हा दलित -सवर्ण वाद मिटावा या साठी प्रयत्न करण्याचे आम्ही ठरवले , विलास चे अक्षर खुपच सुंदर होते , तो चित्रे देखील छान काढी आम्ही आझाद सेनेतर्फे एक पत्रक कॉलेज मध्ये लावायचे ठरवले ज्यात एकतेचा आणि निवडणुकीत गैरप्रकार न करता निपक्षपाती पणे मतदान करावे असा संदेश दिला जाणार होता , आम्ही एका मोठ्या आकाराच्या कार्डबोर्ड वर जलरंगाचा वापर करून तो संदेश लिहायचे ठरवले , अर्थात विलासच त्याच्या सुंदर अक्षरात लिहिणार होता . पोस्टर च्या वर एका बाजूला ' जय भवानी ' आणि दुसऱ्या बाजूला ' जयभीम ' असे लिहून मग खाली , जात पात न पाहता मतदान करावे , उमेदवाराच्या चारित्र्याला प्राधान्य द्यावे , कोणताही गैरप्रकार करू नये वगैरे सूचना लिहिल्या , आणि जर कोणी असे प्रकार करताना आढळला तर त्याला आझाद सेना धडा शिकवेल अशी धमकी लिहून पोस्टर तयार केले गेले .

हे पोस्टर आम्ही मध्यरात्री जाऊन कॉलेज च्या प्रवेशद्वारावर लावले , आम्हाला तेथील पहारेकऱ्याने अडवू नये किवा ओळखू नये म्हणून खूप सावधपणे हा कारभार उरकावा लागला . दुसऱ्या दिवशी आम्हाला मुलांच्या काय प्रतिक्रिया येतात हे जाणून घेण्याबाबत खूप उत्सुकता होती . सकाळी कॉलेज सुरु झाल्यावर प्रवेश द्वारावरील ते लक्षवेधी पोस्टर पाहून मुले चर्चा करत होती , ' आझाद सेना ' म्हणजे नक्की कोण याचे अंदाज बांधले जात होते , आमचा संशय येण्याची सुतराम शक्यता नव्हती . त्या दिवशी सगळ्या कॉलेज मध्ये त्या पोस्टर चा विषय रंगला हे आमच्या करिता समाधानकारक होते चला आझाद सेनेची पहिली मिशन सुखरूप पार पडली या समाधानात त्या दिवशी रात्री मस्त पार्टी झाली आमची !

दुसरी मिशन म्हणून नाशिक रोडला होटेल ' वास्को ' च्या समोरच्या झोपडपट्टीत एक मटक्याचा मोठा अड्डा होता , गोरगरीब मटका खेळून बरबाद होतात हे आम्ही पाहातच होतो तेव्हा हा मटक्याचा अड्डा बंद पडला पाहिजे असे वाटत होते , हा अड्डा म्हणजे लाकडी फळ्यांनी बनवलेला होता तो जाळणे सहज शक्य होते . आम्ही रात्री साधारण ३ च्या सुमारास जाऊन रॉकेल टाकून तो अड्डा जाळायचे ठरवले , अडचण अशी होती की त्या अड्ड्यावर रात्री एक जण झोपत असे तो नोकर माणूस होता , तसेच दारूचा व्यसनी देखील होता त्याला काही इजा न होता हे काम उरकले पाहिजे असे आम्हाला वाटे कारण तो बिचारा गरीब नोकर होता . त्याला काहीतरी कारणाने बाहेर बोलवावे आणि मग दुसऱ्या बाजूने रॉकेल टाकून अड्डा पेटवायचा असे ठरले शेवटी


========================================================================

भाग १९   मिशन फेल ...!
मटक्याचा अड्डा जाळण्याची आमची मानसिक तयारी पूर्ण झालेली होती व आम्ही एकून १५ लिटर रॉकेल देखील आणून एका ठिकाणी लपवून ठेवले होते . या मिशन साठी आम्ही शनिवार ची रात्र निवडली होती . ठरल्याप्रमाणे एक जण तेथील परिसराची रेकी करून आला होता बाजूच्या झोपड्या आणि हा अड्डा यात जास्त अंतर नव्हते त्यामुळे कदाचित बाजूच्या झोपड्या पेट घेऊ शकतील हा धोका होता मग त्यावरून आमच्यात वाद झाले की आपण जसे त्या मटक्याच्या अद्द्यावरच्या माणसाला वाचवण्याचा विचार करतोय , तसेच बाजूच्या झोपड्यांच्या बाबतीत काही करता येईल का ? खूप चर्चा झाली एक गट म्हणत होता की फार तर एखादी झोपडी पेटेल व आपणच तिथे आसपास लपून आगीचे निरीक्षण करायचे व अड्ड्या व्यक्तीरिक्त जर दुसरी काही पेटले तर ताबडतोब आरडा ओरडा करून आग विझवायची अर्थात यात एक धोका होता की आम्हाला त्या जागेवर थांबावे लागणार होते व त्यामुळे कदाचित नंतर तपासात आमचा संशय येण्याचा धोका होता त्या मुळे आमच्यातील दुसऱ्या गटाचे असे म्हणणे पडले की त्या बाजूच्या झोपडयांचा जास्त विचार न करता सरळ आपले काम उरकून घरी निघून जावे काय होईल ते होईल . पण दुसरा पर्याय जरा अमानवी वाटला आम्हाला म्हणून शेवटी असे ठरले की अड्डा पेटवून आपण थोड्याच अंतरावर लपून बसायचे आणि जर इतर झोपड्या पेटल्या तर मग आग विझवायला मदत करायची .

शेवटी सगळे पक्के झाले आणि आम्ही रात्रीची वाट पाहत बसलो , संध्याकाळी दुर्गा गार्डन मध्ये जाऊन गांजा ओढत बसलो , नाशिक मध्ये दारूची दुकाने , मटक्याचे अड्डे यांचे सगळ्यात जास्त ग्राहक होते प्रेस वाले ( करन्सी नोट प्रेस चे कामगार ) रात्रपाळी करण्याऱ्या लोकांची बारा वाजता जेवणाची सुट्टी होते व त्यानंतर हे लोक सुमारे १ वाजेपर्यंत दारूची दुकाने मटक्याचे अड्डे येथे येऊन आपला कार्यभाग उरकून पुन्हा कामावर हजर होत असत , तसेच रात्री १२ ला ' ओपन ' चा आकडा येत असे ( मटका खेळणाऱ्या माणसाला हे ओपन , क्लोज असे शब्द समजण्यास अडचण जाणार नाही ) . म्हणजे आम्हाला आमचे काम रात्री १ नंतर पार पडावे लागणार होते . आम्ही दुर्गा गार्डनमध्येच रात्री एक वाजेपर्यंत टाईम पास ( गांजा ओढणे ) करत बसलो होतो . जरा खतरनाक मिशन असल्याने सगळे जरा गंभीरच झाले होते , आमच्यातील एकदोन जण जर जास्त चिंतीत होते ते सारखे शंका कुशंका काढत होते व आम्हाला त्यांना धीर द्यावा लागत होता अधिक धैर्य हवे म्हणून त्या दिवशी गांजा सोबत दारू पिणे देखील अपरिहार्य होतेच . शेवटी एकदाचा एक वाजला आणि आमची टोळी मिशन वर निघाली , काहीही न बोलता आम्ही चाललो होतो दुर्गा गार्डन पासून त्या मटक्याच्या अड्ड्या पर्यंतचे अंतर साधारणपणे २ की मी . होते थोडे चालून गेल्यावर एकाला आम्ही पुढे सायकलवर सगळे आलबेल आहे की नाही ते पाहण्यास पाठवले .

हळू हळू आम्ही पुढे चाललो होतो आता मटक्याचा अड्डा जवळ आला होता , तितक्यात आम्ही सायकल वर पाठवलेला तो मित्र आला व म्हणाला ' च्यायला सगळा ' लोचा ' झाला यार ..! तेथे खूप गर्दी जमलेली आहे कशाची तरी " आम्हाला काही समजेना नेमकी काय भानगड झाली ते , मनात एक विचार असाही आला की आपल्यातील कोणी फुटले तर नाही त्याने कदाचित ही बातमी लोकांना देऊन सावध तर केले नसेल ? या विचाराने आम्ही घाबरलो व तेथेच थांबलो नेमके काय करावे ते सुचेना , शेवटी अगदी जवळ न जाता थोडे लांबून नेमके काय झाले याची माहिती काढायला म्हणून पुढे गेलो तर रडण्याचे आवाज एकू येऊ लागले आणि एकाला अजून जवळ पाठवले आणि शेवटी खरी भानगड काय झालीय ते समजले , तेथे रात्री सुमारे १२.३० च्या सुमारास बाजूच्या झोपडीतील एक आजारी माणूस मृत्यू पावला होता व त्याची सगळी गर्दी जमली होती व रडारड सुरु होती . बोंबला म्हणजे आता आज काही आपले काम होणार नाही हे लक्ष्यात आले तसेच एकदम मनावरचे ओझे उतरल्यासारखे झाले आमच्यातील कोणीही फुटलेला नाही हे समाधान होतेच . त्यादिवशी नेमके एकाचा मृत्यू व्हावा व आमची मिशन फेल व्हावी यात काय योगायोग असावा यावर मग चर्चा सुरु झाली .

========================================================================

 भाग २०  कुत्र्याला नशेची दीक्षा ...|


( जसा जसा लिहीत जातोय तसे तसे अनेक जुने प्रसंग आठवत आहेत अगदी विस्मृतीच्या कप्प्यात गेलेले क्षण पुन्हा मनात ताजे होत आहेत त्यामुळे कदाचित सलग असे लिहिता येणे कठीणच आहे जसे आठवेल तसे लिहीत जातोय )

मला लहानपणासून कुत्रा हा प्राणी फार आवडतो , रेल्वे क्वार्टर्स मध्ये रहात असताना शाळेतून येताना एखादे छान गोंडस कुत्र्याचे पिल्लू रस्त्यावर दिसले की लगेच ते घरी घेऊन येत असे आधी आई -वडिलांचा स्पष्ट नकार , मग माझा हट्ट , रडणे वगैरे सोपस्कार झाले की शेवटी नाईलाजाने ते कुत्रा घरात ठेऊन घेण्यास परवानगी देत . मग त्या पिल्लाला घराची सवय होईपर्यंत स्वतःच्या जवळ झोपवणे , त्याला दुध पाजणे , त्याच्याशी खेळणे , फिरायला घेऊन जाणे , त्याने केलेली घाण साफ करणे अश्या गोष्टी मी उत्साहाने करीत असे , कुत्रा थोडा मोठा झाला की मग तो घरात थांबेनसा होई , त्याला बांधायची देखील गरज राहत नसे तो मग सगळ्या गल्लीचा कुत्रा होऊन जाई . एकंदरीत माझ्या रेल्वे क्वार्टर्स च्या २० वर्षांच्या वास्तव्यात ४ कुत्री पाळून झाली होती . शेवटचा कुत्रा मोठा देखणा होता , त्या वेळी नुकताच जँकी श्रॉफ या अभिनेत्याचा पहिला ' हिरो ' नावाचा चित्रपट प्रदर्शित झाला होता तो पाहून मी या सुंदर तपकीरी रंगाच्या आणि कान सरळ ताठ असलेल्या रस्त्यावरून उचलून आणलेल्या पिल्लाचे नाव लाडाने ' जँकी ' असे ठेवले होते . त्याच काळात माझे दारू , गांजा पिणे सुरु झालेले होते .

पाळलेल्या कुत्र्याचे एक छान असते ते सारखे मालकाच्या मागे मागे असते , आणि नैसर्गिक कुतूहलामुळे ते सारखे मालक ज्या ज्या वस्तूला हात लावील त्याला नाक लावून बघत असते , तसेच हा जँकी देखील नेहमी माझ्या मागे मागे राही मला व मी थांबलो आणि त्याच्या कडे पहिले की तो देखील थांबून शेपटी हलवत माझ्याकडे पाहून ' आज्ञा मालक " किवा ' काय हुकूम " अश्या प्रश्नार्थक अविर्भावात माझ्या कडे पाहत असे . माझी नशेची भूक वाढत चालली होती व मित्रांसोबत बाहेर गांजा पिऊन आल्यावर देखील माझे समाधान होत नसे म्हणून मी घरी येताना सोबत देखील एक गांजाची पुडी घेऊन येत असे व रात्री ११ नंतर मागच्या अंगणातील संडासात जाऊन गांजा सिगरेट मध्ये किवा चिलीमित भरून एकटा ओढत असे तेव्हा हा जँकी मी संडासातून बाहेर पडेपर्यंत संडास च्या बाहेर माझी वाट पाही , मध्ये मध्ये भुंकून मी आत आहे की नाही याची तो खात्री करून घेई , किवा मग संडासच्या दाराला बाहेरून नाक लावून ' कूं कूं असा आवाज काढून तो बाहेर उभा आहे किवा मी आत नेमके काय करतो आहे याचे त्याला कुतूहल असल्याची जाणीव करून देई . मला या प्रकारची मोठी गम्मत वाटे .

एकदा असाच तो बाहेरून नाक लावून कूं कूं करत होता तेव्हा सहज मनात विचार आला जर कुत्रा गांजा प्यायला तर त्याच्यावर नेमका काय परिणाम होईल ? झाले मनात विचार आला की त्याची पूर्तता करण्यास मला वेळ लागत नसे , मी लगेच दर उघडून त्याला आत घेतले त्याला खूप आनंद झालेला जाणवत होता . तो आत येऊन प्रश्नार्थक मुद्रेने माझ्याकडे पाहत होते तेव्हा मी चिलीमिचा एक दम मारून तो धूर माझ्या छातीत भरून घेतला व मग जँकिचे तोंड हाताने उघडून तो धूर त्याच्या तोंडात सोडला जसा माणसाला ठसका लागतो तसा त्याला देखील थोडासा ठसका लागला व नंतर त्याने मागे सरकून माझ्या कडे अविश्वासाने पहिले , किवा ' हे काय भलतेच ? ' अश्या मुद्रेने माझ्याकडे तो पाहू लागला त्याला दोन तीन जबरदस्त शिंका देखील आल्या मात्र आता मी मागे हटणार नव्हतो पुन्हा एकदा त्याचे तोंड उघडून धूर त्याच्या तोंडात सोडला या वेळी त्याला ठसका लागला नाही मात्र शिंका आल्या व तो बाहेर जाण्याचा प्रयत्न करू लागला मग मी दर उघडून त्याला बाहेर जाऊ दिले . माझा कार्यभाग उरकल्यावर जेव्हा मी बाहेर आलो तेव्हा तो एका प्लास्टिक च्या पिशवीशी खेळताना दिसला त्याने त्या पिशवीच्या फाडून चिंधड्या केल्या होत्या बाहेरून खाण्याचे पदार्थ विकत आणलेली रिकामी पिशवी होती ती , माझ्या लक्षात आले की जशी मला गांजा ओढल्यावर जशी जास्त भूक लागते तशी त्याला देखील लागली असावी


मग मी त्याला त्याचे खाणे झाले असूनही त्याला पुन्हा दोन पोळ्या खाण्यास दिल्या व त्याने त्या पटकन मटकावल्या .

दोन तीन दिवसांनी पुन्हा एकदा दुपारच्या वेळी मी संडासात असताना जँ बाहेरून दाराला नाक लावून कू कूं कं करू लागला तेव्हा मी पुन्हा दर उघडले तेव्हा तो आत न येत मागे फिरला व दूर जाऊन माझ्या कडे पाहत उभा राहिला कदाचित मागील अनुभवावरून तो शहाणा झाला असावा मात्र मी पुन्हा त्याला लाडाने जवळ बोलाविले तेव्हा माझ्यावर विश्वास दर्शवत तो आत आला , पुन्हा तसाच त्याच्या तोंडात धूर सोडणे झाले व त्याला बाहेर सोडले . असे महिना भारात सुमारे आठ दहा वेळा झाले असावे , मग जँकी देखील सराईत होऊ लागला आता तो आनंदाने आत येई , नंतर मग मी त्याला भरपूर खायला देई . आईला मात्र जँकी ची भूक अचानक का वाढली याचे कोडे पडले .

( पुढे जँकी ला ब्राऊन शुगर देखील पाजली होती , ते पुढच्या भागात )

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें