प्रस्तावना !

माझ्या जीवनप्रवासा बद्दल ' मला समजलेला देव ..अल्लाह .गाँड वगैरे ' ही लेखमाला लिहितो आहे .. याचे प्रमुख कारण म्हणजे .. बालपणापासून एखाद्याला पडणारे स्वाभाविक प्रश्न .. त्यांची न मिळणारी उत्तरे ..बालसुलभ कुतूहल .. त्यापोटी धाडसी वर्तन .. त्यातून होणारा अनर्थ ..तारुण्यात प्रवेश करताना केलेल्या चुका .. एकदा भरकटल्या वर आयुष्याची होणारी फरफट ..त्यातून सावरण्याची केविलवाणी धडपड .. यश ..अपयशाचा लपंडाव .. आणि त्यातून मला झालेले जीवन दर्शन कदाचित वाचकांना काही शिकण्यास मदत करू शकेल असे वाटले .. व्यसनाधीनता हा भयानक मनो -शारीरिक आजार .. तो होण्याची कारणे .. त्यामुळे व्यसनी व्यक्तीचे व त्याच्या जवळच्या नातलगांचे होणारे गंभीर नुकसान या सगळ्या बद्दल सविस्तर माहिती मिळून त्यातून कोणाला सावरण्याची संधी मिळाली .. सुधारणेची शक्ती मिळाली कोणाचे जीवन सुरळीत झाले तर मी नक्कीच स्वतःला भाग्यवान समजीन....
तुषार नातू -फेसबुक प्रोफाइल
ब्लॉग संबंधी सूचना आपण comment box मध्ये देऊ शकता , किंवा मेल करा : tusharnatublog@gmail.com



सोमवार, 18 मार्च 2013

व्यसनांचे सावट !

भाग ६६

मित्राने पुढे केलेली पन्नी सहजपणे हातात घेऊन मी चेसिंग सुरु केले ..सकाळ पासून गांजा ..दारू आणि आता ब्राऊन शुगर ..म्हणजे मी मनोरुग्नालायातून आल्याच्या दुसऱ्याच दिवशी पुन्हा सगळी व्यसने केली होती , मात्र मी स्वतःला मनात बजावत होतो की हे फक्त आजच ..उद्यापासून नवीन घरी नीट वागायचे ..राहिलेल्या विषयांचा आभ्यास करायचा ..पदवी घ्यायची ..स्पर्धा परीक्षांना बसून एखादी चांगली नोकरी मिळवायची वगैरे ..वगैरे ..! रात्री दोन वाजेपर्यंत आमचा कारभार सुरु होता मग सगळे झोपायला निघाले ..मला इतक्या रात्री घरी जाणे शक्यच नव्हते एकतर बस मिळाली नसती ' मेरी ' ला जायला .. शिवाय सकाळपासून मी गायब होतो घरून ..भाऊ नक्कीच माझी वाटच पाहत असणार मी घरी कसा येतो ते पाहण्यासाठी ..मी असं नशा करून गेलेला त्याला समजलेच असते ..मग पुन्हा भांडणे .कटकट .त्या पेक्षा मी एका अरुण नावाच्या मित्राच्या घरी झोपायचे ठरवले . अरुण सिन्नर फाट्यालाच एका झोपडीवजा घरात राहत होता ..त्याचे वडील प्रेस मध्ये नोकरी ला होते ...येथे थोडे अरुण बद्दल सांगणे गरजेचे आहे ..एका अतिशय होतकरू आणि हुशार मुलाचे व्यसनामुळे कसे वाटोळे होते .याचे माझ्या सारखेच अरुणचे उदाहरण आहे ..!

अरुण हा दलित समाजातला मुलगा , लहान पणापासून अतिशय हुशार ..एकूण तीन भाऊ आणि ऐक बहिण आणि आई वडील असे कुटुंब .. शाळेत लहानपणी ९ वी पर्यंत पहिला नंबर सोडला नाही कधी त्याने ..आमची मैत्री सिन्नर फाट्याला मी गांजा प्यायला लागलो तेव्हा सुरु झाली ती पुढे वाढत गेली ..दरम्यान अरुण चे वडील आजारी होते तेव्हा देखील त्यांना नेहरू नगर च्या प्रेस च्या दवाखान्यात दाखल केले गेले असतांना आम्ही तीन चार मित्र तेथे अनेक वेळा रात्री अरुण च्या मदतीला थांबलो होतो ..पुढे त्याचे वडील गेले ..त्याच काळात माझ्या सारखाच अरुण ही ब्राऊन शुगर च्या तावडीत सापडला ..सिन्नर फाट्याच्या मुलांचा ऐक ' त्रिमूर्ती ' संगीत मेळा नावाचा सांस्कृतिक कार्यक्रम करणारा संच होता गणेशउत्सव , डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव ..आणि इतर उत्सवांच्या काळात गावोगावचे लोक ' त्रिमूर्ती ' संगीत मेळयाच्या संचाला पैसे देऊन आमंत्रित करत असत ..अरुण त्य संचाचा प्रमुख होता ..त्यात गाणी लिहिणे ..गाण्यांना चाली लावणे ...गाणी म्हणणे ..मेळ्यात अभिनय करणे असे सगळे अरुण लीलया करत असे ..अरुण चे वडील गेल्यावर त्याला वडिलांच्या फंडाचे .वगैरे एकदम खूप पैसे मिळाले आणि त्याच काळात आम्ही नुकतेच ब्राऊन शुगर मध्ये अडकलो होतो ..अरुण घरात सगळ्यात मोठा असल्याने बहुतेक सर्व पैसा त्याच्याच हाती होता ..आई फारशी शिकलेली नाही .त्या मुळे पैश्याचे सगळे व्यवहार अरुणच्याच ताब्यात आले होते ..बराच पैसा उडवला त्याने त्या वेळी ब्राऊन शुगर मध्ये ..वडिलांच्या जागी अरुण ला नोकरी लागणार होती हे गृहीत होते ..फक्त काही कायदेशीर सोपस्कार राहिले होते . त्याच काळात नाशिक मध्ये ' व्हीडीओ पार्लर ' नावाचा प्रकार सुरु झाला होता . एका छोट्याश्या हॉल मध्ये ऐक मिनी थेटर चालवले जाई सुमारे ५० माणसे बसतील असे ऐक ' व्हीडीओ पार्लर ' सिन्नर फाट्याला देखील सुरु झाले होते , तेथे बहुतेक वेळा ' अश्लील चित्रपट ' दाखवले जात . आम्ही एकदोन वेळा गेलोय तेथे ..या पार्लरवर पोलीस कधी कधी कधी अश्लील चित्रपट दाखवतात म्हणून कारवाई देखील करत अर्थात ही कारवाई तात्पुरती असे ऐक दोन दिवसांनी पुन्हा सगळे सुरळीत होई ..एकदा अरुण त्या पार्लर मध्ये गेला असतांना पोलिसांची रेड पडली व अरुण ही पकडला गेला ..त्याला दुसऱ्या दिवशी जामीन करून सोडवले गेले मात्र ती केस लागली त्याच्यावर ..अरुण च्या वडिलांच्या जागी नोकरी मिळण्या बाबत त्याच वेळी कार्यवाही सुरु झालेली आणि आता ही केस .. म्हणजे अडचणच होती ..अरुण ने खूप धावपळ केली तेथील दलित पँथर .. मास मुव्हमेंट वगैरे संघटनांच्या पुढारी वर्गाला भेटला आपली पोलीस केस काढून टाकली जावी यासाठी त्याचे प्रयत्न सुरु होते ..तीनचार जणांना त्यासाठी पैसेही दिले गेले .सगळ्यांनी त्याला ..अगदी किरकोळ केस आहे ..काळजी करू नकोस आम्ही पाहून घेतो ..निर्धास्त रहा असे आश्वासन दिले होते आणि हा देखील त्यांच्या भरवश्यावर राहिला .शेवटी एकदाचे त्याचे सरकारी नोकरी च्या संदर्भातले ' पोलीस व्हेरीफिकेशन ' झाले तेव्हा नेमकी त्याची केस आडवी आली व त्याची नोकरीची संधी गेली . त्या नंतर अरुण अजूनच बिथरला होता ..सगळ्या राजकीय नेत्यांना तो शिव्या घाली .. अरुण बद्दल अजून माहिती पुढे येईलच !
रात्री अरुणच्या घरी झोपून सकाळी लवकर उठून मी घरी पोचलो ..मुद्दाम भाऊ कामावर गेल्यावर मी घरी पोचलो .आई माझी काळजीच करत होती ..त्या काळी मोबाईल हा प्रकार अस्तित्वात नव्हता त्यामूळे मी घरी काही निरोप देखील दिला नव्हता . मला सुखरूप घरी आलेला पाहून तिचा जीव भांड्यात पडला ..वडिलांनी माझा अवतार पाहून काय ते ओळखले पण बोलून काही उपयोग नाही हे त्यांना माहित होते म्हणून काही बोलले नाहीत .अंघोळ करून मग जेवून झोपलो . दुपारी भाऊ जेवायला घरी आला तेव्हा मी झोपलेलाच होतो त्या मुळे त्याचे माझे काही बोलणे झाले नाही .संध्याकाळी मी घरीच थांबलो भावाला जरा काल मी नाशिकरोड ला जाऊन मी पानटपरी सुरु असतांना लोकांना उधार दिलेल्या वस्तूंचे पैसे मिळतात का ते पहिले असे खोटे सांगितले त्याचे समाधान झाले . मग सुमारे आठवडाभर मी घरीच थांबलो माझा राहिलेला आभ्यास ..वाचनालयातून पुस्तके बदलुनन आणणे ..वाचन यात घालवला !
========================================================================
भाग ६७  घुसमट ..कुचंबणा..नाईलाज !

रेल्वे क्वार्टर सोडून वडिलांचा ' मेरी ' मध्ये भावाच्या क्वार्टर मध्ये राहण्याचे निर्णय मला कोणत्याही बाजूने पटतच नव्हता ..याचे मुख्य कारण असे होते की जीवनातील हा बदल सहजपणे स्वीकारणे मला जमत नव्हते , जगात अनेक गोष्टी माणसाला केवळ नाईलाजाने कराव्या लागतात हे मला मंजूरच नव्हते ..कारण स्वतच्या मर्जीने जिवन जगण्याचा माझा स्वभाव होता .. माझे सगळे बालपण ..मित्र ..मनोरंजनाची साधने ..वगैरे नाशिक रोड आणि रेल्वे क्वार्टर ची निगडीत होते त्यामूळे मी जरी शरीराने मेरी ला राहायला होतो तरी मनाने सतत रेल्वे क्वार्टर ..सिन्नर फाटा ..माझे मित्र यांचा विचारात होतो ..खरे तर माझ्या आई वडिलांना देखील त्यांचे घर सोडून मोठ्या मुलाच्या घरी रहावे लागत होते आणि ते त्यांनी आनंदाने स्वीकारले होते ..हे कसे ? त्यांच्याही मनाचे धागे नाशिक रोड आणि रेल्वे क्वार्टरशी जुळलेले असणार ..त्यांनी हा बदल कसा स्वीकारला असेल त्यांचा नाईलाज होता हे उघड होते ..वडील सेवानिवृत्त झाल्यावर रेल्वे क्वार्टर मध्ये त्यांना जास्तीत जास्त ऐक वर्ष राहता आले असते नंतर क्वार्टर सोडावेच लागणार होते ...त्यांनी सहजपणे परिस्थितीशी जुळवून घेतले होते ..मेरी मध्ये सेवानिवृत्ती नंतरचा काळ व्यतीत करण्यासाठी वडिलांनी स्वतचे ऐक रुटीन ठरवून घेतले होते ..यात सकाळी फिरायला जाणे ..भाजी वगैरे खरेदी ..नंतर पेपर वाचन ..दुपारी जेवण थोडा वेळ आराम आणि पुन्हा संध्याकाळी फिरायला जाणे..मग टी.व्ही .आणि झोप ! मग स्त्रियांच्या बाबतीत विचार येई ..लहानपणा पासून ज्या घरी वाढल्या ..मोठ्या झाल्या ..ते घर सोडून लग्न झाल्यावर सासरी जाणे ...नवीन लोक ..नवीन आडनाव ..कदाचित नावही ..सगळे त्या कश्या स्वीकारत असतील ? जनरीत म्हणून ..की नाईलाज म्हणून ? अनेक प्रश्न होते ..व उतर एकाच येत होते ते म्हणजे ' पराधीन आहे जगती ...." पण हे पराधीन पण मला मात्र अजिबात आवडलेले नव्हते !

वाचनालयातून अनेक पुस्तके आणून त्याचा फडश्या पाडला..मेरी च्या वाचनालयातील जवळ जवळ सगळी पुस्तके वाचून झाली होती कादंबऱ्या ..कविता संग्रह ..दिवाळी अंक ..एकदा तर ' भृगु संहिता ' पण घेऊन आलो वाचायला व त्यातील पत्रिका ..ग्रह ..त्यांचे परिणाम ..योग वगैरे वाचून डोके अजून खराब करून घेतले ..माझी पत्रिका त्याच्याशी पडताळून पहिली काही गोष्टी योगायोगाने जुळत होत्या तर काही गोष्टी एकदम विसंगत होत्या ! सारखी मला नाशिकरोड ची तेथील मित्रांची आठवण होई .मग संधी मिळाली की आई कडून पैसे घेऊन आठवड्यातून एकदा तरी नाशिक रोड ला सटकत असे ..आणि तेथे सर्व मित्रांसोबत पुन्हा सगळ्या नशा करून एकदम रात्री उशिरा घरी येत होतो ..नाशिकरोड - मेरी या बस मध्ये बसताना जाताना खूप उत्साहाने जात होते तर रात्री परत येताना ..जड अंतकरणाने परतत होतो . एकंदरीत जीवनातील सगळाच आनंद हरवल्यासारखे झाले होते ऐक दोन वेळा सुमाच्या घरी गेलो होतो ..पण तेथे आता माझे स्वागत पूर्वी सारखे होत नव्हते हे देखील जाणवले ..उपचार म्हणून सुमा आणि तिच्या बहिणी ..लहान भाऊ ..आई वडील माझ्याशी बोलतात हे सहज समजत होते . त्याच काळात भावाच्या लग्नाची चर्चा जोर धरत होती घरात ..नाशिक रोड ला असतानाच ही चर्चा सुरु झाली होती ..भावाला नोकरी लागून सुमारे दोन वर्षे होत आली होती व त्या मुळे आता त्याचे लग्न वगैरे सोपस्कार होणारच होते ..!

रेल्वे क्वार्टर मध्ये राहणाऱ्या एका कुटुंबाशी आमच्या कुटुंबाची चांगली मैत्री होती आणि त्यांची ऐक नातलग मुलगी जी मुंबई ला राहत असे नेहमी दिवाळी ..उन्हाळ्याच्या सुट्टीत नाशिकरोड ला येई तेव्हा केव्हातरी मोठा भाऊ आणि तिची मनाने जवळीक झाली असावी ..तर तो तिच्याशी लग्न करणार अशी चर्चा देखील मी पूर्वी ऐकली होती ..पण नंतर तो विषय घरात निघणे बंद झाले होते ..भावाला काही विचारण्या ऐवजी एकदा आईला विचारले तेव्हा तिने सांगितले की ..ते लग्न होऊ शकत नाही ..कारण ती मुलगी तुला पण चांगली ओळखतेच ..तुझी सगळी व्यसने वगैरे तिला माहित आहेत आणि म्हणून तिने भावाला लग्न झाल्यावर आपण आईवडील आणि तुषार यांच्यापासून वेगळे राहू असे सांगितले होते ..ते भावाला पसंत पडले नव्हते ..त्याने तिला सरळ सांगितले होते की तुषार कसाही असला तरी माझा लहान भाऊ आहे ..आणि तो असा बिघडलेला असल्यामुळे आईवडिलांची जवाबदारी माझ्यावर आहे मी माझे कुटुंब सोडून वेगळा राहू शकत नाही . ..शेवटी ते प्रकरण फिसकटले होते .! हे समजल्यावर मला भावाचा खूप अभिमान वाटू लागला होता ..पण त्याचे सगळे ऐकत मात्र नव्हतो ..त्याने माझ्यासाठी ..आईवडिलांसाठी ..त्याच्या प्रेमाचा त्याग केला होता .आणि मी मात्र त्यांच्यासाठी साधे व्यसन सोडू शकत नव्हतो याचेही वाईट वाटे मनात पण ..हातात पैसे आणि संधी मिळताच मी .सगळी व्यसने करत होतो . बी. कॉम .च्या राहिलेल्या विषयांचा आभ्यास अधून मधून करत होतो .
========================================================================

भाग ६८ वा  परीक्षा ..भावाचे लग्न ..नोकरी !

आठवड्यातून एकदातरी नाशिकरोड ..सिन्नर फाटा ..येथे जाऊन मित्रांना भेटून सगळ्या करून परत ..पुन्हा केव्हा जायला मिळणार या संधीची वाट पाहत दिवस कसेतरी ढकलत होतो ..आयुष्य लादलेल्या ओझ्यासारखे ओढत होतो .फायनल च्या उरलेल्या १२ विषयांचा आभ्यास थोडाफार सुरु होता ...मनातून असमाधान ..असंतुष्टता ..मात्र काही केल्या जात नव्हते ...भावाला लग्नासाठी दोन तीन स्थळे सांगून आली होती ..त्यातील रविवार कारंजा जवळ राहत असलेल्या एका मुलीला भाऊ आणि आईवडिलांनी पसंत केले ..मी सोबत गेलो नव्हतो ...आईवडिलांनी त्या मुलीच्या घरी माझ्या पूर्व इतिहासाबद्दल थोडीफार कल्पना दिल्याचे व आता मी ठीक आहे असेही सांगितल्याचे मला आईकडून समजले ...अर्थात माझ्या इतिहासाबद्दल त्यांना काही हरकत असण्याचे कारणही नव्हते ..तरी आधी सांगितलेले बरे म्हणून आईवडिलांनी सांगितले होते ...भावाच्या साखरपुड्याच्या वेळी मी देखील सोबत गेलो होतो त्यांच्या घरी.. साधे आमच्यासारखेच मध्यमवर्गीय कुटुंब होते एकूण पाच मुलीच होत्या त्यांना त्यापैकी मोठ्या दोघींचे लग्न झालेले ..मुलगी ( माझी होणारी वाहिनी ) बी.कॉम . झालेली होती ..देण्याघेण्याच्या काही अटी नव्हत्या आमच्याकडून... मात्र आईला मुलगी कुटुंबवत्सल हवी होती .. मुख्य म्हणजे आमच्या घरी संगीताची आवड होती व मुलगी संगीत विशारद झालेली होती ही विशेष पसंती ... तिने साखरपुड्याच्या दिवशी ' तुज मागतो मी आता ..गजानना '' हे गाणे अतिशय सुंदर म्हंटले होते ...सगळे जुळून आले आणि २० एप्रिल ही भावाच्या लग्नाची तारीख ठरली ...दरम्यान माझी परीक्षा होती त्या निमित्ताने मग दररोज नाशिक रोड ला बिटको कॉलेजला जाणे झाले ..परीक्षा आहे ..ऐनवेळी याने ..पेपर बुडवू नये या भीतीने त्या काळात आई मला गुपचूप पैसे देत गेली ..मला पेपर देण्यात काहीही रस राहिला नव्हता ..तरी कधी एका दिवशी दोन तर कधी एकदिवशी ऐक असे करून ..कॉपी करत ..इकडे तिकडे पाहून सर्व पेपर दिले .

भावाचे लग्न जवळ येत होते ...लग्न खर्चासाठी आई वडिलांनी बँकेतून बरेच पैसे काढायचे म्हणून मलाही नाशिकरोड येथे असलेल्या महाराष्ट्र बँकेत सोबत नेले होते तेव्हाच मी ..भावाच्या लग्नाला ईतके पैसे खर्च करणार तुम्ही आणि मला मात्र अजिबात पैसे देत नाहीत वगैरे कटकट केली त्यांच्याशी . ' तू पण चांगला वाग ..नोकरी कर ..तुझेही लग्न चांगले थाटामाटाने करू आम्ही ' असे त्यांनी सुनावले.... पण मी लग्नच करणार नाहीय वगैरे सांगून... त्यांच्याकडून बँकेतून काढलेल्या पैश्यातून पैसे उकळत गेलो ..पत्रिका छापणे .. सगळ्यांना निमंत्रणाची पत्रे , पत्रिका पाठवणे , या कामात थोडीफार मदत केली मी पण त्याबदल्यात माझा मोबदला त्यांना खूप महाग पडत होता .. भावाच्या लग्नाच्या आधी बाहेरगावाहून जे पाहुणे येणार होते त्यांना नाशिकचे नवीन घर माहित नव्हते म्हणून त्यांना रेल्वे स्टेशनवर घ्यायला जाण्यासाठी जेव्हा मला सांगितले जाई तेव्हा अडवणूक करून देखील पैसे उकळले व नशा केली .. मला लग्नासाठी नवीन कपडे घेण्यासाठी देखील .तुम्ही नका आणू .मी स्वतः आणतो माझ्या पसंतीने , मला पैसे द्या असे म्हणत पैसे घेऊन ..त्यातही हात साफ केला व स्वस्तातील कपडे घेतले . त्या काळात पुन्हा नियमित ब्राऊन शुगर पिणे सुरु केले . नाशिक रोड हून एकदम तीनचार दिवस पुरतील इतक्या पुड्या घेऊन येत होतो ..शक्यतो भावाला हे पैसे मागणे वगैरे समजणार नाही अश्या पद्धतीने चालले होते ..एकदा भाऊ त्याची वाग्दत्त वधू आणि तिची धाकटी बहिण यांच्याबरोबर ' प्रेमाच्या गावे जावे ' हे नाटक देखील पाहून झाले ..मी आनंदी रहावे म्हणून भाऊ त्याला शक्य ते प्रयत्न करत होता .

लग्नाच्या आदल्या दिवशीच नाशिक रोड ला जाऊन मी ब्राऊन शुगर चा स्टॉक घेऊन आलो होतो त्यामूळे लग्नात आनंदी होतो .सगळ्या पाहुण्यांची विचारपूस करणे ...कार्यालयात त्यांना हवे नको पाहणे वगैरे उत्साहाने करत होतो . लग्नाला सुमा व तिच्या घरचे लोक आले होते म्हणून विशेष खुश होतो .'एकंदरीत भावाच्या लग्नात चांगला मिरवलो .. ब्राऊन शुगर चा तोंडाला वास येत नाही म्हणून कोणाला काही संशय आला नाही ..भाऊ आणि आईवडिलांना सगळे कळत होते पण ती भांडण्याची किवा काही वाद करण्याची वेळ नव्हती त्यांना मंगल कार्यात माझा तमाशा नको होता . एकदाचे लग्न होऊन भाऊ नूतन वधू सोबत बेंगलोर .म्हैसूर ट्रीप ला गेला आठ दिवसांसाठी ..सगळे पाहुणे गेले ..आता घरात नवीन वाहिनी आली आहे व तिने जर तुला दीर म्हणून मान द्यावा असे वाटत असेल तर हे सगळे धंदे बंद कर ..असे आईने स्पष्ट समजावले होते मला , आई देखील काही दिवस माहेरी म्हणून नांदेड ला गेली ..घरात वडील आणि मी असे दोघेच उरलो होतो . वडिलांकडून एकदोन वेळा पैसे मागितले... त्यांनी स्पष्ट नकार दिला ..मग त्यांचे पासबुक चोरून ..त्यांची खोटी सही करून बँकेतून पैसे काढले . ते संपवून झाले . मग मनात आले आता एखादी नोकरी करायला हवी म्हणून ..वर्तमानपत्रात जाहिरात पाहून वकीलवाडी येथे नव्याने सुरु झालेल्या ' हॉटेल पंचवटी ' मध्ये मुलाखतीला गेलो ..तेथे रेस्टॉरंट कँशियर कम क्लर्क अश्या पदासाठी अर्ज केला होता .. . त्यात लगेच निवडला देखील गेलो ..दुसऱ्याच दिवशी कामावर रजू व्हायचे होते ..अंगावर टर्की काढत नोकरीवर दाखल झालो .. दिवसा टर्की चा त्रास कमी होई पण रात्री मात्र खूप तडफड होई शरीरंमनाची कसे तरी तीन चार दिवस त्रास सहन केला आणि टर्की संपली एकदाची व सुरळीत नोकरी सुरु झाली . पंचवटी हॉटेलमध्ये माझे काम शिफ्ट मध्ये होते सकाळी ११ ते दुपारी २ व नंतर पुन्हा सायंकाळी ७ ते रात्री ११ असे मला जावे लागत असे . तेथील थाळी खूप प्रसिद्ध होती त्यामूळे बहुतेक लोक आपल्या कुटुंबियांसोबत जेवणासाठी तेथे येत ..माझे काम तेथे रेस्टॉरंट मध्ये गल्ल्यावर बसून बिले बनवणे ..पैसे स्वीकारणे असे होते . पाहता पाहता मी कामात तरबेज झालो माझे जेवण हॉटेलमध्येच होत होते पगार ४०० रुपये महिना मिळणार होता . 

========================================================================

भाग ६९ वा व्यसनांचे सावट ! 

हॉटेल पंचवटी मधील नोकरी मस्त सुरु होती ..पहिला पगार घेतला तेव्हा नाशिकरोड ला जाण्याची खूप इच्छा असूनही तेथे गेलो की व्यसने सुरु होतील म्हणून गेलो नाही ..आईकडे सगळा पगार दिला ...पंचवटी हॉटेल ची थाळी त्या वेळी ३८ रुपयांना होती ..त्यान छान .राजस्थानी जेवण ...पुरणाची पोळी ..पापड वगैरे मिळत असे ..लहान मुलांसाठी हाफ थाळी २० रुपयांना होती . दिवसभरात किमान ५०० लोक तरी जेवायला येत ..काही दुकानदार वगैरे तर नियमित डबा लावल्यासारखे तेथे जेवायला येत असत ..कोपऱ्यातील काऊंटर वर मी बसत होतो हाताशी गाणी वाजविण्यासाठी टेपरेकॉर्डर होता ..मी त्यावर सगळ्या कस्टमर्स करिता छान छान गाणी लावत असे ..हॉटेलच्या वरच्या दोन मजल्यांवर बाहेरगावाहून येणारे प्रवासी ..यात्रेकरू वगैरे थांबत असत ..आता जरी नाशकात खूप मोठी मोठी हॉटेल्स झाली असली तरी त्या काळी हॉटेल पंचवटी चा दर्जा श्रेष्ठ मानला जाई ..एकदा मी गल्ल्यावर बसलेला असतांना मला निरोप आला की पेंटूी सुपरवायझर काही दिवस सुटीवर आहे व त्याच्या जागेवर मला काम करावे लागेल ..मी लगेच वरच्या मजल्यावर असलेल्या पेंटूीत गेलो ..हॉटेल मध्ये निवासाला असलेल्या यात्रेकरूना त्यांच्या खोलीत चहा , स्नँक्स , व खाण्याच्या इतर सेवा पुरवण्यासाठी , पदार्थांची तेथे ऑर्डर घेतली जाई व ताबडतोब तेथल्या तेथे ती ऑर्डर बनवून रूम मध्ये पाठविली जाई .. तेथे सर्व रुम्स शी जोडलेला फोन माझ्या कडे होता ..समोर रूम नंबरचे ऐक पँनल होते तेथे कोणत्या रूम नंबर हून फोन आला की दिवा लागे मी लगेच ऐक कॉड लावून त्या रूम मध्ये असणाऱ्या माणसाची ऑर्डर घेऊन ती एका पँड वर लिहून ठेवी व तेथील कुक ला ती ऑर्डर लवकरात लवकर बनवायला सांगून ती ऑर्डर तयार झाली की वेटर सोबत ती ऑर्डर आणि सोबत कस्टमर ची सही घेण्यासाठी बिल बनवून पाठवत असे जरा धावपळीचेच काम होते माझे कधी कधी एकदम तीन चार रुम्स मधून फोन वाजत ते वेळच्या वेळी अटेंड करून घाईने ऑर्डर लिहून घेण्याची तारांबळ उडत असे ..तसेच पेंटूीत असेलल्या कुक ला त्या ऑर्डर्स क्रमाने सांगणे त्या त्याने पटापट बनवाव्यात म्हणून लक्ष ठेवणे व रूमसर्विस करिता असलेल्या वेटर कडे त्या ऑर्डर पटापट नेऊन देण्यासाठी लकडा लावणे अशी कसरत करता करता वेळ कधी पुढे सरके ते देखील समजत नसे ..

दुपारी घरी जाण्याऐवजी हॉटेल मध्येच थांबून मी ओवरटाईम देखील करू लागलो .कधी कधी मला हॉटेलच्या स्टोअर मध्ये देखील काम करावे लागे ..स्टोअर मधील सर्व वस्तूंचा स्टॉक घेणे , ज्या ज्या विभागाकडून इंडेन्ट असेल त्या त्या विभागाची मागणी पुरवणे त्याचे रेकोर्ड ठेवणे ..संपलेल्या वस्तूंची नोंद करून त्या वस्तूंची यादी खरेदी विभागाकडे पाठवणे अश्या कामात देखील मी प्राविण्य मिळवले . अल्पावधीतच मी हॉटेल पंचवटी मधील हुशार , कामसू , स्टाफ म्हणून हॉटेलचे मँनेजर सिंग साहेब यांची मर्जी संपादन केली .सुटीच्या दिवशी घरीच थांबत असे मी व नवीन वाहिनी मला संगीता बदल थोडीफार माहिती देत ..त्या माझ्याच वयाच्या होत्या त्यांच्याशी गप्पाटप्पा करण्यात वेळ घालवी . एकंदरीत मस्तच चालले होते माझे साधारण नोकरीच्या तिसऱ्या महिन्यात एकदा पेंटूीत ड्युटी वर असतांना हॉटेलच्या ' बार ' विभागातील ऐक वेटर तेथील कोल्ड्रिंक्स संपली म्हणून कोल्ड्रिंक्स घ्यायला आमच्या विभागात आला तो नेमका माझा गांधी नगर मध्ये राहणारा व्यसनी मित्र शिरीष निघाला . सुमारे २ वर्षांनी तो असा अचानक भेटला होता ..हा अतिशय हुशार मुलगा दहावीला चांगले मार्क्स मिळवून त्याने पाँलीटेक्नीक मध्ये प्रवेश घेतला होता पण नंतर तो आमच्या सारखाच गांजा ..ब्राऊन शुगर च्या नादी लागून वाया गेला होता ..मग शिक्षण अर्ध्यावर सोडून दिले होते त्याने त्याची घसरण माझ्यापेक्षा जास्त वेगाने झाली होती ..तो असं एकदम भेटला आणि त्याच्याबरोबर घालवलेले सगळे क्षण आठवले ..त्याने मला खुणेने व्यसन चालू आहे का ते विचारले मी नाही अशी मान हलवून त्याला खुणेने त्याच्या व्यसनाबद्दल विचारले तर कधी कधी असे त्याने उत्तर दिले ..मग तो कोल्ड्रिंक्स घेऊन निघून गेला ..माझ्या मनात कधी कधी चा किडा सोडून .

तीन दिवसांनी मी इमारतीच्या मागे असलेल्या स्टाफरूम कडे चाललो होतो तेव्हा हा तेथील अंधाऱ्या जिन्यात ब्राऊन शुगर पीत बसलेला दिसला मी मागचा पुढचा विचार न करता त्याच्या सोबत बसलो आणि ......दम मारले ! हे फक्त आजच असे स्वतःला बजावले ..या पुढे शिरीष भेटला तरी प्यायचे नाही असे मनात ठरवत दम मारले ... इतके दिवस मला ब्राऊन शुगर चे नाशिकरोड चे अड्डे माहित होते मात्र शिरीष कडून नाशिक शहरातील भद्रकाली मधील अड्ड्या ची माहिती मिळाली तेथे मोठा घात झाला . त्या दिवशी शिरीष बरोबर तीनचार दम मारून... वाघाला जशी रक्ताची चटक लागते तसे झाले ... नंतर ऐक दिवस शांत राहिलो आणि तिसऱ्या दिवशी घरून सकाळी लवकर निघून आधी शिरीष ने सांगितलेल्या भद्रकालीतील मुश्ताक च्या अड्ड्या वर गेलो ब्राऊन शुगर ची पुडी घेतली आणि मग ड्युटीवर आलो . इथून पुन्हा नियमित ब्राऊन शुगर ओढण्यास सुरवात झाली ... पैसे कमी पडू लागले ..मग थाळीच्या बिलात गडबड करून पैसे मारू लागलो ... उधार पैसे घेणे सुरु झाले . कामावरील सुट्या वाढल्या ..घरात झोपून राहण्याचे प्रमाण वाढले ..भावाशी खटके उडायला सुरवात झाली !

========================================================================
 भाग ७० वा  भोपळेचौक !

पुन्हा नियमित पिणे सुरु झाले ..माझ्या तब्येतीवर परिणाम होऊ लागला ..पैश्यांसाठी घरात कटकटी सुरु झाल्या , पंचवटी हॉटेल मधल्या नोकरीत जेव्हा जेव्हा मी रेस्टॉरंट मध्ये कँशियर म्हणून बसे तेव्हा तेव्हा आधी खिश्यातील स्वतचे पैसे बाहेर काढून ठेवावे लागत मला ..हा नियम बहुधा सगळ्या कँशियर ना असतो ..तसेच पिणे सुरु झाल्यावर अनेकदा मी रेस्टॉरंट मध्ये गल्ल्यावर बसलेला असतांना जर जास्त जेवणारे नसतील तर तेथेच असलेल्या संडास मध्ये जाऊन ब्राऊन शुगर ओढत असे ..एकदा रविवर चा दिवस होता आणि सगळे रेस्टॉरंट भरलेले होते सुमारे १ वाजला असावा मी सकाळी घरून निघून सरळ अड्ड्यावर जाऊन सोबत माल घेऊन आलो होतो व रेस्टॉरंट मधल्या संडासमध्ये जाऊन माळ ओढू असं विचार केला होता ..पण आलो आणि गर्दीमुळे गल्ल्यावरच अडकून पडलो होतो ..अगदीच राहवेना म्हणून पाच मिनिटात ऐक दोन दम तरी मारावेत असं विचार करून रेस्टॉरंट मध्ये गर्दी असूनही गल्ल्यावर बिल देण्यासाठी अजून लोक यायला उशीर आहे म्हणून संडास मध्ये शिरलो ..पाहता पाहता दम मारण्यात गुंग झालो ..दार वाजले ..बाहेरून वेटर ओरडला साहेब गल्ल्यावर खूप लोक जमलेत ..लवकर या आणि बिले च्या त्यांची ..पटापट सगळे आवरून ..बाहेर आलो ..गल्ल्यावर जाऊन बिले घेऊन उरलेले पैसे पार्ट देण्याचे काम सुरु झाले ..

खरोखरच गर्दी जमली होती गल्ल्यावर .. लवकर बिल घेऊन , आम्हाला मोकळे करा म्हणून , लोक घाई करत होते ..माझेही हात पटापटा चालवत होतो ..जवळ जवळ सगळ्यांचे पैसे घेऊन झाले होते ..तेव्हा बाजूला उभा असलेला ऐक माणूस पुढे होऊन म्हणाला ..साहेब तुम्ही अजून मला उरलेले सुटे पैसे परत दिलेले नाहीत ..सहसा माझ्याकडून असे होत नसे ..प्रत्येकाचे बिल घेतले की मी त्याला आधी सुटे पैसे देत होतो आणि मगच तो बिलाचा कागद बाजूला असलेल्या स्टील च्या दांडीत अडकवत होतो ..त्याचे बिल मी दांडीला अडकवलेले होते ..याचा अर्थ सरळ होता की मी उरलेले पैसे दिले आहेत ..मी त्याल तसे सांगितले तसा तो वाद घालू लागला ...म्हणाला ..तुमच्या नीट लक्षात नाहीय बहुतेक ..मी तुम्हाला एका थाळीचे म्हणून ऐक १०० रु , ची नोट दिली उरलेले बासष्ट रुपये .. तुमच्या कडे सुटे नाहीत असे सांगून तुम्ही मला थांबायला सांगितले होते ..मला काहीच आठवेना ..तरीही असे होणारच नाही ..मी तुम्हाला पैसे दिलेत असे मी त्याला म्हणून लागलो ..तो देखील नाही दिले म्हणून वाद घालू लागला ..पुन्हा एकदा गल्ल्यावर गर्दी झाली होती आणि आमचा वाद सुरु होता ..कोणीतरी जाऊन हॉटेलचे मँनेजर सिंग साहेब यांना ही माहिती दिली असावी ..मला एका वेटरने ..सिंग साहेबांनी बोलावले आहे असे सांगितले . गल्ल्याला कुलूप लावून मी सिंग साहेबांचा केबिन मध्ये गेलो .

..त्यांनी काय प्रकार आहे असे विचारताच मी सगळी माहिती दिली व त्यांना सांगितले की साहेब जर मी त्याला पैसे परत दिले नसते तर गल्ल्यात माझ्याकडे जास्त पैसे असायला हवे होते ..पण माझा हिशोब बरोबर लागतो आहे ..त्यांना काहीतरी शंका आली .म्हणाले ..कदाचित तू सुटे पैसे त्याला द्यायचे म्हणून तुझ्या खिशात काढून ठेवले असतील ..तुझे खिसे पहा एकदा नीट ..नाही सर् ..मी खिसे पण पहिले ..त्याला नक्की दिले आहेत मी पैसे ..असे म्हणत मी सिंग साहेबांच्या समाधानासाठी शर्टच्या वरच्या खिश्यात हात घालून पहिला.. मग पँट चे दोन्ही खिसे सिंग साहेबाना बाहेर काढून दाखवले आणि त्याच आवेश्यात मागच्या खिश्यात मी काय ठेवले आहे हे विसरून ..मागचा खिसा त्यांच्या समोर उलटा केला ..आणि घात झाला .मागच्या खिश्यात मी संडासमधून घाईघाई ने बाहेर पडताना ब्राऊन शुगर ओढायची पन्नी आणि चेसर म्हणजे कागदाची नळी ठेवली होती ..ते बाहेर पडले ..साहेबांच्या समोरच ..मागे ऐक वेटर उभा होता त्याने पटकन त्या वस्तू उचलल्या व सिंग साहेबांच्या हाती दिल्या .. पैसे तर निघाले नाहीत ..मात्र ..साहेबांनी हे काय आहे असे विचारले ..मी नुसताच मान खाली घालून उभा होतो ..त्याच वेटरने साहेबाना माहिती पुरवली ..साब ये ब्राऊन शुगर पिनेका सामान है ....सरांनी ताबडतोब वेटर ला बाहेर जायला सांगितले ..मग माझ्या जवळ येऊन माझ्या पाठीवर हात ठेवून म्हणाले ..बेटा..ये क्या कर रहे हो आप ? .कितना खतरनाक नशा है ये आप जानते नाही शायद ...नंतर त्यांनी मला ..कुठेतरी उपचार घे असे सुचवले ..उद्या येताना तुझ्या मोठ्या भावाला सोबत घेऊन ये ..मी त्याला तुला उपचार द्यायला सांगतो ..आणि मगच तू कामावर हजार हो ..तो पर्यंत सुटी घे तू ..सिंग साहेबांनी सरळ सरळ उपचार घेऊन मग ड्युटीवर ये ..तोवर कामावर येऊ नको ... असाच संदेश दिला होता प्रेमाने ..मी अपमानित होऊन बाहेर पडलो ..घरी आलो . भावाला उद्या तेथे नेणे शक्यच नव्हते ..त्याला सगळे सांगावे लागले असते ..इतके दिवस त्याला माझे पिणे परत सुरु झाले आहे असं संशय होता ..पण मी सरळ नाकारले होते ..त्या पेक्षा आता ही नोकरी बंद ..उद्या दुसरी नोकरी शोधू असं निर्णय घेतला .

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें